हरित क्रांती झाल्यानंतर जास्त खर्चाच्या, प्रत्येक बाबतीत परावलंबी आणि एक पीक पद्धतीच्या शेतीने शेतकऱ्यांचे जीवन अधिकच अशाश्वत केले आहे. अर्थात, आजही अनेक भागांमध्ये शेतकरी शाश्वत जीवन जगतो. त्यासाठी तो विविध पीकपद्धती अवलंबून किंवा शेतीला जोडधंद्याचा आधार देऊन स्वत:चा व्यवसाय शाश्वत करतो. शेतीच्या अनेक जोडधंद्यांपकी सर्वात जुना आणि शाश्वत जोडधंदा म्हणजे पशुसंवर्धन.
हा आपल्या पूर्वजांपासूनचा पारंपरिक व्यवसाय. भूमाता आणि गोमातेचे संवर्धन करणाऱ्या भूमिपुत्राला त्यांनी कधीही अडचणीत आणले नाही. परंतु प्रगतीच्या नावाखाली भूमिपुत्राने भूमातेच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे तिनेही उत्पादन कमी देण्यास सुरुवात केली. अनेक भूमिपुत्रांनी गोमातेला घरातून काढून टाकले. गोमाता आणि भूमाता यांना निसर्गाने एका चांगल्या चक्रामध्ये बसवलेले असूनही आपण मात्र त्यांची ताटातूट करतो. भूमाता गोमातेच्या पोषणासाठी चारा पिकवते, तर गोमाता भूमातेच्या पोषणासाठी शेण, गोमुत्रासारखे अत्यंत उपयुक्त खाद्य तयार करून खाऊ घालते. हेच खरे निसर्गचक्र.
पूर्वी शेतकरी म्हणायचा की दुधाचा पसा सतत चलनात राहातो. त्यामुळे दैनंदिन व्यवहार किंवा दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचे काम दुधाच्या पशावरच होते. आजही मोठय़ा प्रमाणात अल्प व अत्यल्प भूधारक तसेच जिरायती भागातील शेतकरी या व्यवसायामुळे स्थिर आहेत. देशातील एकूण रोजगारापकी ८-९ टक्के रोजगारनिर्मिती या व्यवसायातून होत असते. विशेषत: घरच्या घरी काम करता येते, म्हणून महिलांचा या व्यवसायामध्ये ८५-९० टक्के वाटा आहे. देशातील ६५ टक्के शेतकरी कुटुंबाकडे हा व्यवसाय आहे.
अनेकदा हवामानातील बदलामुळे पीक वाया गेले किंवा बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतीमध्ये नुकसान झाले, तरीही ज्या शेतकऱ्यांकडे दुग्धव्यवसाय आहे, त्यांना त्याची फार मोठी झळ बसत नाही. म्हणजेच दुग्धव्यवसाय अशा शेतकऱ्यांसाठी विम्याच्या कवचकुंडलासारखे काम करते. ज्या भागामध्ये दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन आहे, त्या भागात गरिबीचे प्रमाण कमी दिसून आल्याचे एका पाहाणीचा अहवाल आहे. हवामानामध्ये बदल होत असताना दुग्धव्यवसायासारखे शाश्वत उत्पादन देणाऱ्या व्यवसायाची शेतकऱ्यांना गरज आहे.

जे देखे रवी..     – पशुपक्ष्यांची ज्ञानेश्वरी – ६
दुसऱ्या अध्यायातल्या आत्मा या विषयाच्या गहन चर्चेमुळे आणि स्थितप्रज्ञ या शब्दाच्या अशक्यप्राय वाटणाऱ्या व्याख्येने अर्जुन वेडा होतो. एका सुप्रसिद्ध नाटकात एक पात्र ‘कशानेही न विचलित होणारे गाढव स्थितप्रज्ञ आहे का?’ असा प्रश्न विचारते. अर्जुन असा प्रश्न विचारण्याचे धाडस करत नाही, पण स्वत:ला कमीपणा घेत माझी स्थिती ‘मर्कटा माजवण दीजे’ अशी झाल्याची सांगतो. माजवण म्हणजे दारू (किंवा सभ्य शब्दात मद्य). दारू प्यायलेला माणूस माकडासारखा वागतो मग माकडाचे काय होत असेल? माजवण शब्द बघा. नवऱ्याने ऊ१्रल्ल‘ घेतल्यावर त्याच्याशी बोलणे अशक्य असते असे जे बायको म्हणते, त्या अर्थाने हे माजवण.
याच अध्यायात मासे पोहतात आणि पाण्याच्या बाहेर काढले की तडफडून मरतात. स्वधर्मातून अंग काढून घेतले तर तडफडणे सुरू होते आणि माणूस शरीराने मरत नसला तरी त्याचे मन अत्यवस्थ होते. इथला धर्म ‘हिंदू इसाई और मुसलमान’ या आरोळीतला धर्म नाही. हा कर्माचा धर्म आहे. स्वांत सुखाय स्वेच्छेने निवृत्त होणे निराळे आणि बळजबरीने (!) श्फर घ्यावी लागणे किंवा पोराने बापाला दुकानातून काढून आता घरी बसून रहा असे सांगणे निराळे. ओवी म्हणते- जैसे जलचरा जल सांडे। आणि तत्क्षणी मरण मांडे। हा स्वधर्मू तेणे पाडे। विसंबू नये।।
मरण मांडे म्हणजे मरण आठवते. तेणे पाडे म्हणजे त्याप्रमाणे विसंबू नये म्हणजे सोडू नये. या अध्यायातला सगळ्यात महत्त्वाचा दाखला एका पक्ष्याचा आहे तो पक्षी अनामिक आहे.
उडुनी पक्षी जैसा। झोंबतसे फळा। तसे होईल कसे शक्य। सर्वसाधारण नरा। असे त्या ओवीचे स्वरूप आहे. सामान्य माणसाला आयुष्याचे इंगित त्या पक्ष्यासारखे एका भरारीत उलगडणे शक्य नाही. त्याला हळूहळू ‘टाकून पाउले’ एकेक फांदी पार करत ते फळ गाठायचे आहे असे ती ओवी म्हणते.
ती पावले म्हणजे कर्मे. ते पक्षी म्हणजे महात्मे. असला एक अकाली गेलेला पक्षी म्हणजे ज्ञानेश्वर. परिस्थितीमुळे गांजून न जाता या पक्ष्याने एका उंच फांदीवर झेप मारून जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी मोठय़ा गोड भाषेत असामान्य गुंजन केले.
सॉक्रेटिस हा पक्षी उडाला की झाडावरच होता हे कळायला मार्ग नाही, परंतु त्यामुळे प्लेटो आणि अ‍ॅरिस्टोटल हे पक्षी मात्र उडू शकले. आमचे जगत्गुरू शंकराचार्य हे उडले गरूडासारखे, परंतु त्यांच्या संस्कृतातल्या भरारीने नवी पहाट झाली. आणि बुद्ध झाडाखाली बसले असताना त्यांना दृष्टान्त झाला असे म्हणतात, पण त्यांची भरारी बोधिवृक्षावर झाली होती असेच मला भासते. मग बोधिवृक्षासकट त्यांनी संचार केला आणि त्याच्या छायेखाली अनेक जमा झाले आणि हळूहळू पावले टाकू लागले.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस   – पार्किन्सन्स – कंपवात : ‘टफ’ आजार – भाग – २
जगभरच्या आधुनिक वैद्यक शास्त्रात पार्किन्सन्स आजाराचे मूळ कारण सबस्टॅनशिया नायग्रामधील पेशी का मरतात याकरिता चालू आहे. ढोबळमानाने असे सांगितले जाते की, मेंदूच्या या भागात नको असलेली प्रोटिन्स निर्माण होतात; त्यांच्यावर दबाव येतो. काही वेळेस अनुवंशिकता हेही कारण असू शकते. या आजाराची सुरुवात हात थरथरणे, कापणे अशा लक्षणांनी सुरू होते. काही रुग्ण या रोगाची सुरुवात झाल्याबरोबरच आत्मसंयमन करून; आपले कामाचा ताण कमी करून रोगावर नियंत्रण मिळवतात. काही रुग्णांना शेती बागायतीच्या कामातील कीटकनाशक, तणनाशक द्रव्यांच्या नित्य संपर्कानेही या रोगाची लागण होते.
हा आजार सुरू झाल्याबरोबर रुग्णाची चिंता वाढते. ‘माझे कसे होईल? लोक माझ्याकडे निरखून बघतायेत, एका डॉक्टरांनी हा आजार कधीच बरा होत नाही असे सांगून मला घाबरवलेले आहे. इ. इ. ’ वेळीच औषधोपचार झाले नाहीत तर हा रुग्ण स्वत:ला सर्वापासून वेगळा ठेवू पाहतो. बोलताना त्याच्या तोंडातून लाळ गळते. त्याचे बोलणे अस्पष्ट होते. ओठही थरथरतात. रुग्ण खचून जातो. कोणत्याही डॉक्टरांकडे गेले की डॉक्टरमंडळी मेंदूमध्ये डोपा या द्रवपदार्थाची निर्मिती कमी होऊ नये म्हणून विविध प्रकारच्या एस डोपा, सिनडोपा, एनडोपा अशी औषधे सुचवितात. काही काळ या औषधांनी बरे वाटते. वाढलेला रक्तदाब थोडा नियंत्रणात येतो. वर्ष-दोन वर्षांच्या वापरानंतर डोपा औषधे पचनी पडतात. औषधांचा डोस वाढविला तर रिअ‍ॅक्शन वाढते, औषधे कमी केली तरी लक्षणे वाढतात; अशा कात्रीत रुग्ण सापडतो. औषधे व सल्ला देणारे डॉक्टरही कंटाळतात. आधुनिक विज्ञानाच्या नवीन संशोधनाप्रमाणे मेंदूच्या विशिष्ट भागात तारा टाकून काही उपचार; ‘डीपब्रेन स्टिम्युलेशन’ केले जातात, पण ते सगळ्यांनाच परवडत नाहीत. रुग्णाची कुटुंबीय मंडळी व मित्रांनी या व्यक्तीला आपलेसे करून; त्याचे रुटीन काम वाटून घेतले, रुग्णाचा ताणतणाव कमी केला तर निश्चयाने आयुर्वेदीय उपचार दिलासा देतात.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – ३० जुलै
१९५९ > सदानंद देशमुख यांचा जन्म. लचांड, उठावण, महालूट हे त्यांचे कथासंग्रह, व ‘तहान’ ही कादंबरीदेखील ग्रामीण वास्तव मांडणारी आहे.
१९६० > शि. म. परांजपे यांच्या चरित्राची प्रस्तावना, ‘अनुग्रह’ हा स्फुटलेख संग्रह  व ‘माझी जीवनगाथा’ हे आत्मचरित्र लिहिणारे ‘कर्नाटकसिंह’ गं. बा. देशपांडे यांचे निधन.
१९९४ > ग्रामीण साहित्याला हसरा चेहरा देणारे कथाकार शंकर बाबाजी पाटील यांचे निधन. ग्रामीण कथाकथनाचा प्रकार त्यांनी (व्यंकटेश माडगूळकर आणि द. मा. मिरासदार यांच्या साथीने) रुळवला. अ. भा. साहित्य संमेलनाचे (१९८५, नांदेड) ते अध्यक्ष होते. वळीव, धिंड, भेटीगाठी, खुळय़ाची चावडी, खेळखंडोबा आदी कथासंग्रह, तर ‘टारफुला’ ही कादंबरी गाजली. ‘एक गाव बारा भानगडी’ ‘पाहुणी’ आदी चित्रपटांच्या पटकथाही त्यांच्याच.
१९९५> अर्थतज्ज्ञ आणि या विषयावर मराठीतून लेखन करणारे विद्वान, विनायक महादेव दांडेकर यांचे निधन. महाराष्ट्रातील ग्रामीण समाजरचना, गावरहाटी (सहलेखक म. भा. जगताप) तसेच ‘भारतातील दारिद्रय़’ (सहलेखक नीळकंठ रथ) हे ग्रंथ, अनेक लेख तसेच महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलाचा अहवाल  त्यांनी लिहिला.
– संजय वझरेकर