योग, आयुर्वेद शरीर-मनात अद्वैत सांगत असले, तरी रेने देकार्त नावाच्या तत्त्वज्ञाने १६३७ मध्ये शरीर आणि मन या दोन स्वतंत्र वस्तू आहेत असे मत मांडले. ‘मन हे चेतन असून शरीर यंत्रासारखे असते’ या देकार्तच्या मतावर आधारित संशोधनातून आधुनिक वैद्यकशास्त्र विकसित झाले. असे असले तरी मानसशास्त्रज्ञ मात्र हे मत नाकारत होते. विल्यम जेम्स (ज्यांना अमेरिकन मानसशास्त्राचे जनक मानले जाते) यांनी १८९० मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी भावनांचा सिद्धांत मांडला आहे. शरीरात काही बदल होतात, मेंदू ते जाणून प्रतिक्रिया करतो आणि त्यामुळे भावना निर्माण होतात असा हा सिद्धांत आहे. एखाद्या घटनेमुळे किंवा विचारामुळे छातीत धडधड होऊ लागते आणि त्याला आपण भीती असे म्हणतो.म्हणजे घटना, शरीरात बदल आणि भावना असा कालानुक्रम असतो. त्यांचे हे मत अनेकांनी अमान्य केले. त्यापैकी एक कॅन्नोन नावाचे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या मते घटनेची प्रतिक्रिया म्हणून भावना जन्माला येते आणि नंतर शरीरात बदल होतात. मात्र मनातील भावना आणि शरीरातील बदल हे एकमेकांशी जोडलेले असतात हे सारेच मानसशास्त्रज्ञ मान्य करतात. मानवी मेंदूच्या संशोधनात असे आढळले आहे की प्री-फ्रन्टल कॉर्टेक्सचा तळाचा भाग हा बाह्य जगाच्या माहितीवर काम करतो, आतील भाग हा शरीरात काय चालले आहे ते जाणत असतो आणि बाहेरील भाग हा विचार निर्माण करीत असतो. या तिन्हीचा एकत्र परिणाम म्हणून भावना निर्माण होत असतात. भावना सतत नसतात. त्या लाटांसारख्या असतात, पण मूड मात्र तुलनेने सातत्यपूर्ण असतो. शरीरात जे जाणवते त्याचा पूर्वस्मृतीनुसार मेंदू अंदाज बांधतो आणि त्यानुसार प्रतिक्रिया करतो. चांगला किंवा वाईट मूड हा शरीरात जे काही जाणवते त्याला प्रतिक्रिया म्हणून निर्माण होतो. त्यामुळे केवळ विचार बदलून भावना बदलल्या असे वाटत असले तरी हा बदल वरवरचा असतो. भावनांचे मूळ म्हणजे मूड बदलायचा असेल तर शरीरात जाणवणाऱ्या गोष्टींना प्रतिक्रिया करण्याची मेंदूची सवय बदलवणे आवश्यक आहे. आणि हेच साक्षी ध्यानात होत असते. शरीरावर लक्ष नेऊन जे काही जाणवते आहे त्याचा स्वीकार केल्याने मेंदूची सवय बदलते आणि त्रासदायक भावना कमी होतात. - डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com