माणसातील नैसर्गिक भावनांच्या भागाला, ‘ज्यामध्ये मजा करण्याचीदेखील प्रवृत्ती असते,’ त्याला एरिक बर्न यांनी चाइल्ड म्हणजे बालक असे नाव दिले आहे. याचे कारण नुकतेच जन्माला आलेले बाळदेखील भावना अनुभवत असते. त्याला असुरक्षित वाटले की ते रडते, उबदार स्पर्श मिळाला की सुखावते, मोठ्ठा आवाज झाला की दचकते, घाबरते. त्या वेळीदेखील त्याच्या मेंदूचा भावना निर्माण करणारा भाग सक्रिय असतो. मेंदूत भावना कशा निर्माण होतात याचे संशोधन अनेक शास्त्रज्ञ करीत आहेत, डॉ लिसा बॅरेट या त्यातील एक आघाडीच्या संशोधक आहेत. त्यांच्या मते आपल्या मेंदूत एकाच वेळी अनेक फाइल्स ओपन असतात. मेंदू पाच ज्ञानेंद्रिये वापरून परिसराची माहिती आणि तीन पद्धतीने शरीराची माहिती घेत असतो आणि त्याचा अर्थ लावत असतो. त्याच वेळी भूतकाळातील स्मृती आणि भविष्यातील शक्यता यावरदेखील काम होत असते. या सर्व फाइल्स एकाच वेळी सक्रिय असल्या तरी त्या साऱ्या आपल्या जागृत मनाला जाणवत नसतात, त्यातील जी फाइल प्रबल होते तो विचार आपल्याला जाणवतो. त्या दृष्टीने सुप्त मन जागृत मनापेक्षा खूप मोठे आहे असे म्हटले तर योग्य ठरेल. एका खोलीत दहा माणसे बसून आपापले काम करीत असावेत तसे मेंदूत अनेक भाग आपले काम करीत असतात. त्यामधूनच विचार जन्माला येतात. खोलीत बसलेल्या दहातील एखाद्याला ‘मला जे समजले आहे, ते खूप महत्त्वाचे आहे आणि त्याकडे सर्वाचे लक्ष वेधून घेणे आवश्यक आहे’ असे वाटते त्या वेळी तो मोठय़ाने बोलू लागतो, ओरडू लागतो. मेंदूतदेखील असेच घडते, त्या वेळी सक्रिय असलेल्या अनेक फाइल्सपैकी एक खूपच प्रबल होते, तेच ते विचार मनात येऊ लागतात. तिलाच आपण भावना म्हणतो. त्या वेळी अन्य सर्व फाइल्स जणू आपले काम मंद करतात. म्हणूनच भीती वाटते, किंवा राग येतो त्या वेळी त्याचेच विचार खूप मोठय़ा संख्येने आणि वेगाने निर्माण होतात, अन्य गोष्टींचे भान राहत नाही. भावना खूप तीव्र असेल तर सैराट कृती घडून जाते ती याचमुळे. अशा कृती कमी करणे हेच सर्व प्रकारच्या मानसोपचार पद्धतींचे मूळ ध्येय आहे. - डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com