डॉ. यश वेलणकर

‘फ्लो’ या आनंददायी अवस्थेत संपूर्ण मेंदू एकाच वेळी सक्रिय असतो. त्यामुळे त्या वेळी कार्यक्षमता खूप चांगली असते. मात्र अशी स्थिती सतत राहत नाही. मनाची आणखी एक वेगळी स्थिती म्हणजे ‘भारित अवस्था’ होय! या स्थितीत आपण काय करतो आहोत, याचे भान नसते. या स्थितीत बरेच जण काही तरी खात राहतात. सध्या किराणा दुकानातून बिस्किटे पूर्वीपेक्षा अधिक विकली जात आहेत. याचे एक कारण टीव्हीसमोर बसून ती खाणे वाढलेले आहे. कंटाळा असतो त्या वेळी भूक नसतानाही काही तरी तोंडात टाकावे असे वाटत राहते. मग शेंगदाणे, काजू, वेफर्स, बिस्किटे वारंवार खाल्ले जातात. पोटावरची चरबी वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असे सतत काही तरी तोंडात टाकत राहणे हे आहे. चार शेंगदाणे पोटात गेले तरी त्या वेळी इन्सुलीन पाझरते. सतत खात राहिले की, इन्सुलीन सतत पाझरत राहते. इन्सुलीनचे एक काम चरबी तयार करणे हे आहे. त्यामुळे पोट सुटते. रक्तात सतत इन्सुलीन राहिले की, शरीरातील पेशींची त्याच्याविषयीची संवेदनशीलता कमी होते. त्यामुळे मधुमेह होतो. अनेक मुले अभ्यास करीत असतानाही काही तरी खात असतात. असे सतत खात राहिल्याने अनेक तरुण- आपण भुकेची संवेदना कधी अनुभवलेलीच नाही, असे सांगतात.

सध्या घरीच राहायचे असल्याने एक अनुभव म्हणून  सकाळी उठल्यापासून रात्र होईपर्यंत काहीही खायचे नाही, असे ‘चॅलेंज’ स्वीकारता येईल. असे लंघन आरोग्यासाठी चांगले असते. मधुमेह नसलेल्या प्रत्येक व्यक्तीने असे लंघन अधूनमधून करायला हवे. मधुमेह असेल तर वैद्यकीय मार्गदर्शनाखाली लंघन करणे योग्य. असे काही वेळ काहीही न खाणे शरीरासाठी चांगले आहेच; पण मेंदूतील स्वनियंत्रण करणाऱ्या केंद्रांना तो व्यायाम आहे. माणूस भान नसताना काही तरी तोंडात टाकत राहतो, त्या वेळी ही केंद्रे झोपलेलीच असतात. कृतीची सजगता वाढवली- म्हणजे आपण काय करतो आहोत याचे भान ठेवू लागलो, की ही केंद्रे काम करू लागतात. पुढील पायरी म्हणजे विचारांची सजगता. मनात काही तरी खावे असा विचार आला- पण मी आत्ता खाणार नाही, असे माणूस ठरवतो; त्या वेळी तो विचारांची गुलामी झटकत असतो. विचारांच्या तालावर नाचायचे नाही, असा निर्धार प्रत्यक्षात आणणे मेंदूतील स्वनियंत्रणाची केंद्रे विकसित करतो. स्वयंशिस्तीची परीक्षा घेणारे हे उपासाचे ‘चॅलेंज’ स्वीकारणार का?

yashwel@gmail.com