‘‘जागतिक पातळीवर पर्यावरणाच्या संरचनेचे, स्वरूपाचे आणि विविध घटकांचे ज्ञान देऊन प्रत्येक व्यक्तीस पर्यावरणाप्रति संवेदनशील, जागरूक व जबाबदार नागरिक बनविण्याची क्षमता असलेला, पर्यावरणाच्या क्षेत्रातील सर्वसमावेशक समस्या व आव्हानांचे स्वरूप समजावून घेऊन त्यांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आवश्यक व उपयुक्त ज्ञान प्रदान करणारा, यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची क्षमता निर्माण करणारा तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक सकारात्मक अभिवृत्तींचा, मूल्यांचा व पर्यावरण नैतिकतेचा विकास करण्याची क्षमता असणारा आणि त्यांना शाश्वत विकासासाठी आवश्यक पर्यावरणसंगत कृती करण्याची अभिप्रेरणा देणारा अभ्यासक्रम म्हणजे पर्यावरण शिक्षण’’- तिबिलीसी जाहीरनाम्यातील या व्याख्येवर आधारित पर्यावरण शिक्षणाच्या अभ्यासक्रमासंदर्भात काही ठोस, महत्त्वाची मानके आहेत. त्यांचा सारांश असा : (१) या अभ्यासक्रमात पर्यावरणाचा सर्वंकष, सर्वसमावेशक विचार असायला हवा. (२) अगदी पूर्व-प्राथमिक स्तरापासून ते महाविद्यालयीन आणि पुढे विद्यापीठीय स्तरापर्यंत हे शिक्षण असायला हवेच; पण त्यानंतर देखील ‘जीवनाच्या पाठशाळेत’ हा विषय अनौपचारिकपणे शिकत राहता येईल अशी व्यवस्था असायला हवी. थोडक्यात हा आयुष्यभर शिकण्याचा विषय आहे. (३) पर्यावरण शिक्षणाचा अभ्यासक्रम सर्वसमावेशक (मल्टिडिसिप्लिनरी) असावा. म्हणजेच तो केवळ विज्ञान शाखेतीलच नव्हे, तर कला आणि वाणिज्य शाखांमधील इतर विषयांशी, त्याचप्रमाणे व्यावसायिक पदवीच्या अभ्यासक्रमांशी देखील जोडलेला असावा. (४) स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर पर्यावरणातील अत्यंत गंभीर, महत्त्वाच्या समस्यांचे प्रथम आकलन आणि नंतर निराकरण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये असावीत. (५) गतकाळातील पर्यावरणीय समस्यांच्या आधारावर सद्य:स्थितीत भेडसावणाऱ्या आणि भविष्यात उद्भवू शकणाऱ्या पर्यावरणीय समस्यांच्या अभ्यासाला प्राधान्य दिलेले असावे. (६) या समस्यांचे निराकरण करण्यासाठी किंवा भविष्यात पर्यावरणीय समस्या उद्भवणारच नाहीत यासाठी ज्या उपाय योजना असतील त्यासाठी स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर परस्परांमध्ये सहकार्य असण्याची आवश्यकता या शिक्षणातून अधोरेखित झाली पाहिजे. थोडक्यात, मानवी जीवनाची गुणवत्ता आणि त्याचे अस्तित्व कायम राखण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना जाणीवपूर्वक राबविण्याची क्षमता नागरिकांमध्ये विद्यार्थी अवस्थेपासून निर्माण करणे, हे पर्यावरण शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट असायला हवे. - डॉ. संजय जोशी मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org