श्रुती पानसे

एक माणूस दुसऱ्याचा अपमान करत असतो, तेव्हा दुसऱ्या माणसाच्या मेंदूत काय घडत असतं?

पालक, शिक्षक, प्राध्यापक किंवा वरिष्ठ अधिकारी वर्ग यांच्यापैकी कोणी अचानक, विशेष कारण नसताना अनपेक्षित अपमानास्पद टीका करतं. कोणी ओरडून बोलतं. लहान मुलांना किंवा वाढत्या वयातल्या मुलांना खूप बोलणी बसतात. मुलांच्या बाबतीत तर असं अनेकदा घडतं. असे प्रसंग अनेकांनी कितीदा तरी अनुभवले असतील. कोणाच्या तरी एका टिप्पणीमुळे मेंदूमध्ये अनेक हालचाली होतात.

सगळ्यात आधी ‘काहीतरी विपरीत / अप्रिय घडलं आहे’ याचा संदेश अ‍ॅड्रिनल ग्रंथींना जातो. या ग्रंथी कॉर्टिसॉलसारखी ताणकारक रसायनं निर्माण करतात. त्यामुळे मनात ताण निर्माण होतो. ही रसायनं कार्यरत झाल्यानंतर संपूर्ण शरीरामध्ये हालचाली निर्माण होतात. रक्तप्रवाहामध्ये ग्लुकोज सोडलं जातं. त्यामुळे रक्तप्रवाहाचा वेग वाढतो.  हृदयाकरवी विविध स्नायूंकडे हा रक्तप्रवाह पोहोचवला जातो. शरीराची  संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित होते. हे सर्व अवयव एकमेकांना जोडलेले असल्यामुळे संदेशवहन झटपट घडतं.

घडलेल्या गोष्टीला नक्की कोणत्या प्रकारे प्रतिसाद द्यायचा आहे हे तितक्याच झटपट ठरवलं जातं आणि कृतीत आणलं जातं. त्यानुसार स्नायू काम करतात. या प्रसंगात स्तब्ध थांबायचं आहे की उलट प्रतिसाद द्यायचा आहे की इथून लवकरात लवकर सटकायचं आहे, हे मेंदू ठरवतो. शरीराने दिलेल्या या प्रतिसादामुळे अप्रिय परिस्थितीतून माणसाची सुटका होते.

पण अशीच परिस्थिती वारंवार येत असेल तर त्या अपमान करणाऱ्या माणसाला टाळण्याची प्रवृत्ती निर्माण होते. जो माणूस आपला दरारा निर्माण करून इतरांना वाईट वागणूक देतो, तो माणूस आवडणं शक्य नसतं. पालक किंवा शिक्षक मुलांना केव्हा तरी रागावतात. पण ते जर मुलांचा वरचेवर अपमान करत असतील तर त्यांना बघून मुलांच्या मेंदूमध्ये नकारात्मक रसायनं निर्माण होतात.

यापुढे जाऊन काही मुलांवर किंवा व्यक्तींवरही असा प्रसंग इतक्या वेळा येतो की त्यांचा मेंदू असा ताण आला तरी वरीलपैकी कोणताच प्रतिसाद देत नाही. अशांची मग बोलीभाषेत ‘निर्लज्ज, निगरगट्ट’  अशा शब्दात संभावना केली जाते. वास्तविक अशा प्रसंगांना सामोरं जाण्याचा अतिरेक झाल्यामुळे मेंदूने दिलेली ती प्रतिक्रियाच असते.

contact@shrutipanse.com