बनारसी साडी नव्हे शालू हा देशभरातील स्त्रिया लग्नासाठी हमखास खरेदी करतात. त्याचे महत्त्व वर्षांनुवष्रे टिकून आहे. इतकेच नव्हे तर बनारसी शालूशिवाय लग्नच पार पडत नाही असे म्हटले तरी वावगे ठरू नये. उत्तर प्रदेशातील चंदौली, बनारस, जौनपूर, आजमगढ, मिर्जापूर आणि संत रविदासनगर या जिल्ह्यांतील विणकर या साडय़ा तयार करण्यात वाकब्गार आहेत. याला लागणारा कच्चा माल बनारस येथून येतो, त्यामुळे ही साडी सर्वदूर बनारसी साडी या नावाने ओळखली जाते. एके काळी बनारसची पूर्ण अर्थव्यवस्था या बनारसी साडीभोवती उभी होती. पण आत्ताचे चित्र निराशाजनक आहे, परंतु भारतभरचे या साडीचे स्थान लक्षात घेऊन विद्यमान पंतप्रधानांनी या विणकरांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यत्वे रेशमाचा वापर करून विणल्या जाणाऱ्या या साडीला जरीचा वापर करून विणलेले काठ आणि पदर असतात. पूर्वी जरीच्या निर्मितीमध्ये शुद्ध सोन्याचा आणि चांदीचा वापर केला जायचा. पण सोन्याचे व चांदीचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे आता त्याची जागा कृत्रिम जरीने घेतली आहे, तरी साडी विणण्याचे काम सुरू आहे. विविध प्रकारच्या नक्षीकामाचा वापर या साडीत केला जातो तर वेलबुट्टीचे नक्षीकाम काठात व पदरात वापरले जाते. याखेरीज या साडीवर रेशमाने किंवा जरीने भरतकामही केले जाते. भरतकामाची नक्षी नाजूक असते, त्यामुळे विणायला ती किचकट असते. या कारणाने साडी तयार व्हायला अधिक वेळ लागतो. एका साडीला पंधरा ते तीस दिवस इतका वेळ लागत्तो, कधी कधी सहा महिनेही लागतात. या साडीची किंमत ती साडी विणायला किती वेळ लागला त्यानुसार वाढत जाते आणि ते रास्तच आहे. जरीचा वापर आणि भरतकाम यामुळे साडीचे वजनही वाढते. हाही एक घटक साडीची किंमत वाढायला कारणीभूत ठरतो. या साडी उद्योगाने सुमारे बारा लाख लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. त्यामध्ये हातमागावर काम करणाऱ्या विणकरापासून ते पूर्वतयारी करणारे आणि भरतकाम करणारे असे सर्व कारागिर समाविष्ट आहेत. - दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org संस्थानांची बखर - उदयपूरची चलनव्यवस्था, डाकव्यवस्था उदयपूर संस्थानाचे अर्थकारण प्रामुख्याने संगमरवराचा व्यापार, शेती आणि जस्ताचे उत्पादन यावर अवलंबून होते. राज्याच्या मध्यभागात कापसाचे मोठे उत्पादन होई. त्यामुळे वस्त्रोद्योग फोफावला. कापडाचे रंगकाम, छपाई, विणकाम हे बहुधा मुस्लीम लोक करीत. हेच काम िहदूंमध्ये पटवा ही जमात करीत असे. त्या काळात भांग, दारू, गांजा ही व्यसने कुलीन वर्गात प्रतिष्ठेची समजली जात. सामान्य माणसाची भजन, किर्तन, भगत गणांचे नृत्य, दरबारी कार्यक्रम ही मनोरंजनाची साधने होती. ब्रिटिशपूर्व काळातही उदयपूर संस्थानाचे स्वतचे चलन होते. या चलनाचा उपयोग अधिकतर दोन राज्यांमधील व्यापारासाठी केला जाई. संस्थानाच्या कर्मचार्याना, दासांना चलन थोडय़ा प्रमाणात व जीवनावश्यक वस्तू अधिक प्रमाणात अशा स्वरूपात वेतन दिले जाई. अठराव्या व एकोणिसाव्या शतकात कवडय़ांचा उपयोग चलन म्हणून केला जाई. राणा उदयसिंहाने चांदीचे प्रमाण कमी ठेवून नाणी पाडण्यास सुरुवात केली. त्यांना चितौडी किंवा उदयपुरी सिक्के म्हणत. १२५ उदयपुरी सिक्क्यांचे मूल्य १०० अलमशाही सिक्क्यांबरोबर होते. संदेशवहनाची व्यवस्था प्रथम पारंपरिकच होती. प्रत्येक कुटुंबाचे ठरलेले न्हावी, सेवक, राजाचे भाट हेच पारिवारीक संदेश आदानप्रदान करीत. राजकार्यासाठी पदल (दोडायत), उंटस्वार, घोडेस्वार हे संदेश वहन करीत. व्यापारीक पत्रव्यवहार यात्रिकांमार्फत होई. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस मात्र राजकीय संदेश वहनासाठी ‘बामणी डाक’ व्यवस्था सुरू झाली. ब्राह्मणांना मारणे हे पाप समजले जाई, त्यामुळे ते सुरक्षितपणे संदेशवहन करीत. पुढे या मंडळींना डाकचा ठेका देण्याची पद्धत सुरू झाली. ठेकेदाराचे घर हेच मुख्य डाकघर झाले. राज्यात एका गावातून दुसऱ्या गावात जाताना माना (जकात) द्यावी लागे. काही काळ जकातीसाठी दाणी (ठेकेदारी) पद्धत सुरू झाली. रेल्वेची मालवाहतूक सुरू झाल्यावर प्रत्येक स्टेशनवर दाणीघर सुरू झाले. दा णीघरात माल उतरविण्यासाठी चुंगी (कर) घेतला जाई. सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com