डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

शालेय शिक्षण घेण्यासाठी मेंदूची जास्त गरज लागते आणि इतर शाळेबाहेरच्या गोष्टी शिकण्यासाठी कमी गरज लागते असं असतं का?

विविध विषयांचं आकलन आणि वाचनक्षमता, लेखनक्षमता, स्मरणशक्ती अशा काही मुद्दय़ांभोवती शाळेतले सर्व विषय हे फिरत असतात. पण मेंदूची क्षमता यापेक्षा किती तरी जास्त आहे, अफाट आहे. प्रचंड आहे. त्यांना संधी मिळाली नाही तर त्या अव्यक्तच राहतात. कल्पना करायची असेल तर एकूण बुद्धिमत्तेचा आवाका जर १०० टक्के मानला तर शाळेतल्या परीक्षांमधून मोजली जाणारी बुद्धिमत्ता पाच ते सात टक्के आहे. बुद्धिमत्तेचा खरा कस शाळेत लागत नाही. हा कस शाळेतच लागला पाहिजे अशी अपेक्षा करणं शक्यही नाही आणि आवश्यकही नाही.

दुसरं असं की, ज्या मुलामुलींना काही कारणाने या वरील मुद्दय़ांमध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही, त्यांचं काय? जगण्यासाठी केवळ मार्कलिस्ट महत्त्वाची नसते. आपल्यापैकी किती जण असे आहेत जे या शाळेत शिकवल्या गेलेल्या या आठ-दहा विषयांवर कायमस्वरूपी उदरनिर्वाह चालवतो? शाळेत असताना गणितात मार खाणारे मोठं झाल्यावर गणित वापरल्याशिवायही यशस्वी झालेले आहेत. किती तरी जण आपापला नोकरी-व्यवसाय उत्तम प्रकारे करतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत शालेय परीक्षांमध्ये यश मिळवल्याची मोठी खूण म्हणजे मेरिट लिस्ट होती. मात्र असं दिसतं की या लिस्टमध्ये झळकणारे सर्व जण आयुष्यात चमकदार कामगिरी करून दाखवतातच, असं नाही. म्हणजे यशस्वी आयुष्य आणि दहावीपर्यंतची मार्कलिस्ट यांचा संबंध मर्यादित आहे.

पण चित्र असं दिसतं की बहुतेक सर्व शाळांमध्ये केवळ या मुद्दय़ांवरच भर दिला जातो. त्यावर आधारित परीक्षा घेतली जाते. त्यावर पास-नापास ठरतं. इथपर्यंतही एकवेळ ठीक आहे, पण बुद्धिमत्ताही त्यावरच ठरवली जाते. यात खूप मोठी गफलत आहे. एखादं मूल बुद्धिमान आहे की नाही हे एक छोटी आणि अतिशय मर्यादित अशी गुणपत्रिका ठरवते. ही दु:खाची गोष्ट.

जितके विविधांगी अनुभव मुलं स्वत: घेतील, तितकी त्यांची बुद्धिमत्ता वाढत असते. मार्कलिस्टच्या बरोबर वर्कलिस्ट हवीच. यामुळे समाजातल्या अनुभवांचा अनमोल खजिना न्यूरॉन्सच्या रूपात साठत जातो. प्रत्येक वेळेला त्यांच्या वागण्याला हे अनुभवच दिशा देत असतात.