२०११ सालच्या जनगणनेनुसार सध्याच्या भारतीय प्रदेशात २.८० कोटी ख्रिस्ती धर्माचे लोक आहेत. इ.स. ५२ मध्ये तत्कालीन तामिळकम् या प्रदेशातील मुझिरीस या गावात येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपकी सेंट थॉमस हा ख्रिश्चन धर्म प्रचारासाठी आला. मुझिरीस हे गाव सध्या केरळ प्रांतात आहे. सेंट थॉमसने केरळ आणि गोव्याच्या किनारपट्टीत ख्रिस्ती धर्मप्रचाराचे काम करून अनेक स्थानिक लोकांचे धर्मातर केले. त्याने धर्मातर केलेल्या सुरुवातीच्या ख्रिश्चनांना ‘सीरियन ख्रिश्चन’ म्हणतात. अशा प्रकारे इसवी सनाच्या पहिल्या शतकात ख्रिश्चन धर्माचा प्रवेश भारतीय प्रदेशात झाला. ख्रिश्चन धर्माचा विस्तार दक्षिण भारतातील केरळ, तमिळनाडू, गोवा आणि ईशान्य भारतात अधिक झाला. सहाव्या शतकात केरळ आणि गोव्यात या सीरियन ख्रिस्ती लोकांची संख्या बरीच वाढली. सेंट थॉमस तत्कालीन तमिळनाडूत आला त्यापूर्वी त्या प्रदेशात ज्यू लोकांची एक छोटी वसाहत होती. ख्रिश्चन धर्माची दिक्षा प्रथम घेणारे हे ज्यू लोकच होते. सेंट थॉमसने केरळात कोंडूगलूर, पलायूर, कोल्लम, कोकामंगलम वगरे ठिकाणी एकूण आठ चच्रेस बांधली. सेंट थॉमस हा सीरियातला धर्मोपदेशक असल्याने त्याने बाप्तिस्मा दिलेल्या ख्रिश्चन समाजाला सीरियन ख्रिश्चन हे नाव पडले. त्यामुळे सीरियन ख्रिस्ती समाजाचे लोक फक्त केरळातच आढळतात. पुढे हा ख्रिस्ती समाज इतर मल्याळी समाजात पूर्णपणे मिसळला. मल्याळम भाषा, मल्याळी पेहेराव आणि चालीरीती त्यांनी स्वीकारल्यामुळे ते भारतीयच झाले आहेत. १४ व्या शतकात एका फ्रेंच मिशनऱ्याने गुजरातमध्ये ख्रिस्तीधर्म प्रसार केला. भारतीय प्रदेशात रोमन कॅथलिक हा ख्रिश्चन पंथ सोळाव्या शतकात पोर्तुगीज, इटालियन आणि आयरिश मिशनऱ्यांनी आणला. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतामध्ये प्रोटेस्टंट हा ख्रिश्चन पंथही आला. कॅथलिक पंथ संपूर्ण भारतीय उपखंडात झपाटय़ाने वाढला. बहुतेक ख्रिश्चन समाज आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी स्थानिक भाषा वापरतो. त्यांचे बायबल वगरे धर्मग्रंथही विविध स्थानिक भारतीय भाषांमध्ये अनुवादित आहेत. त्यांच्या चच्रेसनी भारतीय प्रदेशात अनेक शिक्षण संस्था आणि इस्पितळे चालवून देशाच्या विकासाला हातभार लावला आहे. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com