तंजावरचे राज्य भोसले घराण्याच्या मराठा राज्यकर्त्यांनी १६७५ साली घेतले. त्यापूर्वी तेथे इ.स. १५३५ ते १६७५ या काळात नायक या घराण्याचे राज्य होते. या नायकांनी स्वतच्या कुटुंबीयांसाठी १५६० साली एक छोटेखानी ग्रंथसंग्रहालय आणि वाचनालय तयार केले होते. या वाचनालयास त्यांनी ‘रॉयल पॅलेस लायब्ररी’ किंवा ‘सरस्वती महाल लायब्ररी’ असे नाव दिले होते. ट्रांकोबारहून जवळच असलेल्या तंजावरात श्वार्ट्झचे वरचेवर जाणे-येणे असे. तंजावरच्या अशाच एका मुक्कामात नायक राजांच्या ग्रंथसंग्रहालयातील धूळ खात पडलेली पुस्तके श्वार्ट्झने बाहेर काढून त्यांचे व्यवस्थित वर्गीकरण करून ती वरवर चाळून बघितली. या ग्रंथसंग्रहात काही तालपत्रम् म्हणजे ताडाच्या पानावरील प्राचीन हस्तलिखिते पाहून चकित झालेल्या श्वार्ट्झला अशी दुर्मीळ झालेली हस्तलिखिते आणि ग्रंथ जमवून त्यांचे व्यवस्थित जतन करण्याची कल्पना सुचली. तंजावरचे तत्कालीन राजे तुळसाजी यांचा पुत्र सरफोजी यालाही श्वार्ट्झचा मोठा लळा लागला होता. पुढे १७८७ साली तुळसाजीच्या मृत्यूनंतर तुळसाजीचा सावत्रभाऊ अमरसिंग याने गादीचा खरा वारस सरफोजीला पदच्युत करून कैद केले आणि स्वतस तंजावरचा राजा म्हणून घोषित केले. या घटनेची माहिती श्वार्ट्झने मद्रास येथील कंपनी सरकारला देऊन या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. श्वार्ट्झच्या मागणीप्रमाणे कंपनी सरकारने सरफोजीला मुक्त करून अमरसिंगास हद्दपार केलं. श्वार्ट्झने सरफोजीस तंजावरचा राजा घोषित करून स्वत त्याचे पालकत्व स्वीकारले. श्वार्ट्झला तंजावरचे राज्यकत्रे, त्यातही विशेष म्हणजे सरफोजीराजे भोसल्यांबद्दल इतकी आत्मीयता निर्माण झाली होती की त्यांचे शिक्षण आणि राज्यकारभाराविषयी मार्गदर्शनाची संपूर्ण जबाबदारी श्वार्ट्झने घेतली. सरफोजीला शिक्षण घेण्यासाठी श्वार्ट्झने मद्रासला पाठविलं. सरफोजी मद्रासमध्ये असताना श्वार्ट्झ नियमितपणे तिथे जाऊन त्याची विचारपूस करीत असे. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com