आपण पूर्वी हे पाहिले की भारतामध्ये कापसाचे उत्पादन व त्याचा सूत व कापड बनविण्यासाठी वापर जगामध्ये सर्वात प्रथम सुरू झाला; परंतु भारतामध्ये पिकविला जाणारा कापूस हा आशियाई किंवा जुन्या जगातील कापसाच्या जातींपकी असल्यामुळे या कापसाचा दर्जा व उत्पादकता खूपच कमी होती. भारतामध्ये कापसाच्या जातींमध्ये सुधारणा करण्यासाठी संशोधन इ. स. १९०१च्या सुमारास सुरू झाले. कापसाच्या तंतूची लांबी वाढवणे आणि तलमता सुधारणे या बाबींचा संशोधनामध्ये समावेश होता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच देशी जातीच्या कापसाच्या अनेक वाणांचा वापर लागवडीसाठी सुरू झाला होता. ही देशी जातीची वाणे साधारणपणे दोनशे दिवसांत पक्व होत असत. कापसावर पडणारे रोग, उत्पादनावर परिणाम करणारे कीटक आणि पाण्याची कमतरता यांना प्रतिरोध करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये पूर्वीच्या कापसांपेक्षा अधिक होती. त्या वेळी कापसाच्या विकासावर केले जाणारे संशोधन हे मुख्यत: कापसाच्या पिकाला लागणारा कालावधी कमी करणे व प्रति हेक्टरी उत्पादन वाढवणे या प्रमुख बाबींवरच केंद्रित झाले होते. कंबोडियामध्ये पिकविल्या जाणाऱ्या अमेरिकन जातीच्या कापसाच्या लागवडीचे प्रयत्नही तामिळनाडूमध्ये त्या काळात झाले. पुढे या कापसाच्या जातीचा प्रसार तामिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्य़ात झाला आणि त्यामुळे या कापसास ‘तिरुवनवेल्ली अमेरिकन’ असे नाव पडले. हा कापूस नंतर तामिळनाडूच्या इतर भागातही पसरला आणि तो ‘कंबोडिया कॉटन’ या नावाने प्रसिद्ध झाला. या कापसाच्या लागवडीने तामिळनाडूमध्ये जििनग (सरकी काढणे), सूतकताई आणि विणाई व्यवसायाच्या भविष्यातील भरभराटीचा पाया घातला गेला. पुढे ‘सीओ २ (CO -2)' या नावाने प्रसिद्ध झालेल्या कापसाच्या वाणाचा विकासही या कंबोडियन अमेरिकन कापसाच्या जातीपासूनच झाला. १९७०च्या सुमारास ‘एम.सी.यू.’ (मद्रास- कंबोडिया-युगांडा) या नावाने अतिशय तलम अशा संकरित कापसाच्या वाणांची शृंखला विकसित करण्यात आली. तिचे मूळ ही कंबोडियन जातीच्या कापसातच आहे.चं. द. काणे (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.orgसंस्थानांची बखर - नागोद संस्थानची राजघराणीमध्य प्रदेशातील सतना या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २७ किमी.वर असलेले नागोद शहर स्वातंत्र्यपूर्व काळात एक महत्त्वाचे संस्थान होते. नागोद हे पूर्वी तेलाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात कनोजहून आलेल्या राजपूत प्रतिहार घराण्याच्या लोकांनी नागोदच्या तेल व्यापाऱ्यांना नागोदबाहेर काढून स्वत:चे राज्य स्थापन केले. नागोदचे नाव पूर्वी अंछारा असे होते. इसवी सन १४७८ मध्ये राजा भोजने अंछारा घेऊन काही काळ तिथे आपली राजधानी केली. अग्निकुल किंवा अग्निहोत्री राजपूत वंशाचे ‘प्रतिहार’ हे मूळचे माउंट अबूचे राहणारे. १६८५ साली प्रतिहार नेता राजा फकीर शाह याने नागोद येथे आपले राज्य स्थापन केले. त्याने आपल्या राज्यक्षेत्राचा मोठा विस्तार केला. परंतु अठराव्या शतकात त्यांचा मोठा प्रदेश बाघेला आणि बुंदेला राज्याकर्त्यांनी हडप केला. १८०३ साली वसईच्या तहानंतर ब्रिटिशांचे बुंदेलखंडावर वर्चस्व होऊन नागोद राज्य पन्नाचे खंडणीदार झाले. अखेर, १८१० साली मराठय़ांच्या आक्रमणाच्या भीतीमुळे नागोद राजा शेवराज सिंग याने कंपनी सरकारच्या तनाती फौजेचे संरक्षण घेतले. १३०० चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरलेल्या नागोद संस्थानात ३३५ खेडी आणि दोन शहरे अंतर्भूत होती. नऊ तोफ सलामीचा बहुमान असलेल्या या संस्थानची १९०१ साली, लोकसंख्या ६७०० होती. १८३० साली नागोदच्या वारसाने त्याच्या भावाचा खून केला. त्या काळी इतर काही संस्थानांचे राजे ब्रिटिशांना अशा बाबतीत सल्लागाराचे काम करीत. त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे ब्रिटिशांनी त्या वारसदाराचा वारसा हक्क रद्द करून त्याचा भाऊ राघवेंद्रसिंगला राजेपद दिले. राघवेंद्रने १८५७ च्या बंडात ब्रिटिशांना साथ दिल्यामुळे त्याला त्यांनी आणखी दहा खेडी जहागीर दिली. सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com