सामान्यपणे मोजमापन व्यक्त करण्यासाठी संख्यांचा उपयोग करतात. संख्यालेखन ही भारताने जगाला दिलेली बहुमूल्य देणगी आहे. संख्यालेखन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर दशमान पद्धतीने केले जाते. दशमान पद्धतीने केलेले संख्यालेखन म्हणजे १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि ० या दहा अंकचिन्हांचा उपयोग करून लिहिलेली संख्या होय. म्हणून दशमान पद्धतीला काही जण दशचिन्ह पद्धत असेही म्हणतात. संख्येमधील प्रत्येक अंकाला एक दर्शनी किंमत असते आणि एक स्थानिक किंमत असते. सामान्यपणे संख्यावाचन करताना अंकाच्या स्थानिक किमतीनुसार संख्या वाचन केले जाते. एकक, दशक, शतक, हजार, लाख, कोटी, . तर इंग्रजी भाषेत युनिट, टेन्स, हण्ड्रेड, थाऊजंड, लॅक्स, क्रोर्स, बिलियन, मिलियन, ट्रिलियन या दशगुणोत्तरी पारिभाषिक शब्दांचा उल्लेख होत असतो, हे आपल्याला माहीत आहेच. अंशित एककांसाठी पिको, नॅनो, मायक्रो, मिली, सेन्टी, डेसि या दशगुणित शब्दांचा उपयोग करता येतो. तसेच गुणित एककांसाठी डेका, हेक्टो, किलो, मेगॅ, गिगॅ, टेरॅ, पेटा, एक्झा, जेट्टा, योट्टा, इ. शब्दांचा उपयोग करून घेतला जातो. हे देखील दशगुणोत्तरी पारिभाषिक शब्द आहेत. भास्कराचार्य (द्वितीय) यांनी लिहिलेल्या ‘सिद्धांत शिरोमणी’ या ग्रंथातील लीलावती या विभागात असलेल्या २६१ श्लोकांपकी अकरावा आणि बारावा हे दोन श्लोक आपल्याला दशगुणोत्तरी शब्दांची यादी देतात, ते श्लोक पुढीलप्रमाणे, एकदशशत सहस्रायुत लक्ष प्रयुत कोटय़: क्रमश: । अर्बुदम्ब्जं खर्व निखर्व महपद्म शंकवस्त स्मात ।।११।। जलिधचात्यं मध्यं परार्धमिती दशगुणोत्तरं संज्ञा । संख्या: स्थानानां व्यवहारार्थ कृता: पूर्वे: ।।१२।। याशिवाय प्राचीन भारतीय ग्रंथांमध्येही दशगुणोत्तरी संज्ञा सापडतात. ‘एक (एकं), दशं (दहा), शतम् (शंभर), सहस्र (हजार), दशसहस्र (दहा हजार), लक्ष (लाख), दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील, शंख, दशशंख, क्षिती, दशक्षिती, क्षोभ, दशक्षोभ, ऋद्धी, दशऋद्धी, सिद्धी, दशसिद्धी, निधी, दशनिधी, क्षोणी, दशक्षोणी, कल्प, दशकल्प, त्राही, दशत्राही, ब्रह्मांड, दशब्रह्मांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचूर, दशपचूर, लय, दशलय, फार, दशफार, अषार, दशअषार, वट, दशवट, गिरी, दशगिरी, मन, दशमन, वव, दशवव, शंकू, दशशंकू, बाप, दशबाप, बल, दशबल, झार, दशझार, भार, दशभार, वज्र, दशवज्र, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंभ, दशडंभ, कैक, दशकैक, अमित, दशअमित, गोल, दशगोल, परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंत.’ दशअनंत म्हणजे एकावर शहाण्णव शून्ये! - प्रा. दिलीप गोटिखडीकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org ‘अकिलन’ यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध कथा-कादंबरी लेखक पी. व्ही. अखिलानन्दम ऊर्फ ‘अकिलन’ यांच्या १८ कादंबऱ्या, १५ कथासंग्रह, ५ निबंधसंग्रह, बालसाहित्य, प्रवासवर्णन, एक नाटक, कला आणि साहित्य या विषयांवरील ‘कथइकलाई’ व ‘पुडिया विलुपु’ ही दोन पुस्तके- अशी सर्व मिळून ४५ पुस्तके तामिळ भाषेत प्रकाशित झाली आहेत. तामिळएवढाच त्यांचा इंग्रजी भाषेचा व्यासंगही मोठा होता. १९३९ मध्ये त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यांची ‘पेन’ ही पहिली कादंबरी १९४७ मध्ये प्रसिद्ध झाली ‘कलैमगल’ या तामिळी भाषेतील प्रसिद्ध मासिकाच्या स्पर्धेत. या कादंबरीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. या कादंबरीचा आशय थोडाफार त्यांच्या आयुष्याशी निगडित आहे. त्यांच्या वडिलांची, त्यांनी आयसीएस ऑफिसर (सनदी अधिकारी) बनावे ही इच्छाच, कथावस्तू म्हणून आलेली आहे. या कादंबरीचा नायक पत्नी व पित्याच्या आग्रहावरून इंग्लंडला जातो, आयसीएस होतो; पण भारतात आल्यावर हे यश बाजूला सारून स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतो. तिचे हिंदी, बंगाली, कन्नड, मल्ल्याळम् इ. भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत. ‘पेन’ कादंबरी वयाच्या २३ व्या वर्षी अकिलन यांनी लिहिली आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्मा आणि मलेशिया या देशांत इंग्रज सैन्याबरोबर जो संघर्ष सुरू केला होता- त्याबद्दल अकिलन यांच्या मनात आदर होता. इंडियन नॅशनल आर्मीच्या अनेक सैनिकांबरोबर आणि सेनापतींबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या या अनुभवाची अभिव्यक्ती म्हणजे ‘नेजिन अलैगल’ ही कादंबरी. १९५१ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला १९५५ मध्ये तामिळ अकादमीचा पुरस्कार मिळाला. अकिलन यांनी ऐतिहासिक कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. १९६१ मध्ये त्यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी ‘वेंगैयिन मैन्दन’ प्रकाशित झाली. चोला राजघराण्याचा इतिहास सांगणारी ही कादंबरी लक्षावधी वाचकांनी वाचलेली लोकप्रिय कादंबरी आहे. शिवाजी गणेशन यांनी या कादंबरीवर आधारित नाटकात काम केले आणि हे नाटकही लोकप्रिय झाले. या कादंबरीला १९६३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.पांडियन राजवटीच्या काळात घडणारी त्यांची ‘कयाल विषि’ ही ऐतिहासिक कादंबरी १९६५ मध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीवर एम. जी. रामचंद्रन यांनी चित्रपट बनवला, तोही लोकप्रिय ठरला. - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com