कृषिशास्त्रज्ञांना कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा शिरकाव करण्याचे तंत्र अवगत झाल्याने कृषी क्रांतीची नवी दिशा नव्वद व त्यापुढील दशकात सापडली आहे. जैवतंत्राचा उपयोग करून नवीन वाणांच्या निर्मितीच्या कार्यामध्ये उतीसंवर्धनाचा वाटा फार मोठा आहे. सध्या उतीसंवर्धनाची केळी, ऊस यांसारख्या पिकांची रोपे उपलब्ध झाल्यामुळे उत्तम गुणधर्माची पिके जोपासता येत आहेत. ज्या दोन जातींच्या फुलांचा परस्परांशी संकर घडवून आणता येत नाही, त्यांचा अलंगिक संकर उतीसंवर्धनाच्या तंत्राने घडवून आणता येतो.
युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरच्या शास्त्रज्ञांना खाद्य बटाटा व रानटी बटाटा याच्या पेशींच्या उतीसंवर्धन माध्यमात संकर घडवून आणण्यात यश मिळाले आहे. या तंत्रामध्ये संकरित पिकांची रोपे आणि कृत्रिम बीज यांचाही समावेश आहे. या तंत्राने विशिष्ट गुणधर्माची लावणीयोग्य रोपेही तयार करता येतात. उतीसंवर्धनाचा वापर करून एका रोपापासून केवळ काही महिन्यांमध्ये लक्षावधी रोपे तयार करण्याचे तंत्र शास्त्रज्ञांना अवगत झाले आहे. वनस्पतीच्या गुणसूत्रामधील जनुकांच्या कार्यपद्धतीसंबंधी मूलभूत माहिती काही अंशी शास्त्रज्ञांना मिळाली आहे.
व्यावसायिक स्पर्धा, खुली व मुक्त बाजारपेठ, दर्जा आणि लोकांची आवड व उच्च दर्जाच्या कृषिमालाची मागणी यामुळे भावी काळामध्ये कृषी क्षेत्रात कापूस, टोमॅटो, काही प्रमाणात फळे, केळी, गहू, तांदूळ या पिकांप्रमाणेच भाजीपाला, फळभाज्या, हंगामी फळे-फुले, शोभेच्या वनस्पती, आयुर्वेदीय दुर्मीळ वनस्पती, चारापिके इत्यादीमध्येही उतीसंवर्धन जैवतंत्रज्ञान वापरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
हे तंत्र वापरून नसíगकरीत्या हिरवा, निळा, गुलाबी, लाल, पिवळा इत्यादी रंगछटा असणारा उत्तम दर्जाचा कापूस, धागे, वस्त्र तयार करण्याकरिता उत्पादन करण्याचे यशस्वी प्रयोग काही पाश्चिमात्य राष्ट्रांनी सुरू केले आहेत. या तंत्रज्ञानाने बासमतीसारख्या सुवासिक व उत्पादकतेत व गुणधर्माने अग्रेसर असणाऱ्या तांदळाच्या वाणांनी बाजारपेठ काबीज करण्याचे प्रयत्न होत आहेत. आपल्याकडे कोबी, फ्लॉवर, वांगी, मिरची, हरभरा, भुईमूग, तूर, मका, कापूस, मोहरी, बटाटा, भात, आले, ऊस, केळी इत्यादी पिकांच्या प्राथमिक चाचण्या या तंत्रज्ञानाने घेतल्या जात असल्या तरी पर्यावरण संतुलनाच्या कारणामुळे याबाबत साशंकता आहे.

वॉर अँड पीस  वातविकार : भाग ७
कल्याणहून नाशिकला रेल्वेमार्गाने जाताना खर्डी एक छोटेसे रेल्वे स्टेशन आहे. तिथून वैतरणा धरणाकडे जाता येते.  या धरणाच्या बांधकामाची कथा, आत्ताच्या ‘कोटी कोटी बजेटच्या उड्डाणाच्या कथा’ वाचणाऱ्यांना अविश्वसनीय वाटेल. महाराष्ट्राच्या धरण बांधकाम इतिहासात ‘अगा नवलचि घडले’. बांधकाम ठरलेल्या वेळेच्या अगोदर व कमी बजेटमध्ये झाले! वरिष्ठांच्या परवानगीने  या प्रल्पावरील एका दत्तप्रेमी इंजिनीअरने तेथे एक प्रार्थना मंदिर बांधले. त्यात मूर्तीऐवजी श्रीदत्तगुरूंचा फोटो ठेवला. नित्य पूजेकरिता एक वृद्ध ब्राह्मण ठेवले.
हे गृहस्थ चालायला लागले की किंचित कंप पावायचे, लंगडल्यासारखे चालायचे. अशा विकारास ‘कलायखंज’ असे म्हणतात. माझे गुरुजी कर्ममहर्षी वैद्यराज बा. न. पराडकर यांचे हे पुजारी मित्र होते. गुरुजींनी जणू काही माझी परीक्षा पाहण्याकरिता या गृहस्थांना एक दिवस पुण्यास आणून माझ्यासमोर उभे केले व योग्य ते उपचार करावयास फर्मावले.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे विविध रोगांचे ढोबळमानाने १४० प्रकार; वाताचे ८०, पित्ताचे ४० व कफाचे २० असे गणले जातात. अष्टांग हृदय नि. १६/४६ या श्लोकात कलायखंज विकाराचे नेमके वर्णन आहे. हे गृहस्थ दत्तउपासक, एकभुक्त व म्हणून अत्यंत कृश व बुटके होते. त्यांना स्ट्राँग औषधे चालली नसती. अलीकडे अनेकानेक वातविकारांकरिता मी आठआठ प्रकारचे गुग्गुळ कल्प देत असतो.  
या धार्मिक दत्तोपासकांना मी पायाच्या बोटापासून कमरेपर्यंत कोणत्याही तेलाचे अभ्यंग- मसाज नव्हे, हे समक्ष करून दाखविले. सोबत एक महिन्याकरिता लाक्षादि, त्रिफळा, गोक्षुरादि, सिंहनाद, वातगजांकुश प्र. ३ गोळय़ा, दोन वेळा घ्यावयास सांगितल्या. दोन्ही जेवणानंतर एरंडेल तेलावर परतलेली सौभाग्य सुंठ घ्यावयास सांगितले. एक महिन्याने वैतरणातील श्रीगुरुदेवदत्त तसबिरीचे दर्शन घेण्यास गेलो. वृद्ध गुरुजी न लंगडता चालत होते.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

जे देखे रवी..   एक अजब कर्मकहाणी
ही माझी कर्मकहाणी गेली ३५ ते ४० वर्षे चालली आहे. ज्ञानेश्वरांच्या एका ओवीत गावे बसविणे, उद्याने उभी करणे (किंवा धर्मशाळा बांधणे) ही कर्मे चळवळ्या आणि उपद्व्यापी रजोगुणी माणसाच्या हातून घडतात, असे लिहिले आहे. तेव्हा या कर्मात एका उद्यानाची उभारणी झाली असल्यामुळे आणि या कर्मात माझा पुढाकार होता, असा भ्रम मला झाल्यामुळे मी रजोगुणी ठरतो, असे उत्तर मिळते. ‘तू आकाशात भरारी मारून सूर्याला जवळून पाहत असशील, पण मी जमिनीवर तुरुतुरु चालते तेव्हा गवतावरच्या दवाच्या थेंबात मलाही सूर्याचे दर्शन घडते, असे मुंगीने गरुडाला म्हटल्याचे थिरूवलुवर या दाक्षिणात्य कवीने म्हटले आहे. मी एक मुंगीच. काळी नव्हे लाल. कारण मला चावण्याची सवय आहे. मी जेव्हा या उद्यानासंबंधात तुरुतुरु चालले तेव्हा मला माझ्या मर्यादित अवकाशात अनेक दर्शने घडली. त्यातले सगळ्यात महत्त्वाचे दर्शन घडले माझ्याच स्वभावाचे. मी दुराग्रही नाही, पण चिवट, लबाड आणि हट्टी आहे, असे ते दर्शन होते. दुसरे दर्शन झाले ते जनमानसाचे. जनमानस मूलत: बघे असते, काही घडत असेल तर गर्दी करते, पण अंगावर फार येऊ लागले तर घटना आणि घटनाकार या दोघांना सोडून पांगू शकते. तिसरे दर्शन घडले नोकरशहांचे. सगळी माणसे जशी चांगली असतात तशी ही नोकरदार मंडळीही मूलत: चांगलीच असतात, पण त्यांची काम करण्याची पद्धत एका चौकटीत बंदिस्त असते. या चौकटीत बसूनच ती मंडळी हातवारे करतात. जी चाणाक्ष असतात ती अशा तऱ्हेने हातवारे करतात की कार्य सुलभ व्हायला मदत होते. इतर ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकात ‘हे गाढव स्थितप्रज्ञ आहे का’ असा जो प्रश्न विचारला जातो त्यांची आठवण करून देतात, पण हा दोष नोकरदारांचा नसतो, तो दोष परिस्थितीजन्य असू शकतो. नोकरदार गाढवाऐवजी वाघासारखा लागू लागला तर राज्यकर्ते थोडा वेळ कौतुक करतात. मग ते आणि इतर नोकरदार मिळून या वाघाला जेरबंद करून गवत खायला लावतात. राहून राहिले राजकारणी आणि राज्यकर्ते. यांची वर्णने करणे अशक्य आहे, ही मंडळी ए७ूं३’८ काय करतात, आपण यांना का निवडून देतो, यांच्यावर आपण एवढे पैसे का खर्च करतो, यांना आपण उशिरा येतात तरी समारंभाला का बोलावतो, हे पैसे खातात की आपण त्यांना भरवतो आणि आपल्या तात्पुरत्या आणि संकुचित गरजा भागविण्याची दूरदृष्टी यांना कोण देते आणि हे तत्कालीन वाघ-सिंह निवृत्त झाल्यावर किंवा केले गेल्यावर कशी गुजराण करतात याचे दर्शन मात्र अजून अस्पष्ट आहे. कर्मकहाणीचा पूर्वरंग पुढच्या वेळी.
 रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत  २९ जून
१८७१ > ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा- प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे लोकप्रिय महाराष्ट्रगान लिहिणारे कवी, समीक्षक, विनोदी लेखक, नाटककार आणि कथा-कादंबरीकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म.  ‘गीतोपायन’ या काव्यसंग्रहात त्यांचे महाराष्ट्रगीत आहे, तर वीरतनय, मूकनायक, प्रेमशोधन आदी १२ नाटके, ‘दुटप्पी की दुहेरी’ ‘श्यामसुंदर’ या कादंबऱ्या, काही कथा आदी साहित्य त्यांच्या नावावर आहे.
१९१८> लेखक, पत्रकार, ग्रंथालयाचे व्यवस्थापक रामचंद्र केशव लेले यांचा जन्म. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास या ग्रंथातून त्यांनी मराठी पत्रकारितेचे टप्पे मांडले. ग्रंथवर्णन व ग्रंथसूची ही दोन पुस्तकेही त्यांचीच.
१९६६> प्राच्यविद्यापंडित, गणितज्ञ, समाजचिंतक आणि साहित्यिक दामोदर धर्मानंद (डीडी) कोसंबी यांचे निधन.
१९८१> मराठी कथेला नवी उंची देणारे,  दिगंबर बाळकृष्ण मोकाशी यांचे निधन. जरा जाऊन येतो, काय रानटी लोक आहेत, लामणदिवा, वणवा आदी ११ कथासंग्रह, ‘देव चालले’ आणि ‘आनंदओवरी’ या कादंबऱ्या आणि ‘पालखी’ व ‘अठरा लक्ष पावलं’ ही प्रवासस्पंदने त्यांनी लिहिली. ‘गुपित अंधारदरीचे’ ही किशोरकथाही त्यांचीच.
संजय वझरेकर