वस्त्रांचे रंग व त्यांच्या संस्करण पद्धती कशा विकसित होत गेल्या हे सविस्तरपणे समजावण्यात येईल. अत्यंत प्राचीन पद्धती- एका घमेल्यात आधी सोडा वा तत्सम रसायन टाकून कपडे साफ करणे व ते नंतर धुणे, वा नंतर पाणी व रंग टाकून ते रंगवण्यासाठी तापवायला ठेवणे.
यंत्रांच्या शोधाने या प्रक्रिया आता यंत्रात होतात, हे सत्य जरी तसेच राहिले असले तरी त्याला रंग रसायनशास्त्रात झालेला विकास पण तितकाच कारणीभूत आहे. यंत्रामध्ये सर्व प्रक्रिया अंककीय (इलेक्ट्रॉनिक/ डिजिटल) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने- म्हणजेच ‘ई डाइंग’ या स्वयंचलित पद्धतीने होतात. या तंत्रज्ञानाने व त्यातील संपूर्ण स्वयंचलित वस्त्रसफेदीच्या प्रक्रियांमध्ये पण पूर्णत्व आले. जसे वस्त्र रंगवता येते, तसे धागे वा तंतूंची रंगपद्धती प्रचलित आहे. या सर्व तंत्रज्ञानात अतुलनीय क्रांती झाल्याने रंगसफेदी, रंगामध्ये सखोलत्व, सातत्याने समानता व रंगाचा टिकाऊपणा या गुणांमध्ये वृद्धी झाली.
 वरील चित्रातील यंत्राने याची थोडी कल्पना यावी. पूर्वी डायरेक्ट, व्हॅट इत्यादी रंग वापरले जात. आता व्हॅटच्या व रिअ‍ॅक्टिव्ह रंगांच्या संशोधनाने साधलेली प्रगती प्रशंसनीय आहे. पूर्वी रंगकाम हे विभागात्मक (बॅच) पद्धतीने व्हायचे. त्यामुळे रंगाच्या समानतेवर नियंत्रण ठेवणे कठीण असायचे.
वरील चित्रातील विकसित अखंड रंगकामाच्या संशोधनाने अनेक प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे. यामुळे रंगाची बचत, पाण्याची बचत झाली. या सर्वाचा आढावा यावरील लेखमालेत घेतला जाईल.
रंगातील अत्यंत प्रगत संशोधनाने वरील सर्व फायदे अनुभवास आले, तसे त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम पण लक्षात आले. पर्यावरणाच्या बाबतीत पण संशोधनातील प्रगती वाखाणण्याजोगी आहे. या सर्वावर या लेखमालेमधून प्रकाश टाकण्यात येईल. आधुनिक रंगपद्धती व त्याचे ग्राहकाला काय फायदे-तोटे आहेत, हे सुद्धा सामान्य माणसाला समजून येईल. पर्यावरण संबंधित निर्माण झालेली चिंता व त्यामुळे पर्यावरण पोषक रंगपद्धती रसायनशास्त्राच्या विकसित (सस्टेनेबल केमिस्ट्री) संशोधन पद्धतीने होणारे वस्त्राचे रंगकाम या अत्यंत आधुनिक पद्धतीवरही प्रकाश टाकण्यात येईल. एका र्सवकष दृष्टिकोनातून या सदरातील लेखांची रचना करण्यात आलेली आहे.
श्वेतकेतू

संस्थानांची बखर ब्रिटिशांचे सत्तासंपादन
प्लासी आणि बक्सर विजयांमुळे  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला चार प्रांतांमधील एकूण चार लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या प्रदेशाचा महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला! ही कंपनीच्या सत्तासंपादनाची भविष्यातली नांदीच म्हणता येईल. प्लासीची लढाई ही ब्रिटिशांनी भारतीय भूमीवर जिंकलेली पहिली अधिकृत लढाई होती. या विजयांमुळे तत्कालीन भारताच्या एकूण क्षेत्रापकी एक अष्टमांश क्षेत्र ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्चस्वाखाली आले. यापुढे कंपनीने व्यापार हाच आपला हेतू न ठेवता राज्यस्थापना आणि विस्तार हे आपले प्रमुख ध्येय ठरविले.
या विजयामुळे ब्रिटिश सम्राज्याचा केवळ भारतातच नव्हे , तर आशिया खंडातील विस्ताराचाही पाया घातला गेला. यानंतर त्यांनी निरनिराळ्या कारवाया करून भारतात आपले राज्यक्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न यशस्वी केला. १७७३ साली ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता येथे आपले प्रमुख प्रशासकीय ठाणे स्थापन करून वॉरन हेस्टिंग्ज याला भारतातील आपल्या पहिल्या गव्हर्नर जनरलपदी तेथे नियुक्त केले. अशा प्रकारे कंपनी सरकारची भारतातील प्रशासकीय सुरुवात झाली.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर तीन अँग्लो-मराठा युद्धांमधील कंपनी सरकारच्या विजयांमुळे तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सरकार ही दक्षिण आशियातील एक प्रबळ सनिकी शक्ती म्हणून उदयाला आली! यानंतरही कंपनीचा राज्यविस्तार सुरूच राहिला होता.
सुनीत पोतनीस –  sunitpotnis@rediffmail.com