सर्व व्यक्तींची निवड भागवायचा मार्ग आहे, रंगातील विविधता. त्याकरिता जबाबदार आहेत सेंद्रिय रसायने आणि असेंद्रिय रसायने. पूर्वी जेव्हा लोकसंख्या कमी होती, जनतेच्या गरजा कमी होत्या, यंत्रयुगाचा उदय व्हायचा होता, खनिज तेलाचा शोध लागायचा होता, त्या वेळी मुख्यत्वे नसíगक रंगच वापरले जात होते. त्याकरिता विविध वनस्पतींचा वापर केला जात होता. वनस्पतींची फुले, साली, पान यांचा वापर होत असे. तसेच खनिजांचा वापरही होत असे.
मुख्य रंग म्हणून लाल, पिवळा आणि निळा हे रंग ओळखले जातात. तर काळा, पांढरा हे दोन उपरंग म्हणून वापरले जातात. या रंगाचे वेगवेगळ्या प्रकारांनी मिश्रणे करून असंख्य रंगछटा मिळवता येतात. उदाहरण म्हणून रेशमाला पिवळा रंग द्यायचा असेल तर तो तयार करण्यासाठी चोर हळद, हरसिंगारच्या काडय़ा, करडीची फुले, झेंडूची फुले आणि पिवळी माती यांचा वापर केला जात असे. या मातीच्या रंगाचा वापर अजिंठय़ामधील चित्रांमध्येही मोठय़ा प्रमाणात केलेला आढळतो. कारण, या मातीच्या रंगावर सूर्यप्रकाश आणि ओलसरपणा याचा परिणाम होत नाही. भिंती रंगवण्यासाठी पिवळ्या रंगात चुना मिसळून हा रंग फिका करता येत असे किंवा त्यामध्ये काजळीचा काळा रंग वापरून तपकिरी रंगाची छटाही तयार करता येत असे. तांबडय़ा रंगासाठी मेंदी, गेरू, कात यांचा वापर होई, तर निळ्या रंगाकरिता, नीळ, निळ्या रंगाचे खडे यांचा वापर केला जाई. हे सर्व रंग चांगले टिकाऊ असत. तरीसुद्धा रेशीम रंगवल्यास ते चमकदार दिसावे म्हणून त्या त्या रंगानुसार हरभऱ्याची आंब, मीठ, तुरटी इत्यादी द्रावणाचा वापर केला जायचा. तसेच रंगवलेले रेशीम कटाक्षाने सावलीत वाळवले जायचे. या नसíगक पदार्थाचा वापर करताना प्रत्येक रंगाकरिता एक पद्धत ठरलेली होती. त्याचा काटेकोरपणे अवलंब केला जायचा. त्यामध्ये अधिक वेळ जायचा, पण त्याचा परिणाम चांगला असायचा. रंगाची खात्री असायची. असेंद्रिय रसायनांचा वापरामुळे काही बदल निश्चित आले, पण त्यामध्ये भेसळीचा राक्षस शिरला आणि त्यांनी सर्वच रंगाचा बेरंग करून टाकला.

मनमोराचा पिसारा: आजचे शुभ वर्तमान
मित्रा,
वर्ष सरत आलंय, म्हणजे दिवस लहान होत चालले आहेत आणि रात्री मोठय़ा.. हवेत गारवा, सकाळचं ऊन उबदार आणि संध्याकाळचा प्रकाश नरम, एखादी हलकी झुळूक आणि अंगावर काटा.. अशा मजेदार वातावरणात स्वस्थपणे भवतालच्या निसर्गाचं अवलोकन करावंसं वाटतं.
अशा नुसत्या पाहण्यातूनच या सृष्टीविषयी काही तरी वेगळी जाणीव होऊ लागते. निसर्गाचं चक्र नियमितपणे फिरत राहतं. आपण आपले त्या चक्राबरोबर नकळत फिरत राहतो. काळ नावाच्या अव्याहतपणे वाहणाऱ्या अखंड मन:प्रवाहात सहज वाहावत जावं असं वाटतं. हा प्रवाह कधी संथ, कधी खळखळता, काही ठिकाणी डोहासारखा थांबलेला!
अशाच एका सकाळी आकाशातल्या सूर्याकडे पाहता एकदम जाणवलं ‘अरे, वाजले किती? आजचा दिवस कोणता? कोणता वार? कोणती तिथी? कोणता महिना? कोणता पक्ष? लगेच मोबाइलमध्ये डोकावून पाहिलं आणि हसू आलं. खुदकन नाही, मित्रा खो खो हसू..’
मला वार, दिवस, महिना, पाहायला मोबाइल लागतो, कारण निसर्गात वार, महिना असलं काही नसतंच!
सूर्य उगवताना आजचा वार गुरुवार, आज २५ डिसेंबर, नाताळचा दिवस. अगर दिवाळी, ईद, असा प्लॅकार्ड घेऊन डोंगरामागून वर येत नाही. सूर्याच्या लालबुंद बिंबावर आजच्या दिवसाचं नाव लिहिलेलं नसतं. तो फक्त उगवतो, नि मावळतो.
दिवस, वार, तारीख, तिथी या सर्व गोष्टी केवळ मानवनिर्मित.
सूर्य कशाला, कोणत्याही नैसर्गिक सजीव, निर्जीव वस्तुमात्राला स्वत:चं नाव नसतं. झाडं, झाडं असतात, वेली, वेली फुलं, फुलं आणि फळं, फळं असतात. नदीला नाव नसतं. पायवाटेला नामनिर्देशक फलक नसतो.
निसर्ग फक्त असतो. तो सुंदर, मोहक, दाहक, रौद्र की मारक असं काही नसतं. त्याला अस्तित्व असतं, अस्मिताही नसते. सगळं अनामिक आणि शुद्ध स्वरूपात असते. ओळखायचं फक्त एकच जमीन आणि पाणी, डोंगर आणि दरी, प्रकाश आणि अंधार. एवढंच काय ते अंतिम सत्य.
बाकी संपूर्ण जीवन म्हणजे आपण स्वत:करता, स्वत: रचलेली स्वातंसुखाय कविता असते. सगळं, अगदी सगळं फक्त आणि फक्त मनाचा खेळ असतो. आपली कल्पना कधी होकारात्मक कधी नकारात्मक. मित्रा, हे एका बेसावध क्षणी मनोमन आकळलं आणि तो खरोखरच आनंदाचा क्षण होता. हसू आलं कारण, माझं जीवन कसं जगावं, या जगाबद्दल काय समजूत करून जगावं, हे सर्वस्वी माझ्यावर अवलंबून आहे. खरं सांगू, अगदी मुक्त-मुक्त वाटलं.
आजच्या दिवसाचं हे शुभ वर्तमान..
मित्रा, तुझं नि माझं, इथलं शेवटचं हितगुज; म्हणजे या पिसाऱ्यावरच्या कट्टय़ाचं..
तुझा, अर्थात मीच,
ता.क. मी इथे नसलो तरी असतोच. तुझ्यातच आहे ना!!
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व: जातिअंताचा अवघड लढा
‘‘जातीचे संघटन हे वास्तव आज बहुपदरी, बहुआयामी व अत्यंत गुंतागुंतीचे बनले आहे. सर्वच जाती आरक्षणासाठी, सत्तेसाठी संघटित होत आहेत.. म्हणूनच हा गुंता नीट समजून घ्यावयास हवा.. जातिव्यवस्थेमुळे झालेला अन्याय दूर करून एकसंध राष्ट्र तयार व्हावे, या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आरक्षणाची तरतूद केली गेली. आरक्षणाच्या साह्य़ाने मागास जातिसमूह पुढे येतील, समाजातील अभिसरण वाढेल, जातिनिर्मूलनाच्या दृष्टीने वाटचाल होईल- हा उद्देश त्यामागे होता. आरक्षणाचा सामाजिक न्यायासाठी फायदा नक्कीच झाला, पण जातिनिर्मूलनासाटी मात्र झाला नाही. आरक्षणसमर्थनासाठी जाति आधारित संघटना तयार झाल्या, निवडणुकीच्या राजकारणासाठी त्यांचा वापर प्रभावीपणे होऊ लागला आणि संघटना टिकवण्यासाठी समतेच्या तत्त्वाऐवजी जातीची अस्मिता अधिकाधिक टोकदार बनवणे चालू झाले. यामुळे आरक्षणसमर्थक फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा जप करत राहिले आणि प्रत्यक्षात मात्र जातिअंताच्या भूमिकेपासून दूर जात राहिले.’’
‘उलटय़ा पावलांचा प्रवास रोखायलाच हवा!’ (प्रथम प्रसिद्धी, ७ फेब्रुवारी २००९, ‘समता-संगर’, जून २०१४) या लेखात नरेंद्र दाभोलकर म्हणतात –
‘‘यावरचा उपाय सोपा नाही. स्वजातीचे कठोर टीकाकार बनावयास हवे. आंतरजातीय विवाहांना जाणीवपूर्वक पाठबळ द्यावयास हवे. जात ही संपूर्णत: अवैज्ञानिक व राष्ट्रीय एकात्मतेला घातक बाब आहे, असा थेट संस्कार शालेय स्तरापासून रुजवावयास हवा. जातिअंताचा हा लढा खूप अवघड आहे, कारण तो मानसिक परिवर्तनाबरोबरच व्यवस्थापरिवर्तनाचाही संघर्ष आहे. पण जातनिर्मूलनाचा कृतिशील संवाद तरी चालू करावयास हवा.
अवघ्या पन्नास वर्षांपूर्वी ज्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंध होता, अशा वंशाच्या व्यक्तीला आज अमेरिका राष्ट्राध्यक्ष बनवते; गतीचा कायदा पाळल्याची ती खूण आहे. आम्ही मात्र पाच हजार वर्षांपासून करत असलेली चूक दुरुस्त करण्याचे सोडून पुन्हा भूतकाळाकडे पावले टाकत आहोत. म्हणून अतिशय खेदाने म्हणावे लागते : ‘हे त्यांच्या वेदसंमत परमेश्वरा, त्यांना क्षमा कर. कारण, आपण काय करत आहोत, हे त्यांना कळत नाही.’ ’’

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क