फार पूर्वीच्या काळापासून दर्यावर्दी समुद्राची खोली मोजण्याचे प्रयत्न करीत आले आहेत. आपण जातोय तिथे पुरेसं पाणी आहे की नाही, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. समुद्राची खोली मोजण्याची साधीसोपी पद्धत म्हणजे एका दोरीला एक खूप जड शिशाचं वजन बांधलेलं असे. हे वजन दोरीच्या मदतीने गोलगोल फिरवून दूर फेकत असत. आणि ते जाऊन तळाला टेकलं की किती दोरी पाण्यातभिजली यावरून पाण्याची खोली मोजत. खोली मोजण्याचं एकक ‘फॅदम’ म्हणजेच सहा फूट किंवा १.८३ मीटर एवढं असे. यामुळे पूर्वीच्या नकाशांमध्ये समुद्राची खोली फॅदम्समध्ये दिली जात असे. त्यानंतर सुमारे २०० वर्षांपूर्वी पाण्याच्या दाबाच्या तत्त्वावर आधारित एक पद्धत अस्तित्वात आली. यात एक परीक्षा नळी उलटी (तोंड खाली करून) एका दोरीला बांधून समुद्रतळाशी पाठवली जात असे. या नळीला आतून सिल्व्हर क्रोमेटचा थर दिलेला असे. नळी जितकी खाली जाईल तेवढे जास्त पाणी आतल्या हवेला आकुंचित करून नळीमध्ये शिरत असे. या पाण्याच्या प्रक्रियेने सिल्व्हर क्रोमेटचे पांढरे सिल्व्हर क्लोराइड बनत असे. या पातळीवरूनही नळी किती खोलीपर्यंत जाऊन आली ते काढता येई. २०व्या शतकात जहाजांवर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आल्यावर ‘एको साउंडर’चा उपयोग होऊ लागला आहे. हे ध्वनिलहरींच्या परावर्तनावरून समुद्राच्या खोलीचं अचूकपणे मापन करतं. यासाठी सुमारे ३० किलो हर्ट्झ वारंवारितेच्या (अल्ट्रासॉनिक) ध्वनिलहरीवापरतात. ध्वनीचा पाण्यातला वेग दर सेकंदाला सुमारे १५०० मीटर्स असतो. तो तापमान, खोली आणि मिठाचे प्रमाण (सॅलिनिटी) यांवर अवलंबून असतो. अचूक मोजमापासाठी पाण्याचे तापमान आणि मिठाचे प्रमाण मोजून मग ध्वनिलहरींना तळापासून परावíतत होऊन यायला लागणारा वेळ मिलिसेकंदात मोजून त्यावरून खोलीचे गणित मांडले जाते. हल्ली बहुतांश नकाशांमध्ये खोली मीटर्समध्ये दर्शवलेली असते. पूर्वी याचा आलेख थर्मल पेपरवर मिळत असे. हल्ली तो संगणकाच्या पडद्यावर रंगीत आलेखाच्या रूपात मिळतो. या माहितीचा उपयोग जहाजाच्या सुरक्षिततेशिवाय समुद्रतळाचा अभ्यास आणि सर्वेक्षण यांसाठी होतो. - कॅ. सुनील सुळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org सच्चिदानंद राउतराय (१९८६, उडिया) भारतीय साहित्यातील उत्कृष्ट साहित्यिक योगदानाबद्दल सुप्रसिद्ध उडिया कवी श्री. सच्चिदानंद राउतराय यांना १९८६ चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळविणारे सच्चिदानंद राउतराय हे उडिया भाषेतील दुसरे साहित्यिक आहेत. त्याअगोदर १९७३ मध्ये श्री. गोपीनाथ माहान्ती यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. उडिया काव्य आणि समीक्षा या क्षेत्रात राउतराय यांचे योगदान आहे. पण विशेषरूपात त्यांनी कवी म्हणून समकालीन साहित्यावर एक खोलवर ठसा उमटवला आणि उदयोन्मुख कवींना अत्याधिक प्रभावित केले. राउतराय यांचा जन्म उडिसातील पुरी जिल्ह्यातील खदी या गावी १३ मे १९१६ रोजी झाला. वयाच्या १२व्या वर्षांपासून ते काव्यलेखन करू लागले. विद्यार्थिदशेत असतानाच त्यांनी विद्यार्थी नेता या नात्याने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. पुढे त्यांनी किसान चळवळीतही सक्रिय काम केले. क्रांतिकारी कविता लेखनामुळे त्यांना अडीच महिन्यांची सजा झाली. पण अटक चुकविण्यासाठी ते वर्षभर भूमिगत राहिले. पण त्यांच्या काही कवितांवर ब्रिटिश सरकारने बंदी आणली. आपल्या वडिलांप्रमाणे त्यांना वकील व्हायचे होते; परंतु ब्रिटिश सरकारने त्यांच्या राजकीय हालचाली पाहून एलएल.बी. किंवा एम.ए.चा अभ्यास करायला परवानगी नाकारली होती. बेकार बसण्यापेक्षा नोकरी करावी म्हणून राउतराय १९३९ मध्ये कलकत्त्याला आले. तिथे त्यांनी त्यावेळपर्यंत प्रकाशित झालेला त्यांच्याच उडिया साहित्याचे इंग्रजी भाषांतर करून प्रकाशित केले. एका मित्राच्या ओळखीने त्यांना बिर्ला ग्रुपच्या केशोराम ज्यूट मिलमध्ये नोकरी मिळाली. वेगवेगळ्या खात्यांत नोकरी करीत वीस वर्षांनी ते त्या मिलचे कार्यकारी संचालक झाले. पुढे कामगारविषयक बाबींवरून व्यवस्थापनाशी मतभेद झाले आणि त्यांनी राजीनामा दिला. पुढे त्यांनी कटक येथील ओरिसा गिरणी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले व तिथूनच मग ते निवृत्त झाले. ‘दिगंत’ या त्रमासिकाचे संपादक म्हणून राउतराय यांची कामगिरी लक्षणीय आहे. आदर्श समाजाची त्यांची कल्पना त्यांनी ‘दिगंत’मधून वेळोवेळी मांडली आहे. समाजातील प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे, समान आहे व तो सन्मानाने आशावादी जीवन जगतो आहे, अशी त्यांची आदर्श समाजाची धारणा होती. त्यांनी कारकून, दुकानदार, शेतकरी, इ. सर्वसामान्य लोकांवर लिहिले. कविता ही लोकांसाठी आहे. ती लोकांची आहे. असे मानून काव्यलेखन केले. त्यांच्या या वस्तुनिष्ठ शैलीतील लेखनामुळे राउतराय आधुनिक उडिया काव्याचे जनक समजले जातात. - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com