सूक्ष्मजीवांपासून ते अजस्र वृक्षांपर्यंत सर्व सजीवांमध्ये वैविध्य आढळून येते. प्रत्येक सजीवामध्ये अनेकविध जनुके असतात. यांमध्ये माहितीचा साठा असतो. वैविध्यासाठी जबाबदार घटकांपैकी जनुके ही एक आहेत. एका प्रजातीमध्ये अनेक सजीव असतात, परंतु समान प्रजातींमधील सजीव हे जनुकीयरीत्या वेगळे असतात. जनुकांच्या संरचनेनुसार त्यांचे कार्य बदलत असते. उदाहरणार्थ मांजर उंदीर खाते, तसेच सापही उंदीर खातो. परंतु साप विविध प्रकारची प्रथिने संप्रेरित करतो. यालाच व्हेनम (मराठीत ‘गरळ’) असे म्हटले जाते. हे काम मांजर करू शकत नाही. एकाच मातीमध्ये उगवणारी विविध रोपे विविध प्रकारचे गुणधर्म दर्शवितात. काहींपासून आपल्याला अनेकविध रसायने मिळतात तर काहींपासून औषधे. कर्बवायू घेऊन प्राणवायू देण्याचे महत्त्वाचे कार्य हे फक्त हरित वनस्पतीच करू शकतात. या सर्वामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येक सजीवाच्या शरीरातील जनुकीय विविधता होय. याचे अजून एक सर्वपरिचित उदाहरण म्हणजे एकाच फुलाच्या दोन रोपांमधील विविधता किंवा तांदळाच्या विविध प्रजाती. काही वर्षांपूर्वी अनेक प्रकारचे तांदूळ मिळायचे, परंतु खेदाची बाब म्हणजे आता ही जनुकीय विविधता नष्ट होत चालली आहे. फक्त याच बाबतीत नाही तर भाज्या, फळे इत्यादींमध्येसुद्धा हे निदर्शनास आले आहे. हे झाले आपल्या अन्नाच्या बाबतीत. थोडा दूर जाऊन विचार केल्यास हे आपल्या पृथ्वीवरील प्राणी, वनस्पती, कीटक यांच्याबाबतसुद्धा होत आहे. एखादी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना अनेक प्रयत्न करून तिला जरी वाचवले तरीसुद्धा त्या प्रजातींमधील काही गुणधर्म हे नष्ट झालेले असतात व ते परत कधीच येत नाहीत. पुन्हा त्यांची संख्या वाढल्यावर ते जनुकीयदृष्टय़ा अधिक समान होतात व या वेळी त्यांच्यामध्ये एखादा संसर्गजन्य विकार उद्भवला तर त्याची लागण होण्याचे प्रमाण हे त्या सर्वामध्ये सारखेच असण्याची शक्यता अधिक असते. याचे उदाहरण म्हणजे गुजरातच्या गीर मधील सिंह. संपूर्ण भारतात ते फक्त एकाच ठिकाणी असल्यामुळे वरील गोष्टी त्यांच्या बाबतीत नाकारता येत नाहीत. जनुकीय विविधता ही आपल्याला निसर्गाकडून लाभलेली देणगी आहे. तिचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. - सुरभी वालावलकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org