विद्युतप्रवाहाच्या साहाय्याने चुंबकत्व निर्माण होत असेल तर, चुंबकशक्तीच्या साहाय्याने विद्युतप्रवाह निर्माण करता येईल; ही कल्पना फॅरॅडे या इंग्रज शास्त्रज्ञाला सुचली व त्यातूनच प्रवर्तित विद्युतप्रवाह निर्माण झाला. विद्युतजनित्र विद्युतचुंबकीय प्रवर्तनाच्या तत्त्वावर कार्य करते. यात यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. प्रत्यावर्ती विद्युतधारा (AC) वाहताना स्वत:ची दिशा ठरावीक काळाने बदलत असते तर दिष्ट विद्युतधारेचे (DC) वहन नेहमी एकाच दिशेने होते. प्रत्यावर्ती विद्युतजनित्रात शक्तिशाली चुंबकादरम्यान आसाभोवती फिरणारी आम्रेचर कॉइल (लोखंडी भागाभोवती गुंडाळलेलं तारेचं वेटोळं) असते. कॉइलच्या दोन टोकांना एकमेकांपासून अलग असलेल्या दोन कडय़ा (पितळी रिंगा) कॉइलबरोबर आसाभोवती फिरत असतात. आम्रेचर कॉइल आसाभोवती फिरताना ती चुंबकीय बलरेषांना छेदते. बदलत जाणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे कॉइलमध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. ब्रशेसद्वारे बाहेरील परिपथात कॉइलचे अध्रे वर्तुळ फिरून होईपर्यंत एका दिशेने प्रवाह वाहतो; तर उर्वरीत अर्धवर्तुळ फिरेपर्यंत उलट दिशेने प्रवाह वाहतो. कॉइल सतत फिरत असल्याने ही क्रिया पुन:पुन्हा घडून प्रत्यावर्ती विद्युतधारा निर्माण होते. दिष्टी विद्युतजनित्रात एकाच कडीचे दोन अलग तुकडे करून कॉइलच्या एका टोकाला एक तर दुसऱ्या टोकाला दुसरा खिळवलेला असतो. त्यामुळे अर्धकडी आलटून पालटून कार्बन ब्रशेसना टेकतात. कॉइल जोपर्यंत चुंबकीय क्षेत्रात फिरत असते तोपर्यंत प्रवर्तित विद्युतधारा एकाच दिशेने प्रवाहित होते. बहुतांश ऊर्जानिर्मिती केंद्रांमध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची निर्मिती होते. विद्युतशक्तीमध्ये कोणतीही घट न होता ती खूप लांबच्या अंतरापर्यंत पारेषित करता येते. दिष्ट विद्युतधारेच्या तुलनेत हा महत्त्वाचा फायदा आहे. आपल्या देशात जी वीज घरात पुरवली जातेती प्रत्यावर्ती विद्युतधारा असून त्याची वारंवारता ५० हर्ट्झ असते आणि त्याचा विद्युतदाब २२०-२५० व्होल्ट असतो. कोरडा विद्युतघट परिपथात वापरल्यास वाहणारा प्रवाह दिष्ट असतो. प्रत्यावर्ती विद्युतधारेचे रूपांतर दिष्टकारी परिपथाच्या (Rectification circuit) साहाय्याने दिष्टी विद्युतधारेत करून नंतर व्होल्टमीटरने विद्युतदाब व अँमीटरने विद्युतप्रवाह मोजतात. - डॉ. सुनंदा जनार्दन करंदीकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org रहमान राही: मानवाचीच मनधरणी.. २००४चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रथमच काश्मिरी भाषेला- रहमान राहींना मिळाल्यावर आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले, ‘काश्मिरी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याचे ऐकून काश्मीरप्रेमींना ही अनपेक्षित घटना वाटली असेल आणि प्रश्न पडला असेल, की काश्मिरी लोक कविताही करतात वाटतं!’ डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने काश्मिरी भाषा आणि साहित्याविषयी थोडक्यात काही आपल्यासारख्या विद्वज्जनांपुढे सांगण्याची दुर्मिळ संधी मिळाली आहे. काश्मिरी भाषेतील साहित्याकडे अधिकृतस्तरावर आतापर्यंत संपूर्णत: दुर्लक्ष झालेले आहे, हे मला नाइलाजाने इथे नमूद करावे लागत आहे. पण आता काश्मिरी भाषेला अधिकृत भारतीय भाषेचा दर्जा मिळाला आहे, ही एक ऐतिहासिक घटना घडली आहे. त्यामुळे शालेय-विद्यापीठ स्तरावर काश्मिरी भाषेला मान्यता मिळाली आहे. काश्मिरी भाषा ही प्राचीन आहे. इतर भाषांप्रमाणेच काश्मिरी भाषाही लोकगीतातूनच- मौखिक परंपरेत पुढे पुढे सरकत राहिली आहे. १०-११व्या शतकातील सर्वश्रेष्ठ कवींच्या रचनांना त्या काळात अधिकृत आश्रय मिळाला नाही, याचे दु:ख आहे. पण या पुरस्काराच्या निमित्ताने काश्मीरच्या बाहय़ निसर्गसौंदर्याबरोबरच त्याचे अंतरंगातील सौंदर्य काश्मिरी साहित्यातून प्रतिबिंबित झालेले आपल्याला परिचित होईल. गेल्या काही वर्षांतील आधुनिक काश्मिरी कवितेचा आढावा घेतला तर जाणवते, की ही कविता असमाधान, वेदना व्यक्त करणारी आहे. रक्तरंजित बंदूकधारी, जुलूमशाही वातावरणात, खळबळजनक परिस्थितीत आजची ही कविता जन्माला येत आहे. आदरणीय श्रोतेहो, माझ्या भोवतालची परिस्थिती आणि अनुषंगिक मूलत: मानवीय परिस्थिती माझ्या भाषेतील कवितेत लाक्षणिक अर्थाने प्रतिबिंबित होणे स्वाभाविक आहे. माझ्या मायभूमीतील सद्य:स्थितीविषयी माझीच एक गज़्ाल व तिचा अनुवाद ऐका- ‘दंवाच्या थेंबातून आग धगधगते आहे सूर्यातून बर्फाच्या चुऱ्याचा पाऊस कोसळतो आहे स्वमग्न मानवा, या माझ्या मायभूमीला अंधकारातून बाहेर काढण्यासाठी कृपा करू शकत नाहीस का!’ - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com