सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा वाहनातला एक दर्शक म्हणजे इंजिन शीतनक तापमानदर्शक किंवा Engine Coolant Temperature Indicator. पेट्रोल किंवा डीझेलवर चालणाऱ्या गाडय़ांमध्ये अंतज्र्वलन इंजिन वापरलेले असते. या इंजिनाच्या आत इंधनाचे ज्वलन होऊन ऊर्जा निर्माण होते. आणि त्यावर आपली गाडी चालते. या ज्वलनामुळे इंजिन तापते. त्याचे तापमान ठरावीक मर्यादेत ठेवण्यासाठी इंजिन ठोकळ्यामध्ये (Engine Block) खास बनवलेल्या पोकळ मार्गामधून शीतनक खेळविले जाते. हे शीतनक इंजिनाची उष्णता शोषून घेते आणि नंतर ती प्रारणीद्वारे (रेडिएटर) आसमंतात विसर्जन करते. त्यामुळेच या शीतनकाचे तापमान जाणणे आणि ठरावीक मर्यादेच्या आत ठेवणे अत्यावश्यक असते. या शीतनकाचे तापमान मोजणारी वाहनातील यंत्रणा अगदी सोपी असते. यात शीतनकात बुडवलेला एक तापसंवेदी रोधित्र (Temperature Sensitive Resistor) असतो. या रोधित्राचा विद्युतरोध तापमानानुसार बदलतो. काही तापसंवेदी रोधित्रांचा विद्युतरोध तापमान वाढले की कमी होतो. यांना ऋण तापमान गुणांक तापसंवेदी रोधित्र असे म्हणतात. तर काहींचा विद्युतरोध वाढत्या तापमानानुसार वाढतो. यांना घन तापमान गुणांक तापसंवेदी रोधित्र असे म्हणतात. आपल्या वाहनांमध्ये सर्वसाधारणपणे ऋण तापमान गुणांक तापसंवेदी रोधित्र वापरले जातात. या तापसंवेदी रोधित्राला प्रमाणित ५ व्होल्टचा विद्युतदाब पुरवला जातो. शीतनकाच्या तापमानानुसार रोधित्राचा विद्युतरोध बदलतो. त्यामुळे रोधित्रातून वाहणारी विद्युतधारा बदलते. या विद्युतधारेवरून गणित करून शीतनकाचे तापमान ठरवले जाते आणि दर्शकफलकावरच्या दर्शकातील सुई आपल्याला ते तापमान दर्शविते. तापमान जास्त असल्यास पटकन लक्षात यावे म्हणून दर्शकामध्ये त्या बाजूला लाल रंगाची खूणही केलेली असते. आजकालच्या काही नव्या वाहनांमध्ये हा दर्शक आढळत नाही. त्याऐवजी तापमान ठरावीक मर्यादेच्या वर गेल्यास चालकाला समजावे म्हणून एक भयसूचक दिवा प्रदीप्त होतो. संगणकाचा वापर केल्या जाणाऱ्या आधुनिक वाहनांमध्ये इंजिन शीतनकाचे तापमान वाढल्यास आपोआप इंजिनाला केला जाणारा इंधनाचा पुरवठा कमी करण्यात येतो, प्रज्वलनाचा वेळ कमी केला जातो आणि शीतनक थंड करण्यासाठी असलेला पंखा सुरू केला जातो. यामुळे शीतनकाचे तापमान कमी होण्यास मदत होते. - शशिकांत धारणे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org कवी राजेंद्र शाह यांचे विचार.. गुजराती साहित्यिक, कवी राजेंद्र केशवलाल शाह यांनी २००१ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात ते म्हणाले, ‘आज ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल मी काही बोलायचं ठरवलं तर इतकेच म्हणेन, की मी या पृथ्वीतलावरचा एक प्रवासी आहे. मी एका तीर्थस्थानाकडून दुसऱ्या तीर्थस्थानाकडे प्रवास करीत जातो. येतो-जातो, पुन्हा येतो. रस्त्यामध्ये जे प्रवासी भेटतील त्यांच्याशी माझे सूर जुळवून घेतो. मानव, पशु-पक्षी आणि या सृष्टीच्या कणाकणातून, वृक्षवेलीतून निर्माण होणारं संगीत मी ऐकतो. त्यांच्या सुरात मी माझा सूर मिसळतो. निसर्गाच्या जवळिकीतून निर्माण झालेले संगीत हीच माझी कविता आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी या तीर्थस्थळाचा प्रसादच आहे .. लोकहितासाठी या पुरस्कारातून मिळणारी धनराशी सांस्कृतिक ट्रस्टला अर्पण करण्याचा इरादा मी यापूर्वीच जाहीर केलेला आहे. माझ्या बाबतीत जर काही सांगायचे असेल तर मी इतकंच म्हणेन, की जाणिवांचा परीघ अमर्याद फैलावला आहे आणि मनाचे निरुद्देश, सहज भ्रमण त्या क्षितिजापर्यंत होत आहे. त्या निर्हेतुक संचाराला अनाहत नावाची साथ आहे आणि अवर्णनीय आनंदाने मी विहरतो आहे आणि मला जीवनात एक मंत्र मिळाला आहे- ‘तू रिक्त थई समर था त्यजीने तुं पाम’- प्रवाशाने आपल्या खांद्यावर जास्त ओझे घेता कामा नये. संग्रह हा नेहमीच त्रासदायक बनतो. जितके ओझे कमी तितका प्रवास सहज, अनुकूल आणि सुखकारक बनतो. सगळ्यांना भेटायचे पण राहायचे मात्र अलिप्त. रंगमंचावर भूमिका जगणाऱ्या कलाकाराची तन्मयता आणि अलिप्तता साधता आली पाहिजे. को अहम् चा उच्चार अंतरंगात उमटल्यानंतर सुरू झालेल्या प्रवासात पांथस्थ हा एकटाच असतो. जीवनाची विविध देणी चुकती करत पुढे चालत राहायचे असते. पण हा प्रवास आत्म्यावर ओझी वाहत करायचा नाही. टप्प्याटप्प्यागणिक एक एक ओझे उतरवत जायचं. माया, ममता, विचार, विकार, अहं, स्वयम्चे सारे पाश मोकळे करायचे. इदं न मम- कृष्णार्पणमस्तु म्हणत सर्व कर्मबंधनातून मोकळं व्हायचं. रिक्त हस्ताने आणि मुक्त मनाने मुक्काम गाठायचा तरच अद्वैत साधणं सुकर होईल. ‘कोणा सांगू गूज मनीचे साधू कसा संवाद आकाशगंगेतही उभा मी कोणा घालू साद मी तू पण सरता सारे, रिक्त निरक्त उरलो मी प्रकाशाचे पंख पसरूनी शुभ्र हंस विहरतो नभी..’ - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com