पृथ्वीवरील वातावरणात  वनस्पतीसृष्टी ही इथल्या सजीवांच्या जगण्याचा भाग बनून आहे. हवेतल्या  कार्बन डायऑक्साइड वायूचे सूर्यप्रकाशात अन्नात रूपांतर करून वनस्पती ऑक्सिजन वायू मुक्त करीत असतात. पृथ्वीवरील वाढती गर्दी लक्षात घेता, माणूस आता अंतराळात वस्ती करण्याचे स्वप्न पाहत आहे. साहजिकच वनस्पती सृष्टीची तिथे कुठेतरी वाढ करणे आवश्यक ठरणार आहे. तत्सबंधीचे प्रयोग आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध अंतराळकेंद्रांत हाती घेतलेले आहेत. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाखाली झाडांची वाढ करणे शक्य आहे का, याचा अभ्यास सुरू आहे.
हायड्रोट्रोपी या तंत्राद्वारे ऑक्सिन या वनस्पती संप्रेरकचा वापर करून, संशोधक या अंतराळातील लागवडीविषयी प्रयत्नशील आहेत. जपानमधील एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सीने हा प्रकल्प हाती घेतला असून तिथे लागवड केलेल्या रोपांची मुळे कुठल्या दिशेने वाढत जातात, याचा मागोवा घेतला जात आहे. काकडीच्या बियांवर हा प्रयोग करताना अंतराळवीरांनी त्या बिया अंतरळात नेल्या आणि बियातून येणारी मुळे पाण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतात का याची पाहणी केली. या हायड्रोट्रोपीच्या प्रयोगात प्रथमत: बियांना अर्धा तास हायड्रोट्रोपी चेंबरमध्ये सुकविण्यासाठी ठेवण्यात येते. नंतर, पाणी किंवा क्षाराच्या द्रावणात बुडवून रुजण्यासाठी प्रवृत केले जाते. त्यानंतर चार-पाच तासांनी पाणी देण्यात येते. रुजलेल्या बिया गोठवून पृथ्वीवर आणतात व त्याचे विश्लेषण केले जाते.
या प्रयोगातून रेण्वीय पातळीवर रोपे कशी वाढतात याचा शोध शास्त्रज्ञांना घेता येईल. यातून वनस्पती वाढताना त्यांचा ग्राविटोपिसम (गुरुत्वाकर्षण) व हायड्रोट्रोपिसम (पाणी) यांच्या दिशेने असणारी ओढ नीटपणे पारखता येईल आणि त्यानुसार, वातावरणनिर्मिती करता येईल. वनस्पतीच्या संवेदना आणि त्यांच्या वाढीस कारणीभूत असणाऱ्या ऑक्सिजन या संप्रेरकाच्या विविध प्रमाणांमुळे होणारा परिणाम पडताळून संशोधक जनुकीय पातळीवर वनस्पतीच्या वाढीचा अभ्यास करीत आहेत. केवळ अंतराळातच नव्हे तर पृथ्वीवर पिके काढण्यासाठीदेखील हे हायड्रोट्रोपी तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे.  
अंतराळातील दीर्घ प्रवासात वनस्पतीचा अन्न आणि ऑक्सिजनचा स्रोत म्हणून वापर करता यावा हा या संशोधनामागचा उद्देश आहे. विशेषत: मंगळावरील स्वारीसाठी हा शोध खूप फलदायी ठरू शकतो.
(दुसरा भाग पुढील बुधवारी)

जे देखे रवी..  – कर्माचे धबधबे
मी अनेक वर्षे कोकणात समाजसेवा म्हणून शस्त्रक्रिया करण्यास जात असे. पनवेलपासून ते रत्नागिरीपर्यंतच्या रस्त्यावर मी पावसाळ्यात उदंड पाणी तर पाहिलेच, पण अनेक धबधबेसुद्धा पाहिले.
अनेक वर्षांनंतर असे लक्षात आले की, या रस्त्यावर कर्माचे अनेक धबधबे होऊन गेले. पहिल्यांदा शिरढोण लागते. क्रांतिवीर फडक्यांचे गाव. जमीनदार आणि सावकार इंग्रजांचे पित्ते आहेत, असे गृहीत धरून यांनी रामोश्यांना हाताशी धरून आर्थिक क्रांतीचा पहिला प्रयोग केला. त्याच्यातले काय उरले? मग लागते गागोदे. विनोबांचे गाव. भूदानाचे प्र्वतक. हल्ली सगळ्या जमिनीवरून केवढी झटापट चालली आहे? मग येतो जाणत्या राजाचा रायगड किल्ला. केवढा दूरदर्शी माणूस पण आम्ही अजाण्यांनी त्यांना राजकारणातले एक मोहरे बनवले आहे. उजव्या बाजूला महाडात चवदार तळे आहे. तिथे आंबेडकर नावाच्या विद्वानाने असामान्य धाडस दाखवत सत्याग्रह केला आणि भारताच्या आधुनिक सांस्कृतिक इतिहासाला महात्मा गांधींपेक्षाही जास्त मोठा धक्का दिला पण आपण सगळे असे करंटे की, त्यांना फक्त उपेक्षितांचे पुढारी असे बिरुद दिले. पुढे डाव्या बाजूला रामदासांची शिवथर घळ. आधुनिक व्यवस्थापनाला लाज वाटेल असे त्यांचे खणखणीत लेखन. पण राज्यकर्त्यांनी त्यांना वाळीतच टाकले आहे. पुढे उजव्या बाजूला टिळक, महामहोपाध्याय भारतरत्न काणे, तसेच स्त्री-शिक्षणाला ज्यांनी मोठी उभारी दिली ते भारतरत्न कर्वे यांची गावे आहेत. महामहोपाध्यायांचे नावही आजच्या पिढीला माहीत नसेल. स्त्रियांना शिक्षण का द्यायचे याची कव्र्याची उद्दिष्टे आज वाऱ्यावर उडून गेली आहेत. त्यातल्या त्यात टिळकांची स्थिती बरी आहे, पण त्यांनी सुरू केलेल्या गणपती उत्सवाचे स्वरूप आता इतके भडक, बाजारू आणि गचाळ झाले आहे की त्यांनी अनाहूतपणे माकडांच्या हातात कोलित दिल्याचा भास होतो. पुढे गोळवलकरांचे गाव आहे पण त्यांचे नुसते नाव घेतले तरी ब्रह्महत्या होते. रत्नागिरीत सावरकरांनी स्थापन केलेले पतितपावन मंदिर आहे. गाय ही शेवटी पशू आहे, असे म्हणणाऱ्या या धाडसी माणसाने त्या काळी अस्पृश्यता निवारण्यासाठी केलेला हा प्रयत्न. पण दलितांच्या मताचे राजकारण करणाऱ्यांना सावरकरांची गरज भासण्याचे काही कारणच नाही. राहून राहिले केशवसुत. काही जाणत्या मंडळींनी गणपतीपुळ्याजवळ त्यांचे यथोचित आणि सुंदर स्मारक उभारले आहे. जणू काही एक आधुनिक तीर्थच. केशवसुतांनी एक फार अर्थघन वाक्य सांगितले आहे. ते वाक्य म्हणते ‘हे विश्व कसे केवढे। ज्याच्या त्याच्या डोक्याएवढे।’ हे वाक्य वाचावे आणि शांत राहावे हेच खरे? झालेल्या गोष्टीबद्दलचे नैराश्य आणि इतिहास वाचून होणारी खंत या दोन्ही गोष्टी विषारी आहेत.
 खंत का टाळावी याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – मुखरोग: भाग-३
शरीर व परीक्षण- ओठ, दात, दाताचे मूळ, जीभ, पडजीभ, टाळू, गळा, घसा यांचे परीक्षण, सूज, लाली, किटण, कीड, झीज, कफाचा चिकटा, पांढरे ठिपके, दरुगध अशा तक्रारींच्या दृष्टिकोनातून करावे. जिभेचे परीक्षण बारकाईने करावे. त्यामुळे वेळीच दातांचे रक्षण होऊ शकते, पोटाकरिता योग्य उपचार करता येतो.
उपचारांची दिशा- कफ, चिकटा, दरुगधी, पांढरे ठिपके, स्राव, कीड असल्यास कफनाशक, वातवर्धक, पित्तवर्धक, शोधन उपचार करावयास हवेत. लाली, दाह, रक्त जाणे अशी लक्षणे असल्यास पित्तशामक, थंड उपचार करून पहावेत. काही वेळेस तोंड उष्णतेने आलेले नसून, कफामुळे चिकटा जास्त त्रास देत असतो. याकरिता उपशय, अनुपशय या दोन्ही गोष्टींचा प्रत्यय घ्यावा.
पथ्यापथ्य- १) अडखळत बोलणे- थंड, तुपकट, वजन वाढविणारे पदार्थ कटाक्षाने टाळावेत, २) खवखवणे- खूप मसालेदार, तिखट, क्षोभ निर्माण करणारे पदार्थ टाळावेत, ३) गालगुंड- थंड, उष्ण पदार्थ टाळावेत, रुग्णाला इतरांपासून पूर्णपणे लांब ठेवावे, ४) घटसर्प- खूप थंड, उष्ण,क्षोभ करणारे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. बिनमसाल्याचे आळणी जेवण जेवावे, ५) जिभेवरील किटण- पाणी उकळून प्यावे. दूध घेऊ नये. एकवेळ लंघन करावे. आले, लसूण, पुदिना, तुळस, ओली हळद, जिरे जेवणात असावेत, ६) पडजिभेचे विकार- कफवर्धक, पित्तवर्धक, आहार विहार टाळावा. विशेषत: खूप थंड, उष्ण पदार्थ कटाक्षाने टाळावेत, ७) पांढरे ठिपके- कफकर, थंड, जड पदार्थ टाळावेत, ८) शोष- कमी बोलावे, भरपूर विश्रांती, झोप. वेळेवर सात्त्विक आहार. दूध, फळे, गव्हाचे, साखरेचे पदार्थ नित्य वापरात असावेत.
दक्षता – १) गालगुंड व घटसर्प या विकारात रुग्णाने इतरांपासून कटाक्षाने लांब राहावे, २) अडखळत बोलणे या विकाराचा विचार न करता कसेही बोलतच राहावे, ३) जिभेवरील किटण, तोंडातील पांढरे चट्टे, घशातली खवखव, शोष या सर्वाकरिता कफ किंवा पित्त आहार विहाराने वाढण्याचे कारण होऊ देऊ नये.
– संजय वझरेकर

आजचे महाराष्ट्रसारस्वत –  १९ जून
१९२६ > ‘रविकिरण मंडळा’च्या संस्थापकांपैकी एक कवयित्री मनोरमाबाई रानडे यांचे निधन. ‘गोपिकातनया’ या नावाने त्या काव्य लिहीत.
१९३२ > मराठी संतवाङ्मयाचे अभ्यासक रेव्ह. जस्टिन एडवर्ड अ‍ॅबट यांचे निधन. अ‍ॅबट यांनी ‘पोएट सेंट्स ऑफ महाराष्ट्र’ अशी ग्रंथमाला तयार केली. या मालेतून त्यांनी एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा, दासोपंत, रामदास, संत बहिणाई अशी १२ पुस्तके इंग्रजीतून लिहिली. ‘स्टोरीज ऑफ इंडियन सेंट्स’ हा महिपतीकृत ‘भक्तविजया’चा अनुवादही अ‍ॅबट यांनी,  पं. नरहर रा. गोडबोले यांच्या सहकार्याने केला होता. संतवाङ्मयाप्रमाणेच पुरातत्त्वीय शिलालेखांचे वाचन, अभ्यास व भाषांतर यांतही त्यांना रस होता.
१९९८ > विनोदी कथालेखक व प्रवासवर्णनकार रमेश राजाराम मंत्री यांचे निधन. त्यांचे मूळ नाव रमेश शंकर कुळकर. दत्तकविधी झाल्यानंतर ते ‘मंत्री’बनले. त्यांच्या नावावर १०० हून अधिक पुस्तके आहेत. ‘जनू बांडे’ ही त्यांनी निर्माण केलेली व्यक्तिरेखा मराठी विनोदी साहित्यात लक्षणीय ठरली. ‘थंडीचे दिवस’, ‘१९९१ च्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
– संजय वझरेकर