ज्ञानपीठाचा १९६९ चा साहित्य पुरस्कार श्री. रघुपती सहाय ऊर्फ ‘फिराक’ गोरखपुरी यांना त्यांच्या ‘गुल-ए-नगमा’ या काव्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. ही साहित्यकृती १९५०-१९६२ या कालावधीत प्रकाशित भारतीय भाषांतील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती म्हणून घोषित करण्यात आली.

फिराक यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे २८ ऑगस्ट १८९६ रोजी झाला. फिराक यांचे वडील मुन्शी गोरखप्रसाद हे स्वत: मोठे कवी व विद्वान वकील होते. उर्दू, फारसी आणि संस्कृत भाषा त्यांना अवगत होत्या. फिराक यांचे पहिले गुरू हेच. त्यांच्या घरी विद्वान, आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींचा राबता असायचा. घरातील सुशिक्षित, सुसंस्कृत वातावरणाचा, साहित्यप्रेमाचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला. दु:ख आणि पीडा यांची दिव्यरूपे ग्रहण करण्याची एक साधनाच ‘फिराक’ यांनी आत्मसात केली होती. या साऱ्या शिक्षण, संस्कारातूनच त्यांनी गूढ, अर्थपूर्ण, निसर्गाशी, मानवाशी नाते सांगणारी कविता लिहिली. उदा. ‘हिंदोला’, ‘आधी रात’, ‘परछाईयाँ’, ‘जग्नू’ या संग्रहातील कविता.

१९१५ मध्ये इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर अलाहाबाद कॉलेजमधून बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. तेव्हापासूनच ‘गालिब’वरील लेख, बर्कलेच्या विचारांविषयीचे त्यांचे समीक्षालेखन प्रसिद्ध होत होते. कौटुंबिक सुखाच्या अभावामुळे, या बुद्धिमान, संवेदनशील कविमनाच्या माणसाचे आयुष्य विस्कटून गेले. तरीही उर्दू, फारसी, इंग्रजीचा उच्चस्तरीय अभ्यास सुरू होता. प्रेमचंदांच्या कवितांची ओढ होतीच. त्यात १९२० मध्ये महात्मा गांधींच्या प्रभावाखाली त्यांनी स्वतंत्रता आंदोलनात उडी घेतली. त्यांना अटक झाली. लखनौच्या तुरुंगात त्यांना मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांचा सहवास मिळाला. स्नेह जुळला. याच वेळी त्यांनी उर्दू काव्य, साहित्य, भाषा यांचा अभ्यास केला. त्यामुळे उर्दूचा प्रभाव त्यांच्या काव्यावर झाला. त्यांना अनेक विषयांत रस होता. भारतीय तत्त्वज्ञान, उपनिषदांची जाण, फारसी भाषेची उत्तम जाण, इंग्रजीवरील प्रभुत्व असलेल्या फिराकनी राजकारणातही मुशाफिरी केली.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

 

यात्मिकता मोजमाप गुणांक

बुद्धिमत्ता गुणांकासारखा आध्यात्मिकता (स्पिरिच्युअल) गुणांक विकसित करण्याचेही प्रयत्न केले गेले आहेत. असा गुणांक अगदी अगदी अंतिम आणि आदर्श आहे, असा दावा केला जात असला तरी तो फार मर्यादित आहे, हे विसरता कामा नये. मुळात आध्यात्मिक बुद्धिमत्ता ही संकल्पनाही काही प्रमाणात वादाचा मुद्दा आहे. मात्र तिचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही.

आध्यात्मिक गुणवत्ता मोजण्यासाठी सहसा सामाजिक भान, चौकसपणा, कलात्मकता, वास्तवाची समज, व्यावहारिकपणा आणि पारंपरिक विचारसरणी या व्यक्तिमत्त्वाच्या सहा बाबींचा विचार करून, ती व्यक्ती किती समतोल आहे हे बघितले जाते. थोडक्यात, व्यक्तीचा आंतरिक आणि बाह्य़ विकास कसा झाला आहे, हे तपासणे हे ध्येय असते. दिलेल्या परिस्थितीत व्यक्ती कसे वागेल?  त्या स्थितीत राहायचे किंवा नाही?  याचा निर्णय किंवा ती व्यक्ती नवीन स्थिती निर्माण करू शकेल का, याबाबतही आध्यात्मिकता गुणांक कल्पना देतो.

या संदर्भात आध्यात्मिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वत:मध्ये तसेच इतरांत बदल घडवणे, वैयक्तिक संबंध सलोख्याचे ठेवणे, प्रतिकूल स्थितींचा सामना करणे आणि साचेबंद आयुष्याच्या बाहेर पडणे अशा क्षमता अध्याहृत असतात.

आध्यात्मिकता गुणांक मापनाच्या चाचणीत बहुधा संभ्रमात टाकणाऱ्या नतिक, खासगी आणि सार्वजनिक अशा २० ते २५ स्थितींचे वर्णन दिले असते आणि त्याबाबत प्रश्न विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाला उत्तराचे चार पर्याय असतात. त्यापकी एकाची निवड करायची असते. काही वेळा पर्यायाची निवड ‘लिकर्त’ पट्टीच्या आधारे संख्यात्मक रीतीने करता येते.

निवडलेल्या पर्यायांचा एकूण कल लक्षात घेऊन त्या व्यक्तीची आध्यात्मिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वत:बाबतची जाणीव, आपल्या आयुष्याचा अर्थ, इतरांबाबत सहानुभूती, मानवी मूल्यांबाबतची जागरूकता आणि बांधिलकी तसेच तिच्या अधिभौतिक मार्गावरील

प्रगतीबाबत निष्कर्ष काढले जातात आणि ते गुणांकाच्या रूपात व्यक्त होतात. एकूण ती व्यक्ती मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्टय़ा कितपत पूर्णत्वास गेली आहे याचा अंदाज बांधला जातो. काही मोठय़ा कंपन्यांमध्ये आध्यात्मिकता गुणांकाचा वापर सुजाण नेतृत्वाची क्षमता असलेल्या व्यक्ती शोधण्यासाठी केल्याचे तुरळक दाखले आहेत. मात्र या गुणांकाची रचना आणि अर्थ काढण्याची पद्धत याबाबत अनेक मतप्रवाह असून कुठल्याही प्रकारचे प्रमाणीकरण झालेले नाही, हे लक्षात ठेवावे.

डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org