डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर, अल्बर्ट हार्वर्ड, मासानोबू फुकुओका आणि कोल्हापूरचे श्रीपाद अच्युत दाभोळकर यांनी शेतीकडे समग्रतेने पाहिले. शेती विषयावर चिंतन करून, त्यानुसार विविध प्रयोग करून सर्वाना समजेल, पचेल असे शेतीचे तंत्रज्ञान विकसित केले. अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. त्यांचे प्रयोग इंदूरच्या आमच्या रंगवासा जैविक ग्राम संस्थेत आम्ही करून बघितले.
फुकुओका यांनी गव्हावर केलेला प्रयोग आम्ही करून बघितला. त्यांनी बियाणांना मातीत कालवून त्याच्या गोळ्या (पॅलेट) करून त्यांना शेतात एक-एक फूट अंतरावर (रोपांमधील तसेच रांगांमधील अंतर) लावायला सांगितले होते. आम्ही आमच्या अध्र्या एकर शेतातील पाच घमेली माती घेऊन ती कुटून बारीक केली. त्यात पाच घमेलं कुजलेलं शेणखत घातलं. त्यात ५०० ग्रॅम गव्हाचं बी (मुंडा पिस्सी जात), २०० ग्रॅम हरभरा, ५० ग्रॅम मेथी, ५० ग्रॅम तीळ व ५० ग्रॅम मोहरी यांचं बियाणं मिसळलं. यात हळूहळू गोमूत्र शिंपडत त्याचा आटय़ासारखा गोळा तयार केला. पुन्हा त्याच्या लहान-लहान गोळ्या केल्या. शेतात एक-एक फुटावर मूठभर गांडूळ खत ठेवून त्यावर गोळ्या ठेवत गेलो. यावर पुन्हा मूठभर गांडूळ खत ठेवलं. झारीने या गोळ्यांच्या वर पाणी सोडलं. नंतर पंधरा दिवसांच्या अंतराने चार वेळा याला पाणी दिलं. रोपं उगवल्यावर गहू व काही ठिकाणी मोहरी सोडून मेथी, तीळ व हरभऱ्याची रोपं काढून टाकली. फुटवा जोमदार आला. टोकलेल्या प्रत्येक ठिकाणी कमीतकमी २० व जास्तीतजास्त ४५ फुटवे (टिलर्स) आले. पीक जोमदार होते. पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात केली होती. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात कापणी केली. साडेपाच क्विंटल गहू व ५० किलो मोहरी मिळाली. म्हणजे, एकरी ११ क्विंटल गहू व १ क्विंटल मोहरी मिळाली.
या प्रयोगात फुकुओकाची गोळी पेरणी व दाभोळकरांची सूर्यशेती या दोन्हींचा अंतर्भाव होता. रोपांमध्ये एक-एक फूट अंतर सोडल्याने पानांना भरपूर सूर्यप्रकाश मिळाला. यामुळे उत्पादन वाढले. निविष्ठा न वापरल्याने मजूर खर्च सोडता इतर खर्च आला नाही.
– अरुण डिके (इंदूर)    मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी.. : अजित फडके
दिनांक ०२-०९-२०१२च्या रविवारी अजित गेला. जसा जगला तसाच शांतपणे गेला. वारही निवडला रविवार. नाही तर इतर लोकांचे कार्यक्रम बिघडतील. याने जन्मभर कोणालाही त्रास दिला नाही. लोकांनीच याला त्रास दिला, परंतु .. वाटत असे क्रियेचा अभाव। तरी त्याच्या हातांमधे होता एक स्वभाव। ते जोडून करत होते। नमस्कार।।
अभय देण्यासाठी। हात करत असे उभा। जो गांजला। त्याला गोंजारत असे।।
दु:ख आणि भीतीचा। करतसे मार्दवतेने परिहार। अगदी मृदूपणे। हळुवार।।
या ओव्या ज्ञानेश्वरांच्या अहिंसा या विषयावरच्या परंतु माझ्यासारख्याला त्या अजितमुळेच समजल्या. अर्थात या गोष्टी स्वभावत:च असाव्या लागतात, हातपाय शेवटी इंद्रिये असतात. माणसाच्या बाह्य क्रियांना जे रूप येते ते अंतरंगावर ठरते. ज्ञानेश्वर म्हणतात-
जी असते वृत्ती। ती उठून बसते मनी। मग ती वाणी आणि दृष्टी। हातातही तीच उमटते।।
दृष्टीबद्दलच बोलायचे झाले तर अजितच्या दृष्टिक्षेपाचे वर्णनही ज्ञानेश्वरीत सापडते.. सोडला दृष्टीतला ताठरपणा। भुवया मोकळ्या ढाकळ्या केल्या। गडबड किंवा डौलीपणा। नाही कुटिलता किंवा ओशाळेपणा।
फसवणूक आणि संशयाचा। त्याग केला।।
आणि अजित बोलत असे तेव्हा खालील ओव्यांचा अनुभव येत असे.
अधिक उणा शब्द। दुखवेल कोणाचे वर्म। होईल संशय उत्पन्न। हे सगळे टाळले। नाही उपरोध किंवा वितंडवाद। मर्मभेद किंवा पालहाळ। टर उडवणे। किंवा छळवाद। स्नेह पाझरे पुढे। मागून चालायची अक्षरे। शब्द नंतर अवतरे। आंधीकृपा दिसे।।
अजित व्यवसायाने शस्त्रक्रियेतला वाकबगार म्हणून नावाजलेला, परंतु त्याची कीर्ती अगदी शेवटी शेवटी साता समुद्रापार गेली. ते होण्यास वेळ लागला कारण याचा स्वभाव. ज्ञानेश्वरांनी अज्ञानाच्याही खुणा सांगितल्या आहेत.
प्रतिष्ठेवर जो जगतो। मानसन्मानाची वाट पाहतो। सत्काराने ज्याला होतो। हर्ष.
विद्येचा घालतो पसारा। पुण्यकर्माची पिटतो दवंडी। जेवढे काही करतो। सारे कीर्तीसाठी।।
यातले अजितने तसूभरही केले नाही. सन्मान आले आणि गेले..
नदी आणते महापूर। परंतु समुद्र ठरतो पुरेपूर। घेतो पोटात। सगळे पाणी
मी सहन करतो आहे काही। किंवा मी मिळवले। असला भावच नाही मुळी।
जे अंगावर चालून येते। करून टाकतो आपलेसे। तितिक्षाच नाही। त्याच्या मनी।  
अजित होता तेव्हा एक आधार वाटत असे. पण त्याने तरी किती वर्षे किती लोकांना सांभाळायचे?
रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
Aamir Khan announcement that Pani Foundation will implement group farming experiment in the state pune news
पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…

वॉर अँड पीस : फुफ्फुसाचे विकार : भाग – १
वीतभर छातीची तरुण मुले-मुली, थोडय़ाशा श्रमाने ‘फा फू’ होणारी, टिपटॉप कपडय़ातील हिरो लोक; छातीच्या, फुफ्फुसाच्या विकाराकरिता औषधे मागतात, तेव्हा त्यांची कीव वाटते. फुफ्फुसाचे रोग काही कारणाने होणे ही वेगळी गोष्ट. पण बहुतांशी फुफ्फुसाचे विकार हे व्यायाम, मोकळी हवा, खेळ यांच्या अभावामुळे तरुण मुला-मुलींना होतात. गरिबीमुळे कोंदट, अंधाऱ्या हवेत राहावे लागणे मी समजू शकतो. त्याने फुफ्फुसाचे रोग होतात. पण आपल्या घराबाहेर फिरणे, व्यायाम हे सहज जमू शकते. घरात दीर्घश्वसन, सूर्यनमस्कार, जोर काढणे या क्रिया फुफ्फुसांच्या हिताकरिता सहज करता येतात. त्याकरिता ‘जिम’ मध्ये जायची गरज नाही.
फुफ्फुसाची ताकद वाढली की माणूस कोणतेही काम, इतरांना अवघड वाटणारे, सहज करू शकतो हा माझा अनुभव आहे. त्याचा आत्मविश्वास वाढतो. या लेखात फुफ्फुसाची ताकद कशी वाढवावी, म्हणजे फुफ्फुसाचे बलाचे अभावामुळे उत्पन्न होणारे विकार कसे टाळता येतात यांचा विचार आहे.
माझे लहानपणी वडिलांकडे पं. भास्करशास्त्री भिडे नावाचे वैदिक ब्राह्मण औषधोपचारांकरिता यायचे. त्यांना प्लुरसीचा विकार होता. औषधांचा गुण कितपत आहे हे तपासण्याकरिता वडील शास्त्रीबोवांकडून ‘वेदमंत्र’ म्हणवून घेत. त्या मंत्रांचे आरोह अवरोह करून नाडी, श्वसन यावर काय परिणाम होतो ते पाहात असत. त्यांना प्राणायाम, दीर्घश्वसन, भस्रिका इ. सल्ला देत. मला वडिलांनी मागे लागून पोहावयास शिकवले. एवढेच नव्हे तर दोन वर्षे टिळक तलावात रोज पोहावयास पाठवायचे. पोहण्याच्या व्यायामाने  (३०-३० फेऱ्या) फुफ्फुसांची ताकद वाढावयास खूपच मदत झाली. संघशाखेत गु. बंडोपंत परचुरे यांचे आज्ञेत जोर काढण्याचा कार्यक्रम शाखा संपल्यावर सुरू व्हायचा. ५० जोर मारल्यावर हिरिरीने जोर मारणारांचा व्यायाम सुरू व्हायचा. तेथे व्यायामाची गोडी लागली. त्यामुळे पुढे विमानदलात व आजवर फुफ्फुसे कधी कमी पडली नाहीत.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत :  ९ एप्रिल
१६९५ > ‘यथार्थदीपिका’ ही गीतेवरील टीका, तसेच निगमसार, कर्मतत्त्व, उपादान, अपरोक्षानुभूती आदी तत्त्वचिंतनात्मक, तर द्वारकाविजय, रामजन्म, सीतास्वयंवर आदी वर्णनात्मक काव्यग्रंथ लिहिणारे पंतकवी वामनपंडित समाधिस्थ झाले. श्लोकरचनेवर त्यांचे प्रभुत्व असल्याने ‘सुश्लोक वामनाचा’ अशी दाद पुढे मोरोपंतांनी दिली. वामनपंडित यांच्या काव्यात रसाळ वर्णने असून चित्सुधा, हरिनामसुधा, वेणुसुधा, वनसुधा या ‘सुधाकाव्यां’तूनही त्यांच्या शैलीचा गोडवा जाणवतो.
१९०२ > तानाजी मालुसरे, मुरारबाजी या योद्धय़ांवर  ‘शिवशार्दूल’, ‘ संग्रामसिंह’ अशी खंडकाव्ये, तर छत्रपती शिवरायांवर ‘शिवायन’ हे खंडकाव्य लिहिणारे नारायण रामचंद्र मोरे यांचा जन्म.
१९३९ > ‘मराठय़ांच्या इतिहासाच्या साधनांत नवीन भर’, ‘भोसले कुलाचा वंशवृक्ष’ अशा इतिहाससंशोधनपर ग्रंथांचे लेखक आणि ‘इंडियन अनरेस्ट’चे भाषांतरकार महादेव गणेश डोंगरे यांचे निधन.
१९७४ > शके ६२८ ते १२८९ या काळातील शब्दांचा कोश तयार करणारे गाढे अभ्यासक, समीक्षक आणि ग्रंथसंपादक रामकृष्ण गणेश हर्षे यांचे निधन. गोविंदाग्रज व तुकाराम यांच्याविषयीचे टीकाग्रंथ त्यांनी लिहिले.
– संजय वझरेकर