१८५७ चे भारतीय स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी छावणीतील शिपायांच्या उद्रेकातून सुरू झाले. लवकरच ते दिल्ली, आग्रा, कानपूर, लखनौ वगैरे ठिकाणच्या छावण्यांमध्ये पसरले. हा लढा स्वातंत्र्यसमर, भारतीय स्वातंत्र्यलढा, अशा नावांनीही ओळखला जातो. या लढय़ात अनेकांनी आपल्या कर्तृत्वाने स्वातंत्र्यलढय़ाची मशाल पेटती ठेवली. परंतु त्यांपैकी अनेकांच्या कार्याबद्दल कुठे फारसा उल्लेख आढळत नाही. अशा विस्मृतीत गेलेल्या, इतिहासात हरवलेल्या अनेक वीरांपैकी एक आहेत जनरल बख्त खान. आईकडून अवधच्या नवाबांशी नातेसंबंध असलेले बख्त खान यांचा जन्म १७९७ सालचा उत्तर प्रदेशातल्या बिजनोरचा, युसूफझाई पठाण कुटुंबातला. वडील अब्दुल्ला खान हे अफगाणिस्तानातील गझनी येथून आलेले लखनौत स्थायिक झाले होते. बख्त खान प्रथम ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात सुभेदार म्हणून नोकरीस होते. पुढे ते बरेली छावणीत फिल्ड बॅटरी कमांडरच्या पदावर आणि नंतर नीमच ब्रिगेडच्या कमांडर पदावर होते. पहिल्या अँग्लो-अफगाण युद्धात बख्त खाननी ब्रिटिशांच्या फौजेतून चांगली कर्तबगारी केली. घोडदळ आणि पायदळाचा त्यांना चाळीस वर्षांचा अनुभव होता. १८५६ मध्ये कंपनी सरकारने अवध संस्थान खालसा केले. मेरठच्या लष्करी छावणीत सनिकांच्या बंडाचा उद्रेक झाल्यावर ठिकठिकाणच्या छावण्यांमधून सनिकांच्या बंडाचे लोण पसरले आणि त्याचे रूपांतर स्वातंत्र्यसमरात झाले. हे बंडखोर स्वातंत्र्यसैनिक दिल्लीत येऊन एकत्रित व्हायला लागले. बरेलीतील नीमच ब्रिगेडचे कमांडर असलेले जन. बख्त खानसुद्धा स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा आणि मदत देण्यासाठी आपल्या रोहिला पठाण सनिकांसह १ जुलै १८५७ रोजी दिल्लीत पोहोचले; परंतु तोपर्यंत बंडखोर सनिकांनी आणि स्वातंत्र्यसनिकांनी दिल्ली घेऊन मोगल बादशाह बहादूरशाह जफरला भारताचा सम्राट घोषित केले होते. ब्रिटिशद्वेष्टय़ा बख्त खानांचा ब्रिटिश लष्करातला ४० वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन बादशाह जाफरने बख्तना दिल्लीच्या ‘साहेब-ए-आलम’ म्हणजे गव्हर्नर जनरलपदी नियुक्त केले. त्यापूर्वी बादशाहाचा मुलगा मिर्झा मुघल या पदावर होता. सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com