१८ ऑगस्ट १८६८ या दिवशी फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ ‘पीअर जॅनसन’ हे खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी भारतात आले. सूर्यग्रहण पाहताना सूर्याच्या वर्णपटात (सूर्यकिरण लोलकातून जाऊ दिले असता, बाहेर पडताना सप्तरंगी वर्णपट पाहायला मिळतो) एक पिवळ्या रंगाची रेषा त्यांना आढळली. सूर्यग्रहण नसतानाही निरीक्षण केले असता सूर्याच्या वर्णपटात पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसला. सोडिअम या मूलद्रव्याचे ज्वलन झाले असता, त्याची ज्वाला पिवळ्या रंगाची दिसते. पण ‘पीअर जॅनसन’ यांना सूर्याच्या वर्णपटात दिसलेला पिवळा रंग सोडिअम या मूलद्रव्याच्या पिवळ्या रंगापेक्षा वेगळा आढळला. त्याच वर्षी जोसेफ नॉर्मन लॉकयेर आणि एडवर्ड फ्रँकलँड यांनाही सूर्याच्या वर्णपटात हा पिवळा रंग आढळला. आणि तो सूर्यात असणाऱ्या मूलद्रव्याचा आहे असा शोध लागला. या रंगाची तरंगलांबी ५८७.४९ नॅनोमीटर म्हणजेच ०.००००००५८७४९ मीटर होती. जोसेफ नॉर्मन लॉकयेर आणि एडवर्ड फ्रँकलँड या दोघांनीही या मूलद्रव्यास सूर्याला ग्रीक भाषेत असलेल्या हेलिओज (helios) या नावावरून हेलिअम असे नाव दिले. पृथ्वीवर सापडण्याआधी पृथ्वीबाहेर सापडलेले हे पहिलेच मूलद्रव्य. भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे हेलिअमचा शोध ‘पीअर जॅनसन’ यांना भारतातून लागला. विश्वात सर्वाधिक प्रमाणात हायड्रोजन सापडतो (९२ टक्के) आणि दुसरा क्रमांक हेलिअमचा लागतो (७.१९ टक्के). सूर्यावर आढळलेले हे मूलद्रव्य दोन वर्षांनंतर, लुईंगी पामित्री या भौतिकतज्ज्ञाला इटली देशातील ‘व्हेसुव्हिअस’ पर्वताच्या ज्वालारसात आढळले. १८९५ मध्ये रसायन शास्त्रज्ञ सर विल्यम रामसे यांनाही पृथ्वीवर हेलिअमच्या अस्तित्वाचा शोध लागला. युरेनियम या किरणोत्सारी असलेल्या मूलद्रव्याचा ऱ्हास होत असताना हेलिअम तयार होते. वातावरणात अत्यल्प प्रमाणात असल्याने वातावरणातून हेलिअम मोठय़ा प्रमाणात मिळविणे फार खर्चीक आहे त्यामुळे नैसर्गिक वायूंच्या साठय़ातून मिळत असलेला हेलिअम साठवला जातो. लष्करी आणि अन्य प्रकारच्या फुग्यांमध्ये वापर होत असल्याने, भविष्यातील वापराच्या दृष्टीने यू.एस.ए.मधील टेक्सास येथे हेलिअम तयार करून साठवला जातो. रॉकेट्समध्ये इंधन म्हणून हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर - निष्क्रिय आणि न जळणारा असल्याने - हेलिअमचा उपयोग केला जातो. तांबे, अॅल्युमिनियम, मॅग्नेशियम यांची संमिश्रे जी उष्णतेचे सुवाहक आहेत यांच्या प्रज्योत सांधण म्हणजेच वेल्डिंगमध्येही हेलिअमचा वापर केला जातो. - अनघा वक्टे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org कनिष्काच्या कारकीर्दीतील धम्मप्रसार आक्रमक म्हणून भारतीय प्रदेशात येऊन काही काळ भारतावर राज्य केले आणि शेवटी भारतीय संस्कृतीत ज्यांचे अस्तित्व पूर्णपणे विलीन झाले त्यापैकीएक कुषाणही आहेत. परंतु तत्पूर्वी कुषाणांनी भारतीय संस्कृतीवर स्वत:चा ठसा उमटवून ठेवला. सम्राट अशोकाने गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा आणि बौद्ध धर्माचा प्रसार जोमाने केला हे सर्वश्रुतच आहे. परंतु तेवढय़ाच मोठय़ा प्रमाणात बौद्ध तत्त्वज्ञान प्रसाराचे कार्य कुषाण राजा कनिष्काने केलेय हे बहुधा सर्वसाधारण माणसाला अज्ञातच आहे. कनिष्काच्या काळातच बुद्धाच्या मानवी स्वरूपातील प्रतिमा निर्माण होऊ लागल्या. त्यापूर्वी बुद्धाचे स्वरूप पदचिन्ह, आसन, स्तूप, बोधीवृक्ष इत्यादी चिन्हांनी सूचित केले जात असे. कनिष्क आणि पुढच्या कुषाण राजांच्या काळात ठिकठिकाणी बौद्धांसाठी विहार व स्तूप बांधले गेले. या स्तूपांचे अनेक अवशेष पुरातत्त्वीय संशोधनात मिळाले आहेत. कनिष्काच्या कारकीर्दीतच बौद्धांनी संस्कृत वाङ्मयाची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. अश्वघोषाचे ‘बुद्धचरित’ याच काळातले. त्यापूर्वी बौद्ध-साहित्य फक्त पालीतच असे. नवनवीन प्रदेश जिंकण्याची महत्त्वाकांक्षा असणारा कनिष्क राज्यकारभारातही अत्यंत चोख होता. या काळात कुषाण साम्राज्य उझबेकिस्तान, ताजीकिस्तान, अफगाणिस्तान, सध्याचे पाकिस्तान, बिहार, ओरिसा तसेच दूरवरचे यारकंद आणि खोतान अशा विशाल प्रदेशांमध्ये विस्तारले. कनिष्काची प्रमुख राजधानी पेशावर येथे तर तक्षिला ऊर्फ तक्षशिला, बेग्राम आणि मथुरा या तीन उपराजधान्या होत्या. कनिष्काने परकीय व्यापारास उत्तेजन दिल्यामुळे चिनी आणि रोमन प्रदेशांशी कुषाणांचे मोठे व्यापारी संबंध होते. कनिष्काच्या काळात कुषाण राज्याच्या व्यापारी आणि आर्थिक प्रगती बरोबरच विद्या, कला आणि तत्त्वज्ञानविषयक विकास झाला. बौद्ध वाङ्मयात ‘कनिष्काचा अंत त्याच्या मंत्र्याने त्याचा वध केल्यामुळे झाला’ असे म्हटले आहे. कनिष्कानंतर हुविष्क, कनिष्क दुसरा, वसुदेव इत्यादी कुषाण राजांची कारकीर्द झाली. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात कुषाणांची सत्ता नष्ट झाली. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com