हेन्री कॅव्हेंडिश हे ब्रिटिश रसायन आणि भौतिक शास्त्रज्ञ होते. वातावरणातील हवेतील घटकांचं प्रमाण, वायूंचे गुणधर्म, पाण्यातील रासायनिक घटक आणि गुरुत्वाकर्षण या विषयात हेन्री कॅव्हेंडिश यांनी संशोधन केलं. हेन्री कॅव्हेंडिश यांचा जन्म १० ऑक्टोबर १७३१ रोजी फ्रान्समधील नाइसि येथे झाला आणि शिक्षण इंग्लंड येथील केम्ब्रिज विद्यापीठातून झालं. तीन वर्ष शिक्षण घेतल्यावर पदवी न घेताच त्यांनी विद्यापीठ सोडलं पण संशोधन मात्र सुरूच ठेवलं. हायड्रोजन वायूचा शोध लावताना हायड्रोजनची आणि इतर वायूंची घनता त्यांनी मोजली. हायड्रोजन वायूचं हवेत ज्वलन झालं असता दव म्हणजेच पाण्याचे थेंब तयार होत असल्याचं कॅव्हेंडिश यांनी सिद्ध केलं. पाण्यातील ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं प्रमाण १:२ असतं असं त्यांनी १७४८ मध्ये सिद्ध केलं. नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यातून विद्युत ठिणगी नेली असता नायट्रिक आम्ल तयार होते असा शोध त्यांनी १७८५ मध्ये लावला. हा शोध औद्योगिकदृष्टय़ा उपयुक्त ठरला. गुरुत्वाकर्षण, विद्युत भार यांसारख्या सूक्ष्म प्रेरणा मोजण्यासाठी एक उपकरण त्यांनी तयार केलं. या उपकरणाच्या साहाय्याने १७९८ साली कॅव्हेंडिश यांनी गुरुत्वाकर्षण स्थिरांक मोजला व पृथ्वीची सरासरी घनता काढली. आधुनिक प्रयोगांवरून काढलेली पृथ्वीची घनता आणि कॅव्हेंडिश यांनी काढलेली पृथ्वीची घनता यात केवळ एक टक्क्याचाच फरक आहे. ध्रुवीय प्रकाश, भूविज्ञान, विद्युत अशा विविध विषयांत त्यांनी संशोधन केलं. प्रयोगांतील अचूकता हे त्यांचं वैशिष्टय़ होतं. साखरेच्या किण्वन प्रक्रियेतून निघालेल्या उत्पादकाबद्दल (कार्बन डाय ऑक्साइड वायूबद्दल) त्यांनी संशोधन केलं. कॅल्शियम काबरेनेट आणि कार्बन डायॉक्साइड यांच्या अभिक्रियेत कॅल्शियम बायकाबरेनेट तयार होतं, हा शोध कॅव्हेंडिश यांनी लावला. ही अभिक्रिया परिवर्तनीय (रिव्हर्सबिल) असते. ही अभिक्रिया कठीण पाण्याचं एक कारण आहे. कठीण पाणी कॅल्शियम हायड्रॉक्साइड वापरून मृदू करता येईल, असं संशोधन त्यांनी केलं. हेन्री कॅव्हेंडिश रॉयल सोसायटीचे सदस्य आणि इन्स्टिटय़ूट ऑफ फ्रान्सचे परदेशीय सदस्य होते. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ केम्ब्रिज येथील एका प्रयोगशाळेला ‘कॅव्हेंडिश फिजिकल लॅबोरेटरी’ असं नाव दिलं आहे. या प्रयोगशाळेत त्यांची बरीच उपकरणं जतन करून ठेवली आहेत. - अनघा वक्टे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org शक राजांचे पहिले भारतीय सत्ताकेंद्र मूळच्या उत्तर चीनच्या झिंगझियांग प्रांतातील यूह-ची टोळ्यांपैकी शक किंवा सिथियन या रानटी, भटक्या टोळ्यांनी अफगाणिस्तान माग्रे वायव्येकडून भारतीय प्रदेशात आक्रमण करून आपली राज्ये स्थापन केली. शकांचे भारतीय प्रदेशातले स्थलांतर भारतीय इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरते. मूळच्या भटक्या, रानटी जमातीतल्या शकांचा संबंध प्रथम इराणी आणि ग्रीक लोकांशी आल्यावर त्यांच्या जीवनशैलीत फरक पडून ते बऱ्यापैकी सुसंस्कृत झाले. भारतीय प्रदेशात शकांचे पहिले सत्ताकेंद्र मथुरा येथे निर्माण झाले. पुढे सौराष्ट्र प्रांतात शकांची दुसरी सत्ता स्थापन झाली. या सत्ता केंद्राला पश्चिम क्षत्रप म्हटले जाते. शक शासकांनी त्यांच्या प्रत्येक राज्यक्षेत्र विभागावर नेमलेल्या सुभेदाराला ‘क्षत्रप’ असे नाव होते तर राज्याच्या प्रत्येक शासकाला ‘महाक्षत्रप’ म्हणत. शक सत्तेच्या उज्जनच्या क्षत्रपांचे दोन वंश होते. क्षहरात आणि कार्दमक हे ते दोन वंश. पैकी क्षहरात वंशाच्या नट्टपाण राजाने इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या विस्तृत प्रदेशावर राज्य केले. परंतु सातवाहन राजांनी या क्षत्रपांचा पराभव करून त्यांचा बराचसा प्रदेश आपल्या राज्यप्रदेशाला जोडला. पुढे या नंतर क्षत्रपांची सत्ता कार्दमक घराण्याकडे आली. माळवा आणि महाराष्ट्रातील शक शासकाचा क्षत्रप प्रबळ आणि संपन्न होता. या क्षत्रपाचा नातू रुद्रदामन हा पराक्रमी, युद्धकुशल शक तरुण लोकनेताही होता. सातवाहनांनी शक क्षत्रपांचा पराभव करून मोठा राज्यप्रदेश घेतल्यामुळे दुबळ्या झालेल्या शक राज्याच्या शासकपदी लोकांनी रुद्रदामनची निवड केली. रुद्रदामनने उज्जन येथे आपली राजधानी ठेवून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, सौराष्ट्र वगरे प्रदेशांवर आपली सत्ता प्रस्थापित केली. पहिल्या शक टोळ्यांनी अफगाणिस्तानातून वायव्य भारतीय प्रदेशात आपले राज्य स्थापन केले त्या वेळी तक्षीला ऊर्फ तक्षशिला हे त्यांचे पहिले सत्ताकेंद्र होते. पुढे भारतीय प्रदेशात शक लोक विखुरले जाऊन त्यांनी आपापली राज्ये स्थापन केली. तक्षशिलेनंतर शकांची सत्ताकेंद्रे मथुरा आणि उज्जन येथे निर्माण झाली. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com