कपडा मळण्याची कारणे अनेक आहेत. जे सूक्ष्म कण कपडय़ाला चिकटून बसतात, ते काढण्यासाठी तो धुणे गरजेचे आहे. आपण कपडे धुण्यासाठी एक तर बादलीत निर्मलक घालून भिजवतो किंवा धुलाई मशीनमध्ये कपडे टाकून त्याबरोबर निर्मलक घालतो आणि मशीन सुरू केल्यावर कपडय़ाच्या वस्तुमानानुसार आवश्यक तेवढे पाणी मशीनमध्ये घेतले जाते. पाणी आणि निर्मलकाच्या अणूमध्ये जी रासायनिक क्रिया होते. त्यामुळे पाण्याचे अणू निर्मलकाच्या अणुसंचाला घेऊन बादलीत फिरतात. त्यावेळी निर्मलकाच्या अणुसंचाचा मारा मळाच्या सूक्ष्मकणांवर होतो. सूक्ष्मकणांना अशी ऊर्जा मिळाली की ते कपडय़ापासून वेगळे होतात.

जितके तापमान जास्त तेवढे पाण्याचे अणू जास्त फिरतात. त्यामुळे निर्मलकाचे अणुसंचही फिरतात म्हणून जास्त मारा मळाच्या कणांवर होतो. कपडय़ापासून वेगळे झालेले मळाचे कण अणुसंचाच्या माऱ्यामुळे अतिसूक्ष्म होतात व पाण्यात तरंगतात. द्रवरूप मळाचे कणही वेगळे होऊन त्याचा वेगळा द्राव होतो. निर्मलकातील एका विशिष्ट घटकामुळे तेलाच्या मोठय़ा थेंबाचे अतिसूक्ष्म कण तयार होतात. हे अतिसूक्ष्म कण पाण्यात तरंगतात. या दोन्ही क्रियांमुळे घन व द्रवरूप मळाचे कण कापडापासून वेगळे होतात. असे काही कण पाण्यात विरघळतात.
असे मळाचे सूक्ष्मकण कापडापासून वेगळे झाले तरी ते पुन्हा कपडय़ावर बसू शकतात. समजा १०० सूक्ष्मकण निघाले आणि पुन्हा २५ सूक्ष्मकण कपडय़ावर परत बसले तर ७५ टक्के स्वच्छता झाली असे म्हणावे लागेल. त्यामुळे मळाचे सूक्ष्मकण नुसते कपडय़ाच्या बाहेर येऊन चालणार नाहीत. तर वेगळे झालेले कण पुन्हा कपडय़ावर बसणार नाहीत किंवा कमीत कमी बसावेत, अशी क्रिया झाली पाहिजे.
याकरिता हे कण तरंगत राहावेत म्हणून काही रसायने निर्मलकामध्ये वापरलेली असतात. तरीही १०० टक्के स्वच्छता साध्य होईलच असे नाही. त्यामुळे नवीन कपडे सुरुवातीला जेवढे पांढरे शुभ्र दिसतात तेवढे काही धुलाईनंतरचे कपडे दिसत नाहीत. यात पुन्हा एकसारखे मळलेले कपडे एकदम धुणे, पांढरे व रंगीत कपडे वेगवेगळे धुणे, जास्त मळलेले कपडे वेगळे धुणे, असे विभाजन करून कपडे धुतल्यास अधिक चांगला परिणाम साधता येतो.

 विजय रोद्द (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर

ब्रिटिश अंकित हैदराबाद

१७९५ साली खर्डा येथे मराठय़ांकडून सपाटय़ाने मार खाल्लेल्या मीर निजाम अलीखान असफजाह द्वितीय याने १८०० साली ईस्ट इंडिया कंपनीबरोबर संरक्षण करार करून कंपनी सरकारचे आधिपत्य स्वीकारले. १८०३ साली मीर निजाम अलीखान असफजाह द्वितीयचा मृत्यू झाल्यावर मीर अकबर असफजाह तृतीय याची कारकीर्द सन १८०३ ते १८२९ अशी झाली. त्याच्या काळात हैदराबादेत ब्रिटिशांनी लष्करी ठाणे वसवून त्याचे नामकरण सिकंदराबाद असे केले. याच्या काळात राज्याची आíथक परिस्थिती हलाखीची झाली. असफजाह चतुर्थ याच्या काळात हैदराबादच्या निजामाचे स्वत:चे सन्य बरखास्त होऊन ब्रिटिशांची तनाती फौज राखली गेली. मीर तहनियात खान असफजाह पंचम याची कारकीर्द इ.स. १८५७ ते १८६९ अशी झाली. याच्या काळात प्रशासकीय व्यवस्थेसाठी राज्य पाच सुभ्यांमध्ये आणि सोळा जिह्य़ांमध्ये विभागले होते. सुभ्यांसाठी त्याने सुभेदार आणि जिह्य़ांसाठी तालुकदार अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. असफजाह पंचमला सालारजंग हा कर्तृत्ववान पंतप्रधान मिळाला. सालारजंगाने संस्थानासाठी मध्यवर्ती खजिना स्थापन केला, न्यायदानामध्ये सुसूत्रता आणली, डाक व्यवस्था, तारघर आणि रेल्वे सेवा सुरू केली. १८५७ सालच्या स्वातंत्र्य युद्धात निजामाने ब्रिटिशांना पाठिंबा देऊन मदत केली. ही मदत केली नसती तर पुढे ब्रिटिश एवढे सामथ्र्यवान झाले नसते. मेहबूब अली खान असफजाह सहावा या निजामाची कारकीर्द इ. स. १८६९ ते १९११ अशी झाली. पíशयन, अरेबिक, उर्दू आणि इंग्रजी या भाषांमध्ये निपुण असलेल्या या निजामात दिव्य शक्तीचा संचार होत असे, असा समज आहे. तो आपल्या अद्भुत शक्तीने साप किंवा नाग चावलेल्या व्यक्तीचे विष काढून त्यांना बरे करीत असे. या त्याच्या अद्भुत शक्तीमुळे ‘मेहबूब अली पाशा’ असे त्याचे आदरार्थी नामकरण लोकांनी केले होते. या सहाव्या निजामाचा मृत्यू १९११ साली झाला.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com