सगळ्यात हलकं काय, असं कोणी विचारल्यावर आपण पटकन हवा असं म्हणतो. हवेपेक्षाही काय हलकं असू शकतं, असं म्हटल्यावर हवेत वर उडणारे फुगे विशेषत: हेलिअम या वायूचे फुगे आपल्याला आठवतात. खरं तर हेलिअमपेक्षाही हलका असणारा वायू म्हणजे हायड्रोजन! जसं आवर्तसारणीत हायड्रोजननं पहिलं स्थान पटकावलं आहे, तसं हलकं असण्यातही हायड्रोजन या मूलद्रव्यानं पहिलं स्थान पटकावलं आहे. हायड्रोजन हा सगळ्यात हलका वायू असल्यानं त्याने भरलेला फुगा हवेत सोडला तर वर उडेल, हा शोध १७८१ मध्ये इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका इटालियनानं लावला. मग या फुग्यातून लोकांची ने-आण करण्याची कल्पना निघाली. १७८५ साली असाच एक फुगा प्रवाशांना घेऊन उडाला तेव्हा त्याचा स्फोट होऊन त्यातील लोक मृत्यू पावले. साधारणपणे दीडशे वर्षांनंतर १९३७ साली ‘हिडनबर्ग’ नावाचा फुगाही असाच न्यूजर्सी इथे स्फोट होऊन नष्ट झाला. त्यात ३६ जण मृत्युमुखी पडले. पण प्रश्न पडतो की हायड्रोजन हे मूलद्रव्य सगळ्यात हलकं का आहे? याचं उत्तर हायड्रोजनच्या अणुरचनेत आहे. हायड्रोजन हे असं एकच मूलद्रव्य आहे, ज्याच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन नाही. हायड्रोजन अणूच्या केंद्रकात एक प्रोटॉन आणि अणुकेंद्रकाभोवती फिरणारा एक इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे हायड्रोजन मूलद्रव्याच्या एका अणूचं वस्तुमान १.००८ ऊं (डाल्टन)आहे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात संशोधन करणाऱ्या हॅरॉल्ड युरे या रसायनशास्त्रज्ञाने १९३१ साली हायड्रोजनचा एक समस्थानिक शोधून काढला. हायड्रोजनच्या या समस्थानिकाचं नामकरण करण्यात आलं ‘डय़ुटेरिअम.’ डय़ुटेरिअमच्या केंद्रभागी एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन अशी जोडी असते व त्यांच्याभोवती भ्रमण करणारा एक इलेक्ट्रॉन. परंतु एका न्यूट्रॉनमुळे डय़ुटेरिअमचे वस्तुमान सामान्य हायड्रोजनच्या दुप्पट असते. त्यामुळेच डय़ुटेरिअमला ‘हेवी हायड्रोजन’ असंही म्हणतात. डय़ुटेरिअमनंतर लवकरच ट्रिशियम या हायड्रोजनच्या दुसऱ्या समस्थानिकाचा शोध लागला. ट्रिशियमच्या केंद्रभागी एक प्रोटॉन व दोन न्यूट्रॉन असून एकच इलेक्ट्रॉन या त्रिकुटाभोवती भ्रमण करीत असतो. आधुनिक हायड्रोजन बॉम्बमध्ये डय़ुटेरिअम आणि ट्रिशियम यांचा इंधन म्हणून उपयोग केला जातो. डय़ुटेरिअमपासून तयार केलेल्या जड पाण्याचा वापर अणुभट्टीमध्ये केला जातो, तर हायड्रोजनचा वापर अमोनियानिर्मितीसाठी होतो. - शुभदा वक्टे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org इंडोग्रीक राजा मिनॅण्डर ऊर्फ मिलिंद अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्य प्रदेशाची शकले होऊन त्यांचे लहान लहान राज्यांमध्ये रूपांतर झाले. त्यांपैकी काही राज्यांचा विस्तार भारतीय प्रदेशात झाला. त्यातील बरेचसे ग्रीक राज्यकत्रे बौद्ध किंवा हिंदू धर्म स्वीकारून भारतीय संस्कृतीत मिसळले. या राज्यांना इंडो-ग्रीक किंगडम असे म्हणत असत. साधारणत: इ.स.पूर्व २०० मध्ये बॅक्ट्रिया (म्हणजे सध्याचे अफगाणिस्तान) येथील इंडो-ग्रीक राजा दिमित्रियस याने आपली राजधानी तक्षिला (म्हणजेच सध्याचे तक्षशीला) येथून त्याचे सेनाधिकारी अपोलोडेटस आणि मिनॅण्डर यांना राज्यविस्तार करण्यासाठी पंजाब आणि उत्तर भारतात पाठविले. या दोघांनी घेतलेल्या प्रदेशांवर आपापले स्वतंत्र राज्य स्थापन केले. यापैकी मिनॅण्डरने घेतलेल्या काबूल खोऱ्यापासून मथुरेपर्यंतच्या विशाल भूभागावर इ.स.पूर्व १६० ते इ.स.पूर्व १४० या काळात त्याची सत्ता होती. हा ग्रीकवंशीय भारतीय राजा ‘मिनॅण्डर’, ‘मिनॅण्डर पहिला’, ‘मिनाण्डर’ किंवा ‘मििलद’ या नावांनी ओळखला जातो. मिनॅण्डर त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून मृत्यूपर्यंत भारतीय संस्कृतीत इतका रमला की, तो मिलिंद या नावानेच अधिक ओळखला जातो. तो एक यवन म्हणजे ग्रीक होता, हे लोक विसरून गेले. सध्या पाकिस्तानात असलेल्या सागाल ऊर्फ सियालकोट येथे मििलदची राजधानी होती. शासकीय कामासाठी प्रवास करताना मिलिंद बौद्ध श्रमणांच्या संपर्कात आला. याच काळात आचार्य नागसेन यांच्याकडून त्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. रीतसर धम्मदीक्षा घेणारा मिलिंद ऊर्फ मिनॅण्डर हा पहिला पाश्चिमात्य राज्यकर्ता म्हणून ओळखला जातो. अनेक विषयांची जिज्ञासा असणाऱ्या मिलिंदची जिज्ञासापूर्ती आचार्य नागसेनांनी केली. त्यामुळे प्रभावित होऊन मिलिंदने आपल्या राज्यात बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. मिलिंद भारतीय इतिहासात उल्लेखनीय ठरला तो त्याच्या ‘मिलिंदपन्ह’ (पाली भाषेतील ‘मिलिन्दपञ्हो’) या ग्रंथामुळे! मिलिंदपन्ह म्हणजे मिलिंदचे प्रश्न या बौद्ध ग्रंथात बौद्ध पंडित नागसेन आणि मिलिंद यांच्यातील संवाद ग्रथित केलाय. याच काळात मिनॅण्डरचे नामकरण मिलिंद असे झाले. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com