दोन-तीन वर्षांपूर्वी माझ्या स्वभावाप्रमाणे उतारवयातही मी एक जरा अतिरेकी प्रयोग केला. त्यात माझ्या मुंबईच्या व्यवसायावर थोडंफार पाणी सोडून एका ग्रामीण, पण अत्याधुनिक रुग्णालयात महिन्यातले १५ दिवस सेवा देण्याचा प्रयत्न केला. परिसर रम्य आणि नीटनेटका होता. अगदी लहान-लहान वस्त्यांमध्येही बाहेर एका गोऱ्यापान निळे डोळे असलेल्या बाईचे छायाचित्र झोपडीवजा घरावर लावलेले दिसे आणि वर मराठीत पाटी असे ‘ब्यूटी पार्लर’. इथल्या एका बाईशी मी बोललो. तिने याचा अर्धाकच्चा तथाकथित कोर्स जवळच्या तालुक्याच्या गावी केला होता. मला म्हणाली, भरपूर मागणी आहे. एका बाईला मढविण्याचे २५ रुपये घेते. तेवढीच घरात मदत होते.
हल्ली कोपऱ्या-कोपऱ्यावर ब्युटी पार्लर्स निघाली आहेत. भारतात आर्थिक उदारीकरण आल्यावर जर कोणी आपल्या तुंबडय़ा ओतप्रोत भरल्या असतील तर या सौंदर्य प्रसाधक निर्मात्यांनी आणि विक्रेत्यांनी. जर आपण गेल्या दहा-वीस वर्षांचा इतिहास बघितला तर उदारीकरणाच्या पहिल्या पाच वर्षांत भारतातल्या अर्धा डझन स्त्रियांनी विश्व किंवा तत्सम सुंदरींचे किताब पटकाविले. याच्या मागे या प्रसाधनांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा हात होता, अशी वदंता आहे. एखादे धरण फुटावे तसे हे लोण पसरले आणि डोंबिवली आणि पाल्र्याच्या मुलीदेखील हायहिल्स घालून, लचकत चालत सौंदर्य स्पर्धामधून झळकू लागल्या. हल्ली जो तो सुंदर होऊ पाहतो आहे. त्यात पुरुषांची संख्या कमी असली तरी नगण्य नाही.
 सगळ्यांना चरबी स्वस्तात काढून मिळत असेल तर हवी आहे. सुरकुत्या नको आहेत. टक्कल पडले तर नरकवास मिळाल्याची शिक्षा समजतात. शरीरावर कोठेही जिथे नको तिथे एक जरी केस उगवला तरी साप डसल्यासारखी आपत्ती ओढवली असे वाटते. कोणाला स्तन मोठे हवे आहेत. काहींना लहान करून हवे आहेत. कोणाला कृत्रिम खळी पाडून घ्यायची आहे. ज्यांना थोडेफार मुरुमाचे व्रण आहेत त्यांना इस्त्री करून हवी असते. मेकअपचे तर काही विचारूच नका. वधू इतकी नटते की, ती स्वत: कुठे दिसतच नाही आणि जेव्हा उगवते तेव्हा एक-दीड तास उशिरा येते.
हा देश स्वतंत्र आहे आणि बायकांविरुद्ध ‘ब्र’ काढण्याची हल्ली सोय नाही. माझी तरी नाही आणि वर मी पडलो प्लास्टिक सर्जन. असे लिहिणे म्हणजे स्वत:च्या पोटावर पायच, पण या भानगडीतले काही अशोभनीय किस्से  येत्या सोमवारच्या लेखात.

कुतूहल- कलम का व कसे?
कलम म्हणजे एका चांगल्या जातीच्या झाडाच्या फांदीचा दुसऱ्या कणखर जातीच्या फांदीशी केलेला मिलाप. हे वाचायला जेवढं सोपं वाटतं, तेवढं सोपं नाही. ही एक प्रकारची शल्यक्रियाच आहे. आंब्याच्या बाबतीत, हापूससारख्या जातिवंत आंब्याच्या फांदीच्या सालीला व्यवस्थित काप देऊन कोयीपासून केलेल्या (म्हणजे रायवळ) रोपांवर तसाच काप देऊन दोन्ही फांद्या घट्ट बांधतात. फांद्या एकजीव झाल्यावर सांध्याच्या वरची रोपाची फांदी कापून टाकतात. अशा प्रकारे तयार होणाऱ्या कलमात मूळचा भाग हा रायवळचा तर कलमाच्या वर वाढणारे झाड त्या विशिष्ट जातीचे असते.
अशाच प्रकारची कलमक्रिया गुलाबासारख्या फुलझाडांवरही केली जाते. फरक एवढाच की, येथे संपूर्ण फांदी जोडण्याऐवजी आपल्याला हव्या त्या गुलाबाच्या जातीचा पानामागे दडलेला एक डोळा म्हणजे अंकुर सालीसकट काढून तो जंगली गुलाबाच्या कुंडीत लावलेल्या रोपावर एक खाच पाडून बांधला जातो. थोडक्यात, त्या रोपाने एखादं दत्तक मूल वाढविण्यासारखाच हा प्रकार असतो. हे सव्यापसव्य करण्यामागे कारण काय?
आंब्याचं फळ जेव्हा तयार होतं, तेव्हा परागणाची क्रिया ही नसíगकरीत्या कुठल्याही परागांनी होत असल्यामुळे आतील कोय ही १०० टक्के त्याच जातीची असेल अशी शाश्वती नसते. मात्र आपण जेव्हा हापूसची फांदी कलमासाठी वापरतो (लैंगिक पुनरुत्पादन) तेव्हा ती मूळ जातीचे सर्व गुण घेऊनच वाढते व आपल्याला हवी त्याच जातीची फळं मिळतात.
गुलाबाच्या बाबतीत ते झुडूप असल्यामुळे जरा जून फांदी रोवून केलेल्या झाडाची एकंदर रोगप्रतिकारकशक्ती व प्रतिकूल वातावरणात तग धरण्याची क्षमता कमी असते. म्हणून त्यांचं कलम करण्यासाठी काही देशी गुलाबाच्या जातींचा वापर केला जातो. इतर काही फळझाडांच्या पुनरुत्पादनासाठीही कलमाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, चिकूचे कलम खिरणीवर, संत्र्याचे जांबोरी किंवा रंगपूर लाइमवर, बोराचे देशी बोरावर. शोभेच्या फुलझाडांत गुलाबाव्यतिरिक्त हवाई जास्वंद, सोनचाफा, रंगीत निवडुंग इत्यादी झाडांचेही कलम करतात. कधी कधी हे दत्तकविधान रोपाने नाकारले, तर न फुलणारा गुलाब वाढतो, चिकूचे कलम मृत होऊन खिरणीचेच झाड वाढते.
– डॉ. विद्याधर ओगले    मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस – दमा : भाग ३
गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ सर्वसामान्य आयुर्वेदप्रेमींकरिता मी आठवडय़ातून तीन दिवस सायंकाळी आयुर्वेद परिचय वर्ग घेतो. त्याकरिता अनेक प्राचीन ग्रंथांचे वाचन करतो. अशाच वाचनातून दमा विकाराकरिता एक अफलातून पाठ वाचनात आला. घटकद्रव्ये कमीत कमी, वापरावयाचा कार्यकारण भाव चटकन पटणारा, लवंग, रुईची ताजी फुले व शुद्ध गुग्गुळ. वाचनानंतर लगेच गोळय़ा तयार केल्या. दीर्घकाळ दम्याची औषधे घेणाऱ्या तरुण, बलवान रुग्णांना लवंगादि गुग्गुळाचा फायदा होतो, असा अनुभव आहे. आयुर्वेदीय मान्य ग्रंथात ‘रसरत्नसमुच्चय’ हा एक अप्रतिम ग्रंथ आहे. अभ्रकभस्माचे महत्त्व सांगताना ग्रंथकारांनी ‘श्वासहर अभ्रक’ असा एक विविध औषधी वनस्पतींच्या काढय़ाच्या, रसांच्या भावना देऊन अभ्रकभस्म बनवायचा सांगावा वैद्यांना दिला आहे. त्या आधारावर बनवलेल्या ‘अभ्रकमिश्रण’ औषधाचा उपयोग दमेकरी रुग्णांकरिता फुफ्फुसाची ताकद वाढवण्याकरिता होतो. हवेतील प्राणवायू घेण्याची क्षमता दमेकरी रुग्णांची क्षमता अभ्रकभस्म वाढवते. आयुर्वेदीय औषधी महासागरात ज्वरांकुश या नावाच्या औषधाचे ११ विविध पाठ आहेत, त्यापैकी ११पाठांत पारा, गंधक व विविध धातूंची भस्मे आहेत. फक्त ज्वरांकुश (भा. भै. र. २१५७) या पाठात मृगशृंग व सुंठ, मिरे, पिंपळी अशी कमीत कमी, पण फुफ्फुसाला ‘इन्स्टंट’ ताकद देणारी घटकद्रव्ये आहेत. दमा विकारात ज्वरलक्षणाकरिता लक्ष्मीनारायण हे ग्रंथोक्त औषध उपयुक्त आहे. दम्यामध्ये आवाज बसणे, वजन घटणे, थुंकीतून रक्त पडणे याकरिता एलादिवटी या गोड गोळय़ा मोठेच योगदान देतात. खूप औषधे घेऊन दमा आटोक्यात आल्यावर ज्येष्ठमध, मिरे, टाकणखारलाही, डाळिंबसाल, बेहडा व लवंगचूर्ण असणारे खोकला चूर्ण वापरावे. दमा विकार हा प्रामुख्याने कफप्रधान व वातामुळे रुग्णांना खूप दमवतो. त्याकरिता सुंठ, रिंगणी, गुळवेल, पुष्करमूळयुक्त ‘नागरादिकषाय’ टॉप गुण देतो. अष्टांगहृदयकार श्री वाग्भटाचार्य यांना अनेकानेक प्रणाम!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   -१६ मार्च
१९०१ > भारताचे सरन्यायाधीशपद भूषविलेले प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्रगडकर यांचा साताऱ्यात जन्म. ‘काश्मीर : रिट्रोस्पेक्ट अँड प्रॉस्पेक्ट’, ‘सेक्युलरिझम अँड द इंडियन कॉन्स्टिटय़ूशन’,  ‘लॉ, लिबर्टी अँड जस्टिस’ ही इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली, तर त्यांच्या निबंधांचे ‘समाजप्रबोधन’ हे संकलन श्यामकांत बनहट्टींनी केले. न्या. रानडे यांच्या सामाजिक परिषदेचा पुनरोद्धार करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या न्या. गजेंद्रगडकरांचा अनेक संस्थांशी संबंध होता. त्यांचे निधन १२ जून १९८१ रोजी झाले.
१९४५ > ‘हिंदुस्थान हिंदुओंका..’ या आक्रमक घोषणेचे जनक बाबाराव सावरकर  (गणेश दामोदर सावरकर) यांची साहित्यसंपदाही मोठी आहे. ‘वीरा-रत्नमंजूषा’, ‘शिवरायांची आग्ऱ्यावरील गरुडझेप’, ‘ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली. स्वतची मते पक्की ठेवून स्वातंत्र्यलक्ष्मीचा जयघोष आयुष्यभर अनेक कृतींनी करणाऱ्या बाबारावांचे निधन या दिवशी झाले.
१९६२ > कवी व ‘शुद्धलेखन- शुद्ध मुद्रण कोश’कर्ते हरी सखाराम गोखले यांचे निधन.
१९९९ > कथा, कादंबरीकार व अनुवादक कुमुदिनी रांगणेकर यांचे निधन. त्यांनी बालवाङ्मयही विपुल लिहिले होते.
– संजय वझरेकर