दहाव्या शतकाच्या अखेरीस गझनीच्या महम्मुदाने भारतीय प्रदेशावर केलेल्या सतरा स्वाऱ्यांमधील अफगाण लष्करातून आलेले पठाण सनिक हे पहिले भारतीय पठाण होत. पुढे दिल्लीवरील सुमारे ३५० वर्षांचा अंमल झालेल्या सल्तनतींच्या काळात भारतात येऊन स्थायिक झालेल्या पठाणांची संख्या भराभर वाढली. विशेषत शेरशहा सुरीच्या केवळ पाच वर्षांच्या कारकीर्दीत पठाणांचे लोंढे येऊन दिल्ली आणि उत्तर हिंदुस्थानात स्थायिक झाले. पुढे हे पठाण देशभर पसरले. १९४७ साली भारतीय स्वातंत्र्य काळात झालेल्या फाळणीच्या वेळी फार मोठय़ा संख्येने पठाणांनी नवजात पाकिस्तानात स्थलांतर केले. फाळणीनंतरच्या सत्तर वर्षांत भारतातील विविध प्रांतांत स्थायिक झालेल्या पठाणांनी तिथली स्थानिक भाषा आणि जीवनशैली स्वीकारली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या प्रांतांमध्ये स्थायिक झालेल्या पठाणांची संख्या अधिक आहे. उंचेपुरे, दणकट शरीरयष्टीचे पठाण भारतात प्रथम आले ते योद्धे म्हणून. त्यांच्यापकी बहुतेकांनी सुलतान, बादशाह, नवाब, राजे महाराजांच्या लष्करात नोकऱ्या केल्या. त्यातील अनेकांनी भाडोत्री सनिक म्हणूनही काम केलं. ब्रिटिशांनीही त्यांच्या इंडियन रॉयल आर्मीत पठाण रेजिमेंट तयार केली. सध्याही भारतीय संरक्षण दलांमध्ये अनेक पठाण उच्चपदस्थ आहेत. सावकारीच्या व्यवसायास आवश्यक असणारे वसुली करण्याचे कसब आणि धमक बहुतेक पठाणांकडे असल्याने अनेक पठाण सावकारीचा आणि उधारीने वस्तू विक्रीचा व्यवसाय करताना दिसतात. मूळचे अफगाण असलेल्या या भारतीय पठाणांची मूळ भाषा पुश्तो असली तरी भारतात येऊन अनेक शतके लोटलेल्या त्यांच्या वंशजांनी आता उर्दूलाच आपली मातृभाषा मानली आहे. लिहिण्यासाठी हे लोक पíशयन किंवा अरेबिक लिपीचा वापर करतात. बहुतेक पठाण हिंदीच्या जोडीला त्या त्या प्रांतातल्या स्थानिक भाषा बोलतात. स्थानिक लोकांशी सणासुदीला, सुखदुखाच्या प्रसंगांमध्ये मिळून मिसळून राहणारे हे पठाण आता भारतीयच झालेत! - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com