गेली कित्येक शतके युरोपच्या राजकारणाला आकार देणाऱ्या पॅरिसने समाजजीवनाच्या अनेक क्षेत्रांवर आपला वेगळा ठसा उमटविला. बाहेरील आणि अंतर्गत आघातांनी अनेकवेळा खिळखिळे झालेले पॅरिस नवनवीन आघात सोसायला हसतमुखाने तयार असतेच!
वैज्ञानिक प्रगती, क्रांतिकारी विचारप्रणाली आणि याचबरोबर विलासी जीवनाचेही प्रतीक बनलेले पॅरिस शहर हे संपूर्ण जगातल्या, व्यक्तिस्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्यांनाही आपले माहेरघर वाटते!
अलीकडे पॅरिसमध्ये झालेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व ९८०० आणि ७५०० या काळातल्या मानवी अस्तित्वाचे काही पुरावे सापडले आहेत. त्यावरून पॅरिस हे युरोपातील सर्वाधिक जुने मानवी वसतिस्थान होते, असे म्हणता येईल. पुढे ख्रिस्तपूर्व २५० ते २२५ या काळात सेल्टिक वंशाच्या ‘पारिसी’ या जमातीने सीन नदीच्या किनाऱ्यावर वस्ती केली. या लोकांनी त्या प्रदेशात नदीवर पूल बांधून किनारे एकमेकांना जोडले. हे लोक पुढे प्रगत होऊन त्यांनी सीन नदीतून व्यापारही सुरू केला.
पॅरिस या नावाची व्युत्पत्ती दोन प्रकारे सांगितली जाते. एकतर ‘पारिसी’ या सेल्टिक जमातीच्या नावावरून आणि दुसरे म्हणजे ‘परिस’ म्हणजे पíशयन भाषेत देवदूत. ख्रिस्तपूर्व काळात पíशया आणि ग्रीसची नगरराज्ये प्रबळ होती. ग्रीक पुराणातील ट्रोजन युद्धातील नायकाचे नाव होते पॅरिस.
पारिसी जमातीने सीनच्या किनाऱ्यावर वस्ती केली ती नदीतल्या ‘आइल-डि -ला-साइट’ या लहानशा बेटावर. तिथे त्यांना मच्छीमारीसाठी सोयिस्कर जागा होती.
पॅरिस याच नावाची शहरे फ्रान्सशिवाय इलिनॉय, अर्कान्साँ, इडाहो, टेनेसी आणि टेक्सास या पाच अमेरिकन राज्यांमध्येही आहेत.

– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com 

 

भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ : प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर
प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचा जन्म कोकणातील मालवण येथे १८ नोव्हेंबर, १८८४ रोजी झाला. वडिलांच्या बदल्यांमुळे त्यांचे शालेय शिक्षण ५-६ ठिकाणी झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विषय घेऊन ते बी.ए. प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. १९०७ साली ते मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजात वनस्पतीशास्त्र शिकवत. पुढे ते एम.ए. झाले. आघाराकरांना वनस्पती आणि प्राण्यांचे नमुने गोळा करण्याची आवड होती. सह्य़ाद्रीच्या डोंगरात फिरत असताना त्यांनी गोडय़ा पाण्यातील जलपुष्प प्राण्यातील एका नवीन जातीचा शोध लावला. हे त्यांचे संशोधन नेचर मासिकात छापून आले होते. नंतर त्यांना शालेय शिक्षकाची मिळू घातलेली नोकरी नाकारून ते कोलकात्याच्या इंडियन म्यूझियममध्ये गेले. म्यूझियममधील सिलेंटराटा विषयाच्या प्राध्यापकांनी त्यांना स्पंज जातीच्या प्राण्यांचे नमुने गोळा करायचे आणि टिकवायचे शिक्षण दिले.आघारकरांनी सह्य़ाद्रीतून शोधून काढलेल्या इंगळीच्या एका जातीला ‘क्रीप्तोहिपटास आघारकारी’ असे नाव दिले आहे. नंतर कोलकाता विद्यापीठात रासबिहारी घोष प्राध्यापकपदासाठी सर सी. व्ही. रामन यांनी सर आशुतोष मुखर्जी यांना शिफारस केली होती. आघारकरांनी दोन वष्रे जर्मनीत संशोधन केले व पीएचडी मिळवली. युरोप इंग्लंड व नेपाळमधील दुर्मिळ वनस्पती त्यांनी त्या वेळी गोळा केल्या. हावरा येथील दुर्मिळ वनस्पतींचे नमुने लंडन येथे हलविले जाणार आहेत हे समजल्यावर त्यांनी त्याला विरोध करून ते हलवू दिले नाहीत. त्यांच्या प्रयत्नाने लंडनमध्ये जाऊन अभ्यास करण्याच्या शिष्यवृत्त्या दोन विद्यार्थ्यांना मिळू लागल्या.आघारकरांच्या विद्यार्थ्यांनी भात, ज्यूट, आंबा, केळी अशा पिकांवर संशोधन केले. १९२४ सालच्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पुढाकाराने वाळलेल्या वनस्पतींची (हब्रेरियम) जागोजागी कायमची प्रदर्शने सुरू झाली. योजना आयोगाच्या मृदसंधारण आणि वनीकरण समितीचे ते अध्यक्ष होते. १९४६ साली कोलकात्याहून निवृत्त झाल्यावर आघारकर पुण्याला आले आणि त्यांनी विज्ञानवíधनी संस्थेची स्थापना केली. तेथे वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, कवकशास्त्र इत्यादी विषयांवर संशोधन चालते. आघारकर यांचे निधन वयाच्या ७६ व्या वर्षी १९६० साली झाले.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद,
office@mavipamumbai.org