भारतात स्थायिक झालेल्या अँग्लो इंडियन समाजातील अनेक व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आपली विशेष ओळख करून ठेवली आहे. त्यापैकी एक प्रसिद्ध बालसाहित्यिक रस्किन बॉण्ड होत. १९३४ साली हिमाचल प्रदेशमधील कसौली येथे जन्मलेले रस्किन उत्तराखंडच्या मसुरीजवळच्या खेडय़ात स्थायिक झाले आहेत. ऑब्रे अलेक्झांडर बॉण्ड या ब्रिटिश नागरिकांचे हे पुत्र. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई-वडील विभक्त झाल्यावर रस्किनचा सांभाळ त्याच्या वडिलांनी केला. रस्किनला बालवयातच वाचनाचा छंद लागला. रोज दैनंदिनी लिहायची सवय त्याला वडिलांनीच लावली. वडिलांचाही अकाली मृत्यू झाल्यामुळे रस्किन त्याच्या आईकडे राहावयास गेला. अनेक वर्षे वसतिगृहात राहिला. पुढे अधिक शिक्षण घेण्यासाठी आईने त्याला लंडनच्या एका कॉलेजात पाठवले. तिथे लहान-मोठय़ा नोकऱ्या करीत त्याने शिक्षण पूर्ण केले. पण सतत मसुरी, तिथला निसर्ग, तिथले दिवस यांच्या आठवणीने बेचन होणाऱ्या रस्किनने स्वत:ला लिखाणात मग्न राहायची सवय लावली. या अवस्थेत त्याने ‘द रूम ऑन द रूफ’ लिहिले. ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध होताच त्यांच्या साध्या, सरळ भाषाशैलीने साहित्यिक वर्तुळात आणि समीक्षकात त्यांचे मोठे कौतुक होऊन प्रतिष्ठेचा ‘जॉन लेव्हलीन पुरस्कार’ मिळवून दिला. केवळ सतराव्या वर्षी राष्ट्रकुल साहित्यिकांसाठी असणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवल्यामुळे रस्किन बॉण्डचे भवितव्य लंडनला राहून उजळणार यात काहीच शंका नव्हती. परंतु या प्रसिद्धीहून रस्किनना आपल्या बालपणीच्या, हिमालयाच्या निसर्गरम्य सान्निध्यात काढलेल्या दिवसांची ओढ अधिक होती. पुरस्काराची मोठी थोरली रक्कम हाती पडताच त्या पशांनी रस्किनने बोटीने भारतात परतण्याचे मुंबईचे तिकीट काढले. त्यांच्या वडिलांची पहिली पत्नी बीबीजी हिने रस्किनची डेहराडूनजवळ राहण्याची सोय केली. इथेच त्यांचे लेखन बहरले. सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com