साधारणत पाच शतके इस्लामचे प्रमुख केंद्र आणि त्यांचा सर्वोच्च धर्मगुरू खलिफा याचे धर्मपीठ बनून राहिलेल्या इस्तंबूलमधून खिलाफत बरखास्त करून तिथे धर्मनिरपेक्ष सरकार प्रस्थापित करण्याची अत्यंत अवघड कामगिरी अतातुर्क केमाल पाशाने ३ मार्च १९२४ रोजी पार पाडली. सध्या तुर्कस्तानात ९८ टक्के इस्लामधर्मीय लोक आहेत, पण त्यातील फक्त २० टक्के लोकच इस्लामी परंपरा आणि रूढी पाळतात. पाच शतकांपासून इस्तंबूलच्या तख्तावरील सुलतानाला मुजरा करणे आणि तोच धर्मप्रमुख म्हणजे खलिफा मानला गेल्याने त्याला मान देणे हे प्रत्येक तुर्क आपले कर्तव्य मानत आला होता. १९२४ साली प्रजासत्ताक राज्य स्थापन झाल्यावर केमालने लोकसभा बोलावून सभासदांना सुलतानाच्या नाकत्रेपणाबद्दल मोठे भाषण ठोकून अचानक एक ठराव लोकसभेत मांडला. या प्रस्तावात सुलतानपद आणि खलिफापद वेगवेगळे करून सुलतानपद रद्द करण्याचा ठराव होता. याबद्दल सल्ला घेण्यासाठी केमालने धर्मपंडित आणि कायदेपंडितांची एक समिती नेमली. इस्लामी कायद्यात आणि कुराणातही सुलतान आणि खलिफापद एकत्र ठेवण्याला आधार न मिळाल्याने हा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर तत्कालीन सुलतान महमद सहावा दुसऱ्या देशात आश्रयासाठी पळून गेला तर त्याचा पुतण्या अब्दुल मजिद याला खलिफापद देण्यात आले. काही महिन्यातच केमालने खलिफाविरुद्ध जनमत तयार करून लोकसभेत खिलाफत रद्द करण्याचा ठराव आणून तो मंजूरही करून घेतला. तसा ठराव मंजूर झाल्यावर खलिफा अब्दुल मजिद याला हद्दपार करण्याचा जाहीरनामा केमालने काढला. दुसरा काहीच पर्याय न उरल्याने अब्दुल आपल्या सर्व पत्नींसह, मुलांसह रेल्वेगाडीने स्वित्झर्लण्डला कायमचा राहण्यास गेला. १९२६ मध्ये केमालने नवीन नागरी कायदा संमत करून तसा जाहीरनामा काढला. त्यात म्हटले होते ‘आपल्या सरकारचे काम लोकांचे इहलोकीचे प्रश्न सोडविण्याचे आहे, परलोकात गेल्यावरच्या प्रश्नांची आपली जबाबदारी नाही!’ - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ : प्रा. राधेश्याम त्रिपाठी बनारस हिंदू विद्यापीठातून प्रा. रामदेव मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट मिळवल्यावर डॉ. त्रिपाठी १९६३ मध्ये तेथेच अध्यापन करू लागले. काही वष्रे गोरखपूर विद्यापीठात शिकवल्यावर ते मेघालयातल्या शिलाँग येथील नॉर्थ-ईस्टर्न हिल विद्यापीठात (ठएऌव) प्राध्यापक म्हणून रुजू झाले, तेथे ते २८ वष्रे शिकवत असताना संशोधनातही मग्न होते. दरम्यान, कॉमनवेल्थ फेलो म्हणून उत्तर वेल्स विद्यापीठाच्या बन्गोर येथील कॉलेजमध्ये प्रा. जॉन हार्पर (एफ.आर.एस.) यांच्याकडे पोस्ट-डॉक म्हणून दोन वष्रे (१९७१-१९७३) शेतातील तण-झुडपे, त्यांच्यातील संख्यांबद्दल संशोधन केले. तसेच युरोपियन कमिशनच्या शिष्यवृत्तींवर १९९३ मध्ये लंडनच्या इम्पिरिअल विद्यालयात सहा महिने संशोधन केले. जैव-वैविध्याची जपणूक, ऱ्हास झालेल्या जमिनीचे पुनरुत्थान या विषयातही त्यांनी संशोधन केले आहे. त्यांनी ३६ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले, २००च्यावर शोधनिबंध प्रसिद्ध केले व एक पुस्तक (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसाठी) लिहिले. निवृत्तीनंतर ते इन्सा (इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी) पुरस्कृत मानद शास्त्रज्ञ म्हणून लखनौच्या राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्थेमध्ये कार्यरत आहेत. राष्ट्रीय पथकाचे प्रमुख म्हणून प्रा. त्रिपाठी २००१ मध्ये जर्मनीतील ब्रेमेन येथील पर्यावरणाच्या समस्यांवरील (सायन्स कमिटी ऑन प्रॉब्लेम ऑफ एन्व्हायर्मेट स्कोप) चर्चासत्रास हजर होते. हिमालय परिसंस्था शाश्वतीकरण व्यवस्थेचे सभासद, अरुणाचल प्रदेशातील जैव-वैविध्य जपण्यासाठीच्या कार्यक्रमाचे समन्वयक, ईशान्येतील वनांत वनाच्या रक्षणाव्यतिरिक्त उद्योग होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आज्ञापालन करणाऱ्या समितीचे सभासद. पर्यावरण मंत्रालयाच्या वनीकरण आणि पर्यावरण विकास कार्याच्या ईशान्य प्रादेशिक केंद्राचे संचालक-समन्वयक इ. काय्रे त्यांनी केली आहेत. शिवाय विद्यापीठांच्या व शासनाच्या उच्च पदाधिकाऱ्यांच्या निवड समितीवरही त्यांनी काम केले आहे. प्रा. त्रिपाठी यांना अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. उदा.- फेलो, इंडिअन नॅशनल सायन्स अकॅडमी (एफ.एन.ए.), फेलो, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एकोलोजी (एफ.एन.आय.ई), फेलो, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (एफ.एन.ए.एस्.), अध्यक्ष, इंडिअन बोटानिकल सोसायटी, (कइर), उपाध्यक्ष, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एकोलोजी (एन.आय.ई.), बिरबल सहानी अॅवार्ड २०१२, प्रा. व्ही. पुरी अॅवार्ड २०१५-१६, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे विज्ञान विभूषण पदक इत्यादी. - प्रा. शरद चाफेकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org