प्राचीन काळी पराशर नावाच्या शेतीतज्ज्ञाने मुख्यत: भातशेती होणाऱ्या प्रदेशात उपयोगी पडेल, अशी माहिती ‘कृषी पराशर’ या ग्रंथात २४३ चरणांद्वारे दिलेली आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी भारतात शेती या विषयावर विविध अंगांनी सखोल असे लिखाण झाले होते. शेतीशी संबंधित पंधरा मुद्दे त्यांनी मांडले आहेत. त्यांतील उल्लेखनीय म्हणजे पावसाचे अनुमान, शेतीत वापरायच्या अवजारांची माहिती, पशुधनाचे व्यवस्थापन आणि बियाणांची काळजी.
पावसाचे महत्त्व सांगून त्याबद्दलचे ज्ञान आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले आहे. काही खगोलांची स्थिती, एखादा विशिष्ट ढग, वाऱ्याची दिशा, नदीची ठराविक दिवशीची पातळी, प्राण्यांच्या हालचाली इत्यादी घटक पावसाच्या अंदाजाकरिता त्यांनी विचारात घेतले आहेत. पराशरांनी ढगांचे चार प्रकार सांगितले आहेत- आवर्त, सामवर्त, पुष्कर व द्रोण. पौष महिन्यापासून प्रत्येक महिन्यात सरासरी किती पाऊस पडतो, याचे निरीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे. काठीला निशाण लावून वारा कोणत्या दिशेला वाहतो, याची दररोज नोंद करण्यासही त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तरेकडून व पश्चिमेकडून वाहणारे वारे पाऊस आणतात. तर दक्षिणेकडून व पूर्वेकडून वाहणारे वारे पाऊस आणत नाहीत. वार्षकि, महिन्याचे आणि आकस्मिक अशा विविध प्रकारच्या पावसांचे अनुमान त्यांनी सांगितले आहे. पाऊस मोजण्याची पद्धतही ते स्पष्ट करतात. ‘जलाधक’ हे पाऊस मोजण्याचे माप त्यांनी सांगितले आहे. १०० योजने क्षेत्रफळ आणि ३० योजने खोली असलेल्या क्षेत्रात जेवढे पाणी मावते, ते एक अधक.
पावसाच्या अंदाजानंतर ते शेताच्या अवजारांकडे वळतात. हा मुद्दा त्यांनी सविस्तर मांडला आहे. नांगर, त्याचे भाग व त्यांची मापे त्यांनी स्पष्ट केली आहेत. टणक जमिनीसाठी चकतीच्या आकाराचा फाळ वापरावा असे ते सांगतात. तसेच २१ सुळे असलेल्या दंताळ्याचा ते उल्लेख करतात. याला ते विद्धक (हॅरो) म्हणतात. या साधनाचे विविध उपयोग असतात. ते नांगराला जोडण्याचे साधन असून ते दणकट असावे, असा ते सल्ला देतात. (उत्तरार्ध मंगळवारच्या अंकात)

जे देखे रवी.. – शरीरावरच जर सगळे ध्यान
आपण आणखी सुंदर दिसावे किंवा आपल्या मनातल्या काहीतरी भलत्याच विचाराने न्यूनगंडाने ग्रासले जाऊन प्लास्टिक सर्जनकडे पोहोचणे आता नित्याचेच झाले आहे. त्यातल्या गमतीदार परंतु विदारक कथांचा अनेक खंडांचा एक ग्रंथ होऊ शकेल. हा हव्यास स्त्रियांमध्ये जास्त असला तरी आता पुरुषांचीही रांग लागली आहे. एक झकास तरुण आला होता. हुशार, अमेरिकेतल्या विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळाली होती, पण त्याची तक्रार होती टी शर्टमधून त्यांची स्तनाग्रे दिसतात म्हणून पाऊस पडला आणि टी शर्ट भिजला तर त्याला मरणप्राप्त वेदना होत असत. दुसऱ्या भेटीत त्याला एका अमेरिकन नियतकालिकातला उतारा दाखवला. त्यात लिहिले होते. टोकदार स्तनाग्रे हल्ली अमेरिकन मुलींना फारच मादक भासतात. याच्या मनातले फॅड त्या नियतकालिकातल्या उताऱ्याने मला नेस्तनाबूत करावे लागले.
तो उताराही फॅडच. दुसरा एक पुरुष म्हणाला वर्षभर जिममध्ये गेलो पण छाती भरत नाही मला कृत्रिम तबकडय़ा घालून द्या. त्याशिवाय व्यक्तिमत्त्व स्त्रियांच्या दृष्टीने आकर्षक होणार नाही. मी त्याला म्हटले ‘अरे तुझी शरीरयष्टी बघ तू धष्टपुष्ट होऊन होऊन किती होणार? आणि भारतातल्या स्त्रियांच्या हृदयांचा शहेनशहा अमिताभ बच्चन याचे दंड बांबूच्या जाडीचे आहेत. मोठे दंड आणि भरदार छाती बघून जर बायकांनी लग्ने केली असती तर अध्र्याहून अधिक पुरुष कुंवारे राहिले असते. हे मूलभूत सत्य सगळ्या पुरुषांना कळायला हवे. बायकांच्या गोष्टी थोडय़ा निराळ्या असतात. जगातल्या बहुतेक सर्व प्राण्यांमध्ये पुरुषालाच काहींना काहीतरी आभूषणे दिली आहेत. उदा. सिंहाची आयाळ किंवा मोराचा पिसारा. याचा बदला म्हणून की काय माणूस जातीत बाईमाणसांनी स्वत:च्या शरीराचे जणू प्रदर्शनच मांडायचे ठरविलेले दिसते.
 एक बाई घाईघाईत आली म्हणाली माझे दंड तीन इंच कमी करून द्या मी म्हटले एवढी घाई काय आहे तर म्हणाली १५ दिवसांनी लंडनमधल्या एका पार्टीला जायचे आहे तिथे स्लीव्हलेस पोलके घालायचे आहे.
 दुसरी एक तरुण आणखीनच घाईत होती. राहत होती दूरवर पनवेलजवळ.  सकाळी ८ वाजताची अपॉइंटमेंट दिली पाच मिनिटे आधीच आली. म्हणाली मला वरचा ओठ जाड करून हवा आहे. मी म्हटले करता येईल पण ती जाडी फार टिकत नाही, असा अनुभव आहे. ‘चालेल चालेल पण करून द्या’ असे म्हणू लागली आणि नंतर म्हणाली मधुचंद्राच्या दिवशी हा माझा जाडा ओठ माझ्या नवऱ्याला प्रेझेंट द्यायचा आहे. तसे आम्ही बरोबरच राहतो; परंतु लग्नाआधी आम्ही एकमेकांपासून दोन महिन्याची सुट्टी घेतली आहे. या दोन्ही गोष्टी मी कपाळावर हात मारून घेण्याच्या लायकीच्या आहेत की नाही हे वाचकांनी ठरवावे.
रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
Loksatta editorial Government bans sugar mills from producing ethanol
अग्रलेख: धडाडांची धरसोड!
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

वॉर अँड पीस – दमा : भाग ४
दमा या लेखमालेतील तीन लेखांत दमा विकाराची सामान्य माहिती व विविध औषधांची पाश्र्वभूमी व निर्मिती प्रक्रिया पाहिली. दमा विकार सहसा एकदम होत नाही ताप, सर्दी, पडसे, कफ, खोकला या लक्षणांकडे वेळीच लक्ष न दिल्यास दमा शरीरात घर करून राहतो.पावसाळय़ात वाढतो. कुंद हवा, वाढते प्रदूषण, जेवणाच्या अनियमित वेळा, त्यामुळे तो असाध्य होतो. वय, व्यवसाय व विविध हवामान, ऋतूनुसार तारतम्याने औषधे योजावी लागतात. लहान बालकांच्या तीन वर्षांपर्यंत व दहा वर्षांपर्यंत असे दोन भाग औषधी योजनेकरिता करावे लागतात. लहान बालकांना दम्याच्या अ‍ॅटॅक काळात ज्वरांकुश, दमागोळी, अभ्रकमिश्रण या गोळय़ा वासापाक किंवा कफमिश्चरबरोबर बारीक करून द्याव्यात. तीन वयापर्यंतच्या बालकांना सर्व गोळय़ा प्र. एक किंवा दोन, तीन वेळा द्याव्यात, मोठय़ा मुलांना तीन-तीनचा डोस द्यावा. वाहती सर्दी असल्यास नाकावर वेखंड उगाळून त्याच्या गंधाचा गरम लेप लावावा. कदापि पंप, इनहेलर वापरू नये.
मोठय़ा व्यक्तींकरिता, तरुण जवानांकरिता दम्याच्या सुरुवातीच्या काळात प्रथम भरपूर औषधे देऊन दमा आटोक्यात आणावा व नंतर डोस कमी करावा. लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश, दमागोळी, लवंगादि, अभ्रकमिश्रण ३-३, रजन्यादिवटी सहा अशा गोळय़ा सकाळ- सायंकाळ घ्याव्यात. जेवणानंतर नागरादिकषाय चार चमचे गरम पाण्याससह घ्यावे. एलादिवटी एक-एक करून सहा गोळय़ा चघळाव्या. खोकल्याची ढास खूप असल्यास खोकलाचूर्ण खोकला काढा यांची मदत घ्यावी. काळय़ा मनुका रोज तीस-पस्तीस खाव्यात. जमल्यास दीर्घ श्वसन व प्राणायाम करावा. गरम गरम पाणी प्यावे. सायंकाळी सूर्य डुबण्याअगोदर भोजन करावे. कमी जेवावे. पांडुता हे लक्षण असल्यास चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादिवटी, पुष्टीवटी तारतम्याने वापरावी. नाक चोंदत असल्यास नाकात अणुतेल, किंवा नस्यतेलाचे दोन थेंब दोन वेळा टाकावे. नाक वाहत असल्यास नाकात तूप किंवा शतधौतघृत सोडावे.
 वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत -१८ मार्च
१८८१ > ‘परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला’ या अजरामर नाटय़पदाचे आणि ‘रणदुंदुभी’ नाटकाचे कर्ते, लोकमान्य टिळक व पुढे महात्मा गांधी यांच्या स्वातंत्रलढय़ाशी सक्रिय निष्ठा राखणारे पत्रकार वीर वामनराव जोशी यांचा जन्म. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या त्यांच्या नाटकाला २०१४ मध्ये १०० वर्षे होतील. ‘राष्ट्रमत’मध्ये नोकरीनंतर ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ हे साप्ताहिक पत्र त्यांनी चालविले. देशासाठी तीनदा कारावासही भोगले.
१८९४ > वेदाभ्यासक शंकर पांडुरंग पंडित यांचे निधन. ‘वेदार्थरत्न’ हे मासिक त्यांनी चालविले, तसेच तुकाराम गाथेची संशोधित प्रत (इंदुप्रकाश गाथा) तयार केली.
१९३५ > सामाजिक आशयाची कविता लिहिणारे कवी तुळशीराम महादेव काजे यांचा जन्म. ‘नभ अंकुरले’, ‘भ्रमिष्टाचे शोकगीत’ असे सुपरिचित कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत.
१९७५ > महाभारत व वेदकाळाकडे मानवी दृष्टीने पाहणारे संशोधक व वेदविद्याभ्यासक हरी रामचंद्र दिवेकर यांचे निधन. ‘भीष्माची भयंकर भूल’ हा त्यांचा लेख वादग्रस्त ठरला, तर ‘भारतीय प्राचीन ग्रंथांना अपेक्षित शासनव्यवस्था’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. बाबराच्या स्मृतिचित्रांचा अनुवादही त्यांनी केला.
– संजय वझरेकर