हिंदू संस्कृतीत ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे आयुष्याचे चार कालखंड सांगितले आहेत. त्यातील तत्त्वे लक्षात घेऊन ते आचरणात आणले तर सध्याच्या काळातील अनेक मानसिक समस्या कमी होऊ शकतात. सातव्या वर्षी लक्ष कुठे द्यायचे हे ठरवण्यासाठी आवश्यक असलेला मेंदूतील भाग काम करू लागतो, त्यामुळे यानंतर शिक्षण वेगाने होऊ लागते. मात्र मेंदूतील भावनांचे नियंत्रण करणारा भाग या काळात पूर्ण विकसित झालेला नसतो. त्यामुळे जोडीदार ठरवण्याचे काम वीस-पंचवीस वर्षे होईपर्यंत करता नये. या काळात अधिकाधिक कौशल्ये विकसित करणे हेच ध्येय असायला हवे. हाच ब्रह्मचर्याश्रम होय. पंचविशीनंतर करिअर आणि कुटुंबाची जबाबदारी घेणे हा गृहस्थाश्रम, तो आज बहुसंख्य माणसे अनुभवतात. मात्र त्यानंतरचा वानप्रस्थाश्रम केवळ पुस्तकात राहिलेला आहे. तो कृतीत आणण्यासाठी वनात जाण्याची गरज नाही; पण मुले मोठी आणि जबाबदार झाली की सांसारिक निर्णयांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून स्वत:चे वर्तुळ विकसित करणे, समाजातील एखादी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हा आधुनिक वानप्रस्थाश्रम असेल. सध्या साठीनंतर शारीरिक प्रकृती चांगली असते. अल्झायमर आजार होऊ द्यायचा नसेल तर या वयात नवीन शिकणे, सवयीच्या वर्तुळाबाहेर पडणे आवश्यक असते. यानंतर येतो संन्यासाश्रम. ‘मी माझे ऐसे स्मरण विसरले जयाचे अन्त:करण, पार्थ तो सन्यासी जाण निरंतर’ अशी ज्ञानेश्वरांनी ज्याचे वर्णन केले आहे; ती अवस्था शक्य आहे असे मेंदूविज्ञान सांगते. माणसाच्या मेंदूत पोस्टेरिअर सिंग्युलेट कॉर्टेक्स नावाच्या भागाला शास्त्रज्ञांनी मी चे केंद्र म्हटले आहे. दीर्घकाळ साक्षी ध्यानाचा सराव केलेल्या माणसांच्या मेंदूतील हे केंद्र काम करायचे थांबते, म्हणजे ते ‘मी’चे स्मरण विसरतात. सामान्य माणसाला कोणत्याही भाजलेल्या माणसांचे फोटो दाखवले तर ते केंद्र सक्रिय होते. ते फोटो पाहिल्यानंतर मला असे होऊ नये असे विचार सुप्त मनात येतात, त्यामुळे असे होते. मात्र ध्यान साधकांना असे फोटो दाखवले तरी त्यांचे ‘मी’ केंद्र सक्रिय न होता करुणेशी संबंधित मेंदूतील भाग सक्रिय होतो. संन्यासाश्रम म्हणजे सतत साक्षीभावात राहणे होय. - डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com