हरियाणा प्रांतातील गुडगावपासून २६ कि.मी. अंतरावर असलेल्या पतौडी या गावी पतौडी याच नावाच्या छोटय़ाशा केवळ १३६ चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या संस्थानाची राजधानी होती. कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या या दुर्लक्षित संस्थानाचा बोलबाला होण्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्याच्या नवाबपदी असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्या प्रसिद्ध बेगमा! पतौडी नवाबाच्या घराण्याचे पूर्वज मूळचे अफगाणिस्तानातील बरेच या जमातीचे पठाण. बऱ्याच पठाणांपकी काही लोक सोळाव्या शतकात उत्तर भारतात येऊन लोधी सल्तनतमध्ये नोकरीस लागले. त्यापकी शेख पीर मत हा तरुण पठाण, मोगल बादशाह अकबराच्या फौजेत योद्धा म्हणून नोकरीस होता. त्याचा मुलगा सेनानी अलफखान याने प्रथम मराठय़ांच्या सेनेत आणि त्यानंतर मोगलांच्या सेनेत नोकरी केली. अत्यंत युद्धकुशल म्हणून नावाजल्या गेलेल्या अलफखानाने पुढे ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेतही नोकरी धरली. अलफखानाने ब्रिटिश कमांडर लॉर्ड लेक याला इंदूरच्या होळकरांविरुद्ध लढाईत विशेष मदत केल्यामुळे कंपनी सरकारने त्याचा मुलगा फैज तालाबखान याच्या नावाने पतौडीची जहागीर आणि चाळीस खेडी इनामात दिली. तालाबखान आणि त्याचे पुढचे वारस स्वतला नवाब म्हणवून घेऊ लागले. १८०४मध्ये स्थापन झालेले पतौडीचे हे राज्य १९४७ साली स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत ब्रिटिशांच्या अंकित, संरक्षित संस्थान बनून राहिले. या काळात पतौडीचे एकूण आठ नवाब झाले. १८५७ सालच्या भारतीय स्वातंत्र्यसमरात नवाबाचा भाचा नवाब ऑफ झझ्झरने ब्रिटिशविरोधी भूमिका घेऊन काही कारवाया केल्यामुळे ब्रिटिशांनी त्याला अटक करून फाशी दिले. पतौडीच्या राज्यकर्त्यां पठाण नवाबांपकी दोन नवाब आघाडीचे क्रिकेट खेळाडू, एक नवाब प्रसिद्ध चित्रपट अभिनेता, तर दोन बेगमा प्रसिद्ध अभिनेत्री, चित्रतारका म्हणून चच्रेत आहेत. ‘टायगर’ या टोपणनावाने ओळखला जाणारा नवाब मन्सूर अलीखान पतौडी हासुद्धा वडील इफ्तिकार अलींसारखाच क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com