दोन तापमापकांच्या मदतीने हवेतील सापेक्ष आर्द्रता किती असेल, याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. सापेक्ष आर्द्रता अचूकपणे मोजता येऊ शकते. त्यासाठी चक्क मानवी केसांचा उपयोग केला जातो. आर्द्रता वाढली की केसाची लांबी वाढते. ताणलेल्या मानवी केसांच्या एका जुडीला एक काटा जोडलेला असतो. हा काटा शून्यापासून शंभर असे आकडे असलेल्या फिरणाऱ्या वृत्तचितीला स्पर्श करेल असा ठेवलेला असतो. केस पूर्ण ओले केले की तो काटा वृत्तचितीवरच्या शंभर या आकडय़ाला स्पर्श करतो. हवेतील आर्द्रता कमी व्हायला लागली की केसांचा पुंजका कोरडा होऊ लागतो आणि काटा वृत्तचितीवर कमी सापेक्ष आर्द्रता दाखवतो. फिरणाऱ्या वृत्तचितीच्या मदतीने वेगवेगळ्या वेळी किती आर्द्रता आहे, हे नोंदलं जातं. काटय़ाला जोडलेल्या पेनच्या मदतीने आपल्याला या नोंदींचा आलेखसुद्धा मिळतो. या उपकरणामध्ये वापरण्यात येणारे केस डायइथाईल इथरमध्ये बुडवून केसातील तेलाचा अंश काढून टाकला जातो. त्यामुळे उपकरणाची कार्यक्षमता वाढते. सल्फ्युरिक आम्ल, कॅल्शियम क्लोराईड, फॉस्फोरस पेंटॉक्साईड, आपल्या आहारात वापरलं जाणारं मीठ असे अनेक रासायनिक पदार्थ आहेत की जे हवेतलं बाष्प शोषून घेतात. या पदार्थाचा वापर करून रासायनिक आर्द्रतामापी तयार केली जाते. आर्द्रता मोजण्यासाठी ‘हायग्रिस्टर’ या विद्युत उपकरणाचा वापर करतात. वातावरणातली सापेक्ष आर्द्रता वाढली की हायग्रिस्टरचा विद्युत विरोध कमी होतो. यावरून सापेक्ष आद्र्रतेचं मापन करता येतं. विद्युत रोधातील बदलावरून जशी आर्द्रता मोजता येते तशी तापमानाला संवेदनशील असणाऱ्या संवेदकांचा वापर करूनही मोजली जाते. अशा प्रकारच्या आर्द्रतामापकामध्ये हवेच्या उष्णता वहनाच्या प्रमाणात झालेले बदल नोंदले जातात आणि त्यावरून आद्र्रतेचं मापन केलं जातं. मात्र ह्या दोन्ही पद्धतींमध्ये हवेची सापेक्ष आर्द्रता मोजली जात नाही, तर त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या हवेत किती आर्द्रता आहे, हे मोजलं जातं. थोडक्यात, निरपेक्ष आद्र्रतेचं मापन ही उपकरणं करतात. जगातला सर्वात पहिला आर्द्रतामापक लिओनार्दो द विंची याने १४८० साली तयार केला आणि पहिला आधुनिक आर्द्रतामापक १७५५ साली जोहान लँबर्ट याने तयार केला. आज अत्याधुनिक आर्द्रतामापक वापरून आद्र्रतेचं मापन केलं जातं. आर्द्रतामापकांचा हा प्रवास पाचशे वर्षांहून अधिक आहे. - हेमंत लागवणकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org दण्डपाणी जयकान्तन यांची ‘ब्रह्मोपदेशम्’ ‘ब्रह्मोपदेशम्’ ही जयकान्तन यांची एक विलक्षण क्रांतिकारक विचार मांडणारी कादंबरी आहे. लेखकाच्या मते जात- विशेषत: ब्राह्मण ही जात केवळ जन्मानेच ठरत नाही. मनुवादी विचारसरणीचा शंकर शर्मा या कडव्या ब्राह्मणाची ही कथा आहे. अत्यंत काटेकोरपणे तो ब्राह्मण जातीचे नियम पाळत असे. चारही वेदांचा त्याचा अभ्यास होता. या वेदांविषयी कोणत्याही प्रकारचे प्रश्न न विचारता, त्यानुसार आचरण करावे असा त्याचा ठाम विश्वास होता. स्वत:च्या ज्ञानाविषयी त्याला खूप अभिमान होता. इतका की ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ हे तत्त्व न पाळणाऱ्या, आधुनिकतेच्या अनुकरणामुळे ज्यांचे खाणे-पिणे-जगणे सारेच बदलले आहे, गलिच्छ झाले आहे, अशा इतर ब्राह्मणांविषयी त्याला आदर वाटत नसे. आईविना पोरक्या मुलीसह मैत्रेयीसह तो गावाकडून चेन्नईत येतो तेव्हा गुंडू राव हा त्याचा पहिलाच, एकमेव-जवळचा मित्र. या गुंडूला एकदा त्याने रस्त्यावर सिगरेट फुंकताना पाहिले होते. त्यामुळे त्याने स्पर्श केलेले अन्न शंकर शर्मा खात नसे. असेच दिवस जातात. एक दिवस गुंडू राव शंकर शर्माला म्हणतो, ‘सगळय़ांना माहीत आहे, की तुला पैशाचे फार महत्त्व वाटत नाही, पण तुझी लेक आता वयात आली आहे. तिच्या लग्नाचा विचार करायला हवा. त्यासाठी पैसा हवाच.’ त्यावर शंकर शर्मा म्हणतो, ‘काळ बदलला आहे याची मलाही जाणीव आहे. मुलीच्या लग्नाची काळजीही आहे. तिच्यासाठी वेदपठण करणाऱ्या योग्य ब्राह्मण मुलाच्या शोधात मी आहे, पण अजून तरी मिळालेला नाही.’ परिस्थितीची जाणीव झालेला शंकर शर्मा गावी पूर्वी करत असलेला केटरिंगचा मूळ व्यवसाय करायचे ठरवतो. यासाठी मदतीसाठी गुंडू राव हा शेषाद्रीशी त्याची ओळख करून देतो. एक मदतनीस मिळवून देतो. जेव्हा शंकर शर्मा शेषाद्रीला म्हणतो, ‘तू स्वत:ला ब्राह्मण म्हणवतोस, पण कपाळावर त्याचे चिन्ह नाही.’तेव्हा शेषाद्री म्हणतो- ‘मी कम्युनिस्ट पार्टी मानतो. निरीश्वरवादही मानतो.’ ‘ठीक आहे. स्वत:ला ब्राह्मण म्हणवून ब्राह्मण्याचा भंग करण्यापेक्षा, स्वत:ला नास्तिक, निरीश्वरवादी म्हणणं केव्हाही ठीक आहे.’ ब्राह्मण जातीचा विलक्षण गंड असलेल्या शंकर शर्माच्या विचारात हळूहळू बदल होऊ लागतो. इतका, की पुढे एका ब्राह्मण नसलेल्या मुलाला तो दत्तक घेतो आणि त्याला ब्रह्मोपदेशही देतो. - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com