मुंबईतील पाणी योजना सुरू होऊन १५० वष्रे झाली टुलोक नावाच्या ब्रिटिश अभियंत्याने घोडय़ावर बसून ठाणे जिल्ह्य़ाची पाहणी केली. त्या पाहणीत त्याने पाणीपुरवठा करण्यासाठी ज्या जागा हेरल्या आणि त्याचा नकाशा काढला, बरोबर त्याच जागी नंतर वैतरणा-भातसा जलयोजना झाल्या. सुरुवातीला मुंबईत जे तलाव बांधले ते म्हणजे, तुळशी, तान्सा, पवई हे होत. त्या तलावांपासून मुंबईपर्यंत पाइपलाइनी टाकल्या. त्याने मलबार हिल आणि इतर उंच ठिकाणी जलकुंभ तयार करून तेथे पाणी पोहोचविले व त्या जलकुंभातून नंतर पाणी घरोघरी पोहोचविले. पाणीपुरवठय़ाच्या मुख्य पाइपलाइनी त्या वेळी बिडाच्या (कास्ट आयर्न) होत्या. १९८१ सालच्या दसऱ्याच्या वेळी किंग्ज सर्कलला पाइपलाइन फुटली होती. तिच्या दुरुस्तीच्या वेळी असे लक्षात आले की, तेथील पाणीपुरवठा बंद करायची व्हाल्व्ह घाटकोपरला किरोल येथे होती. ही पाइपलाइन बिडाची होती व ती २५ मिलिमीटर जाडीची होती. बिडाच्या पाइपलाइनीची वेिल्डगने दुरुस्ती करणे हे फार कौशल्याचे काम असते.
गिरगाव हा मुंबईतील जुना भाग. येथे घरोघरी पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनींशेजारून घरातील सांडपाणी बाहेर काढणाऱ्या पाइपलाइनीही टाकल्या आहेत. या पाइपलाइनीही आता १५०-१५० वर्षांच्या जुन्या झाल्या आहेत आणि मधूनमधून या लाइनी फुटतात. सांडपाण्याच्या पाइपलाइनीतून २४ तास पाणी वाहात असते. उलट पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनीतून दिवसातून दोन ते तीन तासच पाणीपुरवठा होतो. एरवी २०-२१ तास या पाइपलाइनीत दाब नसतो. ही पाइपलाइनही जर फुटलेली असेल तर पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनीत फुटक्या सांडपाण्याच्या पाइपलाइनीतून बाहेर पडलेले पाणी शिरते व पिण्याचे पाणी प्रदूषित होते. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून मग पिणे नेहमीच सुरक्षित ठरते.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२  
office@mavipamumbai.org

सफर काल-पर्वाची -शीख महाराजा रणजितसिंग
शिखांचे दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंग यांचा खून १७०८ साली नांदेड येथे झाला. त्याच्यानंतर शिखांचे नेतृत्व बंदा याने करून मोगलांवर सूड उगविला. पुढे शिखांनी आपली लहान लहान बारा राज्ये स्थापली. लाहोर आणि पंजाबचा बराच भाग अफगाण राजा अहमदशहा दुराणीने घेतला होता. पश्चिम पंजाबचा कारभार पाहण्यासाठी अहमदशहाने महासिंग यास कारभारी म्हणून नेमले होते. महासिंगने अहमदशहाच्या मृत्यूनंतर सर्व शीख राजांमध्ये एकी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. महासिंगाचा मुलगा म्हणजेच पुढे नावाजलेला योद्धा महाराजा रणजितसिंग, रणजितसिंगाचा जन्म गुजरानवाला येथे इ. स. १७८० साली झाला. त्याच्या बाराव्या वर्षी वडील वारल्यावर काही वर्षांनी त्याने प्रयत्न करून सर्व बारा शीख राज्यांचे एकीकरण केले. अफगाणिस्तानचा अमीर झमानशहा याने पंजाबवर स्वारी केली असता रणजितसिंगने त्यास मदत केल्याने अमीरने खूश होऊन रणजितसिंगला लाहोरचा सुभेदार नेमले. थोडय़ाच दिवसांत त्याने अफगाण राज्यकर्त्यांचे स्वामित्व झुगारून देऊन सर्व शीख संस्थानाची एकी करून तो त्यांचा राजा झाला. तोफा व घोडे यांचा तो शौकीन होता. इंग्रजी पद्धतीने त्याने आपल्या लष्करी शक्तीची योजना केली व तसे शिक्षण दिले. नेपोलियनच्या हाताखाली तयार झालेले कर्नल व्हेंचुरा यांच्याकडून सर्व लष्कर, तोफखाना जय्यत तयार करून घेतला. रणजितसिंगचे ऐंशी हजारांचे लष्कर पाहून इंग्रजही त्याला दबत असत. लाहोर येथे त्याच्या पंजाब राज्याची राजधानी होती. अत्यंत कडक शिस्तीचा म्हणून तो प्रसिद्ध होता. लॉर्ड मिंटो, बेंटिंक यांनी त्याच्याशी स्नेह केला होता. सतलजपर्यंत त्याच्या राज्याची सीमा होती. सन १८१० मध्ये अफगाणिस्तानात राज्यक्रांती होऊन इमानशाह दुराणी व त्याचा भाऊ शहाजुदा हे रणजितसिंगच्या आश्रयाला येऊन राहिले.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

मनमोराचा पिसारा..-लिओनार्दोची रांगोळी
दिवाळीतील प्रमाणबद्ध, सममितीपूर्ण रंगीत रांगोळ्या बघितल्या की मन आनंदून जातं. रांगोळी घालणाऱ्या कलाकारानं चौरसाच्या चारही कोनांचा रंगसंगतीनं साधलेला समतोल आणि आकृतीच्या केंद्रभागातला खास रंग यांच्या योजनापूर्वक केलेल्या बांधणीमुळे मन हरखून जातं. आकृतीच्या केंद्रापासून सगळीकडे जाणाऱ्या रेषा आणि त्यांचं एकूण आकृतीच्या आकारमानाशी असलेलं नातं आकर्षक वाटतं. माणसानं निर्माण केलेल्या अनेक आर्किटेक्चरल वंडर्स अशीच चकित करतात. राष्ट्रपती भवनाच्या मागच्या अंगणातल्या मुघल बागा असोत की काश्मिरातले सुबक बगिचे असोत, त्या रचनांमधली सममिती मनाला आश्वस्त करते.
प्रमाणबद्धतेचं आणि सममितीचं आकर्षण नि बाळकडू आपल्यात येतं कुठून? असा प्रश्न पडतो. तेव्हा ‘दानिंची’च्या ‘विटरुविअन मॅन’ची आठवण येते.
लिओनार्दो म्हणजे साक्षात प्रतिभेचा पुत्र. केवळ जिनियस. एकमेवाद्वितीय. लिओनार्दोनं काढलेली ही पुरुषाकृती जगभर प्रचंड लोकप्रिय आहे. ‘प्रमाणबद्धता’ या संकल्पनेचा आयकॉन आहे. गंमत म्हणजे ही आकृती लिओनार्दोनं रेखांकित केली नाही. ‘विट्रुविअस’ नावाच्या रोमन आर्किटेक्टनं पुराणकाली काढली. कालौघात नाहीशा झालेल्या या आकृतीचा लिओनार्दोनं पुनरुद्धार केला. विट्रुविअस आणि लिओनार्दो यांच्या मते, प्रमाणबद्धता आणि सममिती या दोन्ही संकल्पना मानवी (पुरुषाच्या) देहात पूर्णपणे साकार झालेल्या आहेत. निसर्गाच्या जगड्व्याळ स्थापत्य प्रयोगशाळेत ‘मानवी शरीरा’ची निर्मिती झाली. शरीराचा एक ‘ढाचा’ तयार झाला. तो पर्फेक्ट आहे. मानवी शरीर अत्यंत सुंदर आहे. कारण त्यातल्या अवयवांचं परस्परांशी असलेलं प्रमाणबद्धतेचं नातं परिपूर्ण आहे.
हे समजावण्याकरता विट्रुविअसने मानवी (पुरुष) शरीराची चौरस आणि वर्तुळात बांधलेली आकृती काढली. त्यामध्ये पायांच्या दोन पोझिशन आहेत आणि बाहू फैलावलेले आणि उंचावलेले (डोक्याच्या पातळीपर्यंत) आहेत. पसरलेले बाहू, तळहात, पाय, उंची, छाती आणि पोट व नाभी यांची लांबी-रुंदी वाटेल तशी नसते. त्यानं चार बोटांएवढा तळहात (पामी) हे माप धरून संपूर्ण शरीरामधल्या विविध बिंदूंचं एकूण शरीराशी असलेलं प्रमाण मोजलं आणि त्याचे (बऱ्यापैकी) अचूक ठोकताळे मांडले. लिओनार्दोनं या अभ्यासाला भूमितीची जोड दिली. चौरस आणि वर्तुळ यांचे केंद्र एकच असू शकत नाही असं म्हणून, ‘नाभी’ या शरीरातल्या महत्त्वाच्या केंद्रबिंदूचे स्थान नक्की केले. मानवी शरीराच्या प्रमाणबद्धतेच्या अशा सखोल अभ्यासातून लिओनार्दो खूप शिकला, त्यामुळे त्याची चित्रं अथवा पेंटिग अभिजात ठरली असे नाही तर विमान, पक्षी इमारती यांच्या आरेखनामध्ये या नैसर्गिक प्रमाणबद्ध समतोलाचा भरपूर उपयोग केला.
मनाचा तळ गाठण्याची लिओनार्दोची क्षमता आणि बुद्धी स्तिमित करते. आजही ‘विट्रुविअस मॅन’चा युरोपात मान राखला जातो. इटालियन एक युरो नाण्यावर तो कोरलेला आहे. २०११ साली, लंडनच्या इम्पिरिअल मेडिकल कॉलेजनं या आकृतीचा अभ्यास करून लिओनार्दोच्या मॉडेलला डाव्या बाजूला हर्निआ झाल्याचा दावा केलाय! मित्रा, थक्क होतो, अशा अभ्यासानं. तेव्हा टीव्हीवर काहीतरी चकट फू बाई फू न पाहता, अर्थपूर्ण माहिती मिळव. अरे सॉलिड धमाल येते..
डॉ. राजेंद्र बर्वे    
drrajendrabarve@gmail.com

इतिहासात आज दिनांक..- १४ नोव्हेंबर
१८४३ – अ‍ॅन्सन सर विल्यम रेनेल यांचा जन्म. शिक्षणतज्ज्ञ व संविधान तज्ज्ञ म्हणून ते ओळखले गेले. १९०३ चा शैक्षणिक कायदा तयार करण्यात व तो अमलात आणण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
१८८९ – पंडित जवाहरलाल मोतिलाल नेहरू यांचा जन्म. हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. अलाहाबाद येथे जन्मलेल्या पंडितजींचे शिक्षण हॅरो आणि ट्रिनिटी या केंब्रिजमधील महाविद्यालयात झाले. वकिलीचे शिक्षण घेऊन परतल्यावर अलाहाबाद हायकोर्टातून त्यांनी करिअरचा श्रीगणेशा केला. इंग्लंडमधील वास्तव्य, विकसित झालेली दृष्टी घेऊन भारतात परतल्यावर ते महात्मा गांधींजींच्या संपर्कात आले. त्यापूर्वीच त्यांनी उत्तर प्रदेशात किसानसभा स्थापण्याचे कार्य सुरू केले  होते. होमरुल चळवळ आणि भोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास केल्यावर त्यांनी महात्मा गांधीजींच्या मार्गाने जाण्याचा निश्चय केला. काँग्रेसचे सरचिटणीस, १९३६  मध्ये पक्षाध्यक्ष झाले. तरुण, शेतकरी – कामकरी, बुद्धीजीवी वर्ग अशा सगळ्यांना त्यांनी काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणले. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. पंचवार्षिक योजना, वैज्ञानिक पायावर नवभारताची निर्मिती, लोकशाहीचे सशक्तीकरण या गोष्टी त्यांनी आवर्जून केल्या. इंग्रजीत त्यांनी उत्तम प्रकारे लेखन केलेले आहे.
१९७१  महाराष्ट्र सरकारच्या पाठय़पुस्तक मंडळाने (बालभारतीने) ‘किशोर’ मासिकाचा प्रायोगिक पातळीवरचा पहिला अंक प्रसिद्ध केला. वसंत शिरवाडकर यांच्या संपादकत्वाखाली जानेवारी ७२ पासून तो नियमितपणे काढण्यात येऊ लागला.
डॉ. गणेश राऊत    
ganeshraut@solaris.in