रुग्णालय खासगी असो की सार्वजनिक, त्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ असावा. त्याच्या जवळ कचऱ्याची पेटी असू नये. त्यामुळे जंतूंची वाढ होते व जंतू रुग्णालयात शिरण्याचा धोका असतो.बाह्य़रुग्ण विभागात दाखल झाल्यावर रुग्णाला स्ट्रेचरवरून वॉर्डमध्ये नेण्यात येते. या गोष्टी सतत स्वच्छ असाव्यात. विशेषत: रात्री त्यावर झुरळे फिरत असतात. स्ट्रेचर, ट्रॉली स्वच्छ असल्या म्हणजे जंतुसंसर्गाला आळा बसतो. काही वेळा स्ट्रेचरचे कापड फाटून रुग्ण खाली पडण्याच्या घटना घडल्या आहेत. म्हणून स्ट्रेचरची तपासणी वारंवार व्हायला हवी. वॉर्डमध्ये रुग्ण दाखल झाल्यावर डॉक्टर ताबडतोब येऊन रुग्णाला तपासतात. या वेळी रुग्णाने अथवा त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना सर्व हिस्टरी सांगणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. रुग्णाला कोणत्या औषधाची अ‍ॅलर्जी आहे ते सांगणेही महत्त्वाचे असते, त्याप्रमाणे त्याच्या केसपेपरवर तशी नोंद केली जाते. रुग्णालयात रुग्ण दाखल दाखल होत असताना तो सध्या कोणकोणती औषधे व ती कशासाठी घेत आहे, तसेच पूर्वीचे आजार कोणते आणि पूर्वी कोणकोणत्या शस्त्रक्रिया केल्या ते डॉक्टरांना सांगणे गरजेचे असते.
रुग्णाच्या गादीवर अन्य कोणी बसू नये. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी हे केले पाहिजे. तीच गोष्ट आहाराबाबत. नर्स किंवा डॉक्टरांनी परवानगी दिल्यासच घरून आहार आणावा. हॉटेलमधून काहीही आणू नये. डॉक्टरांनी परवानगी दिल्यावरच उठून उभे राहावे वा चालावे. नाही तर चक्कर येण्याची शक्यता असते. विशेषत: शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना ही खबरदारी घेतली पाहिजे. काही वेळा रुग्णासाठी बाहेरच्या केमिस्टकडून औषधे आणण्यासाठी डॉक्टर चिठ्ठी लिहून देतात. औषधे आणल्यावर ताबडतोब ती नर्स किंवा डॉक्टरांना दाखवावीत व मगच रुग्णाला द्यावीत. गोळ्या घेतल्यानंतर मळमळ होणे, चक्कर येणे, पोटात आग होणे असे काही झाल्यास डॉक्टरांना ताबडतोब सांगावे. घराभोवती असणाऱ्या कारखान्यांची व त्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांची माहिती डॉक्टरांना आवर्जून सांगितली पाहिजे. रुग्णाची शस्त्रक्रिया होण्यापूर्वी सर्व तपासण्या झाल्यावर तो रुग्ण शस्त्रक्रियेस फिट असल्याचे प्रमाणपत्र दिल्यावरच शस्त्रक्रिया होते.
डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी ,मुंबई २२  
office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा.. -ऊलाला ऊलाला
जीवनाचं यथार्थ दर्शन घडविणारी गोष्ट प्रत्ययकारी कलाकृती असते. कलानिर्मितीला हा नियम लागू केला तर ‘ऊलाला, ऊलाला, तू हैं मेरी फॅन्टसी..’ हे उत्तान गाणं एक उत्तम कला ठरेल.
१९७०-१९८०च्या दशकात दक्षिणेतल्या सिनेमात आलेली बाजारूपणाची लाट या गाण्यातून अक्षरश: अंगावर येते. त्यामधील विद्या बालनची अदाकारी आणि नसिरुद्दीन शहाचे लुक्स यामधून त्या काळातला प्रणयरंगातला ढोबळ बटबटीतपणा जबरदस्त चित्रित झालेला आहे.
विशीच्या आसपासची उफाडय़ाची नायिका आणि थोराड अंगाचा, जून चेहऱ्याचा पन्नाशीच्या पलीकडचा हीरो यांची जोडी मुळात हिडीस दिसते. पुरुषप्रधानतेमध्ये स्त्रीत्वाची विटंबना होते आणि त्यात स्त्री कशी सामील होते, याचं चित्र उभं राहतं. अ‍ॅडम आणि इव्ह या निष्पाप जोडप्यानं ज्ञानाचं सफरचंद चाखलं आणि त्यांच्यामधील निरागसपणा लोपला. आणि लोपला म्हणजे काय तर भ्रष्ट झाला. त्याचं मूर्तिमंत चालतंबोलतं, नाचणारं स्वरूप या गाण्यात साकार झालं.
ते साकार करण्याची दृश्यकला या गाण्यात सादर झालेली आहे. गाण्यामधली लैंगिक वखवख आणि ढोबळ सूचकता विद्या बालननं प्रभावीपणे मांडली आहे, तर नसिरुद्दीननं शरीरानं थकलेला, हिरव्या देठाचा दाक्षिणात्य नायक जिवंत केला आहे.
चित्रपट हे माध्यम विलक्षण आहे, त्याची नकारात्मक जाणीव या दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्यांना होती आणि त्याचा त्यांनी बाजार मांडला. बटबटीत प्रतीकं, रासवट हालचाली आणि उत्तानपणाचा नाच दाखविला.
गंमत अशी आहे ना मित्रा, की चित्रपटातला हा नंगेपणा ‘डर्टी पिक्चर’नं अचूक हेरला आहे. चित्रपटातली नायिका ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धीसाठी स्वत:च्या शरीराचा एखाद्या वस्तूसारखा वापर करते. बाजारात आपलं शरीर मांडते. यातला तिचा स्वार्थ, तिचा अदूरदृष्टी आणि या परिस्थितीचा अचूक फायदा (की गैरफायदा) घेणारी माणसं तिच्याभोवती असतात. आपण आपल्या वृत्तीमुळे, निर्णयामुळे कोणत्या थराला जातो आणि त्याची विटंबना करतो, याची ही गोष्ट आहे. ती ट्रॅजिक असणार, यात शंका नाही, तशी ती होते.
‘डर्टी पिक्चर’च्या या गाण्यातून ते सारं उलगडतं आणि एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. त्या बटबटीतपणाचा राग येण्याऐवजी दया वाटते. त्या भोगामधून उत्तेजकता शोधणाऱ्या लोकांच्या पार्थिवतेची कीव करावीशी वाटते.
हे सगळे विचार, भावभावना या गाण्यामधून मनात सहज उमटतात. म्हणून अत्यंत ढोबळ असूनही ते गाणं प्रत्ययकारी ठरतं. आपण ते परत परत पाहू शकत नाही, यातच त्याचं यश आहे. तरी पुन्हा एकदा ते गाणं पाहा, वृत्ती चळावणार नाही. उलट ‘उंबरातले किडे-मकोडे उंबरी करती लीला, जग हे बंदीशाला’ असेच शब्द आठवतील.
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabar¾e@gmail.com

सफर काल-पर्वाची -थिओडोरा
रोमन साम्राज्याचे पुढे दोन भाग झाले. पूर्वेकडील भागातल्या साम्राज्याची राजधानी कॉन्स्टंटिनोपल येथे होती. या साम्राज्यातील एक सम्राट जस्टिनियन याने एकंदर अडतीस वर्षे (सन ५२७ ते ५६५) राज्य केले. त्याची मुख्य कामगिरी म्हणजे रोमन कायद्याला त्याने सुसंगत केले. त्याच्यापूर्वी कायदे कोणी एकत्र आणले नव्हते. वर्गीकरण केले नव्हते. त्यासाठी त्याने कायदेपंडितांचे एक कमिशन नेमले. त्यांचे ग्रंथ तयार केले. बहुतेक युरोपियन राष्ट्रातील कायदे रोमच्या कायद्यांवर आधारलेले आहेत.
जस्टिनियनने त्याचे जिच्यावर निस्सीम प्रेम होते, त्या थिओडोरा या स्त्रीला राजसत्तेतही आपली अर्धागिनी केले. थिओडोरा अगदी हीन स्थितीतून इतक्या उच्च पदाला पोहोचली. तिचा इतिहास मोठा अद्भुत आहे. लहान वयात थिएटरमध्ये ती विदुषकाच्या भूमिका करी. तिचे सौंदर्य अप्रतिम व चेहरा बोलका होता. सर्व दर्जाच्या व व्यवसायांच्या लोकांना ती द्रव्याच्या मोबदल्यात उपलब्ध होती. कुणाही प्रियकराला तिने फार जवळ केले नाही. नाटय़गृहात नग्न दृश्य दाखविण्यासही ती कचरली नाही. तिला एकदा असा साक्षात्कार झाला की, आपण एका मोठय़ा राज्यकर्त्यांची अर्धागिनी होणार. त्यानंतर ती कॉन्स्टंटीनोपलला आली व सभ्य जीवन जगू लागली. एका लहानशा घरात लोकर कातण्याचा उद्योग करू लागली. योगायोगाने तिचा व जस्टिनियनचा परिचय झाला. तिच्या सौंदर्याने मोहून जाऊन तो तिचा भक्त बनला. त्या वेळी त्याचा चुलता जस्टिन हा सम्राट होता, पण प्रत्यक्ष राज्यकारभार जस्टिनियनच करीत होता. जस्टिनियन अत्यंत साध्या राहणीचा व कमी आहार, मद्य घेणारा होता. थिओडोराच्या अंगी श्रेष्ठ दर्जाचे बुद्धीवैभव व गुणवत्ता असल्याने पहिला प्रेमाचा आवेग ओसरल्यानंतरही जस्टिनियनची तिच्याबद्दलची आसक्ती कमी झाली नाही.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

इतिहासात आज दिनांक.. – ३० नोव्हेंबर
१९०० जगातील सर्वाधिक वादग्रस्त लेखकांपैकी एक आयरिश लेखक ऑस्कर वाईल्ड यांचे निधन. कवी, लेखक, नाटककार या भूमिका त्यांनी बजावल्या. प्रतिभा आणि वादग्रस्तता या दोन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्यात सारख्याच आल्या.  १८९०  मध्ये ऑस्करचे ‘डॉरियन ग्रे’ हे पहिलं नाटक आलं. पुढे ते विस्तारित स्वरूपात प्रसिद्ध झाले. ‘गुन्हेगारी आणि नीतिमत्तेचा अभाव’ हा विषयच मुळी खळबळजनक होता. ‘लेडीविंडरमियर्स फॅन’ हे नाटकही गाजले. १८९२ मध्ये लिहिलेल्या ‘सॉलम’ या फ्रेंच पुस्तकावर बंदी आली. १८९३ ते ९श् या काळात द वुमन ऑफ नो इम्पॉर्टन्स, द आयडीअल हजबंड, द इम्पॉर्टन्स ऑफ बिईंग अर्नेस्ट ही नाटके लिहिली. यापुढील वैयक्तिक जीवनातील काही असामाजिक गोष्टींमुळे त्याला दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवासातच ‘बॅलड ऑफ रिडिंग जेल’ लिहिले. मुलांसाठी ‘द हॅपी प्रिन्स अँड अदर स्टोरीज’ हा कथासंग्रह लिहिला. या प्रतिभावंताचा शेवट मात्र विपरीत अवस्थेत झाला. कीर्ती आणि अपकीर्तीचे टोक त्यांनी पाहिले.
१९०९ ख्यातनाम इतिहासतज्ज्ञ, साहित्यिक, प्रशासक, अर्थतज्ज्ञ, देशभक्त, संशोधक रमेशचंद्र दत्त यांचे निधन.
१९१० मराठीतील प्रतिभावंत कवी बाकीबाब उर्फ बा. भ. बोरकर यांचा जन्म. त्यांनी कवितेच्या प्रांतात स्वत:चा अमीट ठसा उमटवला.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in