ऑपरेशन थिएटर हा रुग्णालयातील सर्वात महत्त्वाचा भाग. हा संपूर्ण भाग जंतूविरहित असला पाहिजे व तो तसा ठेवण्यासाठी सर्व प्रकारची दक्षता घेतली जाते. ऑपरेशन करताना कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाते. वातानुकूलनाने हल्ली हे शक्य होते. थिएटर आकाराने मोठे असल्याने काम करणाऱ्या व्यक्तींना हालचाली नीट व मोकळेपणाने करता येतात. एकमेकांना धक्का लागत नाही. तसेच हवाही खेळती राहते. नेहमीपेक्षा आतील हवेचा दाब थोडा जास्त ठेवला जातो. थिएटरला दोन दारे असतात. एक हात धुण्याच्या जागेकडे जाण्यासाठी व दुसरे र्निजतुकीकरण केलेल्या भागासाठी. ही दारे दोन्ही बाजूंना उघडणारी व वजनाने हलकी असतात. आतील हवा एका तासात २५ वेळा बदलली जाते. परिणामी कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होते. आतील तापमान १८ ते २४ अंश सेल्सियस व आद्र्रता ५० ते ५५ टक्के असते. म्हणजे आतील व्यक्तींना काम करायला सुखकारक वाटते. ऑपरेशन टेबल प्रवेशद्वारापासून लांब व डोक्याची बाजू र्निजतुकीकरण केलेल्या बाजूकडे असते. थिएटरमधील सर्व लाद्या प्रत्येक ऑपरेशननंतर डिर्टजट वापरून धुतल्या जातात. र्निजतुकीकरण करण्यासाठी २ टक्के फेनॉल वापरले जाते. िभती, टेबल, इंस्ट्रमेंट, ट्रॉली, स्टुले ही अशीच स्वच्छ केली जातात. ऑपरेशन करणारी सर्व टीम प्रत्येक ऑपरेशननंतर कपडे बदलून दुसरे र्निजतुकीकरण केलेले कपडे घालतात. हल्ली काही ऑर्थोपिडीक सर्जन व त्यांची टीम अंतराळवीराप्रमाणे र्निजतुकीकरण केलेले स्पेस सूट घालून ऑपरेशन करतात. म्हणजे श्वासोच्छ्वासाची हवा रुग्णाच्या जखमेवर जात नाही व जंतुसंसर्ग टाळता येतो. या पोशाखात बसवलेल्या पंख्यामुळे हवा सूटमध्ये फिरत राहून  वापरलेली हवा लांब फेकली जाते. या सूटमुळे सर्जननापण जास्त मोकळेपणा मिळतो. ऑपरेशनसाठी लागणारे सर्व सुती कपडे, गॉज, बँडेज इ. गोष्टींचे ऑटोक्लेव्ह करून र्निजतुकीकरण केले जाते. ऑटोक्लेव्ह प्रेशर कूकरसारखे असते. वरील सर्व गोष्टी सर्व बाजूंनी भोके असलेल्या स्टेनलेस स्टीलच्या ड्रममध्ये भरून उच्च तापमान व उच्च दाबाखाली र्निजतुक केल्या जातात.
डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी ,मुंबई
office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा..- गुलबक्षी.. बहोत शुक्रिया!
असा घाईघाईनं नको, सावकाश वेळ काढून ये, संध्याकाळी, जरा आडोशाला खुर्ची टाक आणि चहा पिता पिता बघ. दीर्घ श्वास घेतलास तर मंद सुगंध जाणवेल. सायंकाळच्या सोनेरी मऊ प्रकाशात माझे रंग अधिक खुलून दिसतात. निवांतपणे निरखून बघ. प्रत्येक फूल ही स्वतंत्र कलाकृती असते. येशील ना?’ मित्राच्या टुमदार घराच्या परसातल्या बागेतली कोपऱ्यावरची ‘गुलबक्षी’ म्हणाली. सकाळी तिची फुलं बावलेली आणि निस्तेज दिसत होती. म्हणून आपुलकीनं गुलबक्षीकडे पाहिलं, तेव्हा ती म्हणाली, ‘इतकं सुंदर आमंत्रण कसं टाळणार?
‘गुलबक्षी’ शांत, प्रसन्न आणि रंगतदारपणे फुललेली होती. फिकट हिरवट रंगाचं दोन-तीन फुटाचं चिमुरडं झाड. फुलांचे एकत्र गुच्छ होते, पण प्रत्येक फुलं आपल्या दिमाखात होतं.
गुलबक्षी अनेक रंगात फुलते. गंमत म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेचे रंग एकाच फुलात निरनिराळ्या पॅटर्नमध्ये आढळतात. पिवळसर रंगात पांढरा, पांढऱ्यात गुलाबी, कधी पिवळ्यावर लाल बुंदके. इतक्या व्हरायटी पाहात राहावं. फूल नाजूक आणि इवलंसं. या म्हणे पाकळ्या नव्हेत, त्या फुलाच्या उपपाकळ्या. लांबट देठावर चांदण्यासारखं आकार अचानक उमलतो. आतून पाच-सहा सूक्ष्म स्त्रीपुंकेसर उभारलेले असतात. परागकणाचा बिजांडाशी संकर करण्याच्या भानगडी आतल्या आत उरकून काही दिवसात. काळ्या रंगाचं ‘मिरी’सारखं दिसणारं बी फुलाच्या जागी दिसू लागतं. बियांचे हे काळे ठिपके गुलबक्षी रूबाबात मिरवते. झाडाची गोष्ट इथे संपते. मग सुरू होते गुलबक्षीची गोड कहाणी.
इंग्रजीत फुलाला फोर ओ क्लॉक या रंगाला ‘मॅजेंटा’ असं गद्य नाव दिलं. मराठीतांनी या रंगाला म्हणावं तरी काय, असा प्रश्न पडला. भगवा म्हणावं तर शेंदरीपणाची शेड नाही, किरमिजी म्हणावं तर काळेपणाचा वास, तांबडा म्हणावं तर मातकट नाही. आपण या रंगापासून सुरुवात करू. त्याला गुलबक्षीच म्हणू. रंग बहारदार आणि राजस. राजस अशासाठी की, तो खुलतो अस्सल रेशमात. जाडसर घट्ट विणीची पैठणी. नाहीतर तलम अंगाची इंदूरी. काय झक्कास दिसायचा तो रंग. सूक्ष्म चौकडीचा.
काठपदराचं लुगडं, गौरवर्णाची युवती, गळ्यात सोन्याचे दोन ठळक दागिने, दंडात वाकी. या घरंदाज सौंदर्याचं रहस्य गुलबक्षी रंगात होतं. त्यामुळे पॉलिएस्टर, निमरेशमी, कृत्रिम धाग्यांना गुलबक्षीपणा खुलवताच येत नाही. रंगाच्या या गमती ‘गुलबक्षी’ नावातही आहे. आपल्याकडे हे झाड पाकिस्तानातून आलं असावं. कारण तिथे गुलबक्षीला गुलअब्बास म्हणतात. इथे रुजल्यानंतर मात्र गुलबक्षी नावानं उर्दूमिश्रितपणाची कात टाकली. बंगालीत गुलबक्षीला ‘सांध्यमालोती’ म्हणतात. आसामीत गोधुली गोपाळ, मैथिलीत सांजफूल, ओडिशीत ‘रंगनी’ तेलगूत चंद्रकांता, तमिळीत ‘अंतीमधरै’. एरवी सुंदर झाडांना अतिशय गद्य नाव देणाऱ्या वनस्तीतज्ज्ञांनीदेखील गुलबक्षीचं नाव ठेवलंय ‘मिराबिलिस जलपा’. मिराबिलिस म्हणजे (अय्या) वंडरफुल, जलपा हे दक्षिण अमेरिकेतलं गाव.
गुलबक्षी आपल्या नावाचं, गावाचं रंगरूपाचं वैभव घरंदारपणे मिरवते. या छोटय़ा झाडानं, संध्याकाळी रम्य केल्या आहेत. मनाला फुलवलंय.. शुक्रिया महाजबी गुल बक्षी.
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabar¾e@gmail.com

इतिहासात आज दिनांक..- ३ डिसेंबर
१८८४ भारताचे स्वातंत्र्यसेनानी, महात्माजींचे विश्वासू, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा बिहारमधील जीरादेई या गावी जन्म.प्राध्यापक या नात्याने कारकिर्दीचा श्रीगणेसा करून त्यांनी पुढे कायद्याची पदवीसुद्धा प्रथम क्रमांकाने मिळविली. १९०८ मध्ये बिहार छात्र परिषद स्थापन करून त्यांनी सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. लखनौ काँग्रेस अधिवेशनात त्यांची  भेट गांधीजींशी झाली. चंपारण्य सत्याग्रहात महात्माजी, राजेंद्रबाबू, राजकुमार शुक्ल, ब्रजकिशोरबाबू, अवंतिकाबाई गोखले यांनी मोलाची कामगिरी बजावली. गुजरातमधील खेडा सत्याग्रह त्यांनी यशस्वी केला. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे त्यांनी शपथ घेऊन वकिलीचा त्याग केला आणि सारे जीवन राष्ट्रकार्यासाठी वाहून घेतले.अन्न व शेतकी खात्याचे मंत्री, घटना समितीचे अध्यक्ष, दोन वेळा भारताचे राष्ट्रपती, ‘भारतरत्न’चे मानकरी असे सर्वोच्च यश त्यांनी मिळविले. आत्मकथा, चंपारण मे महात्मा गांधी, खादी का अर्थशास्त्र, बापू के कदमों में हे हिंदी ग्रंथ त्यांनी लिहिले.
१९५१  मराठीतील ख्यातनाम कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन.
१९७१ भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू. पाकिस्तानने पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीरमधील विमानतळावर हल्ले चढविले. शेवटी पाकिस्तानचा पराभव झाला.
प्रा. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची- व्हिएतनाममध्ये फ्रेंचांचा प्रवेश
प्राचीन काळापासून हल्लीच्या व्हिएतनाममधील उत्तरेकडचा भूप्रदेश हा ‘अन्नाम’ या नावाने, तर दक्षिणेकडचा भाग ‘कोचिनचायना’ या नावाने ओळखला जात होता. अन्नामची राजधानी हुए येथे होती. अन्नामी जनतेवर चिनी संस्कृतीची संपूर्ण छाप होती. अन्नामचा राजा हा चीनच्या राजाचे मांडलिकत्व मान्य केल्याखेरीज गादीवर बसू शकत नसे. कोचिनचायना या दक्षिण भागाची राजधानी सायगाव येथे होती. अन्नाम राज्यात पंधराव्या शतकात फ्रेंच मिशनरी दाखल झाले. पाठोपाठ फ्रेंच व्यापारीही आले. धर्मप्रसार व व्यापाराबरोबर फ्रेंचांनी अन्नामच्या राजघराण्यातही हस्तक्षेप सुरू केला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत फ्रेंचांना अन्नामच्या राजकारणावर वर्चस्व करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे अन्नामच्या राजकारणात प्रत्यक्ष पदार्पण त्यांनी केले नाही. अठराव्या, एकोणिसाव्या शतकात आशियात व अतिपूर्वेकडे नवी साम्राज्ये निर्माण करण्यात इंग्लंडबरोबर फ्रेंचांची चुरस सुरू झालेली होती. १८श्१ साली फ्रेंचांनी पूर्वेकडे आपले साम्राज्य वाढविण्याची एक योजना आखली. अन्नामचा राजा तू दक याला या गोष्टीचा सुगावा लागताच त्याने फ्रेंच मिशनरी व व्यापाऱ्यांचा छळ करावयास सुरुवात केली. काहींचा नि:पात करावयास मागेपुढे पाहिले नाही. फ्रेंचांना निमित्त पाहिजेच होते. व्यापारी व मिशनऱ्यांच्या संरक्षणाचे निमित्त करून कोचिनचायनाची म्हणजेच दक्षिण व्हिएतनामची राजधानी सायगाववर फ्रेंचांनी १८श्९ साली कब्जा केला. त्यांनी पुढच्याच वर्षी हनोई या उत्तरेतल्या शहरावर कब्जा करून लाल नदीच्या मुखावर अंमल बसविला. अन्नामचा राजा घाबरून अखेर फ्रेंचांना शरण गेला. १८७४ मध्ये त्याने फ्रेंचांशी तह केला. अन्नामचे संरक्षण ही चिनी सरकारची जबाबदारी होती. पण फ्रेंचांविरुद्ध काहीही करण्याची ताकद पेकिंग राजवटीकडे नव्हती. याचा फायदा घेऊन फ्रेंचांनी हनोई आणि हैपांग येथे आपली ठाणी बसविली.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com