विजयनगर राज्याची राजधानी हंपी येथे होती. प्राचीन काळी हंपीचे नाव विरूपाक्षतीर्थ किंवा पंपक्षेत्र असे होते. बल्लाळ तिसरा या होयसाळ राजाच्या मुलाचे नाव विजय विरूपाक्ष बल्लाळ असे होते व त्यावरून हंपीचे नाव विजय विरूपाक्ष होयपट्टण असे ठेवले होते. पुढे या शहराचे नाव विजयनगर असे झाले. हरिहर याला आणखी चार भाऊ होते. त्यांची नावे कंपण्णा, बुक्क, मरप्पा आणि मुद्दप्पा. पैकी कंपण्णाने कडप्पा, नेल्लोर येथे राज्य केले. मरप्पाकडे गोव्याचा अंमल होता तर मुद्दपाकडे कोलारचे राज्य  होते.
कंपण्णा याने मदुराईच्या सुलतानास मारून मदुराईपर्यंत राज्य वाढविले. त्याचा मंत्री गोपण्णाने श्रीरंगमच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. हरिहर दुसरा याने कन्नड साहित्यात मोलाची भर टाकली. या काळात विजयनगरचे नाव विद्यानगर असे झाले. लंकेपर्यंत राज्याचा विस्तार झाला. इ.स. १३४७ मध्ये तुंगभद्रेच्या उत्तर तिरावर कलबुर्गी (गुलबर्गा) येथे हसन गंगू बहामनी याने मुस्लीम राज्य स्थापन केले. तुंगभद्रा व कृष्णा या नद्यांमधील प्रदेशासाठी विजयनगर व बहामनी या दोन राज्यांत सतत लढाया होत असत. रायचूर व मुद्गल येथे या लढायांमध्ये विजयनगरने विजय मिळविला. सन १४८५ ते १४९१ एवढा अल्पकाळ साळुव या घराण्याची राजवट विजयनगरवर होती. साळुव घराण्यानंतर तुळुव घराण्याची राजवट सन १४९१ ते १५७० अशी होती. कुळुव घराण्यातील कृष्णदेव राया हा सर्वात अधिक कर्तृत्ववान राजा होऊन गेला. कृष्णदेव रायाची कारकीर्द इ.स. १५०९ ते १५२९ अशी झाली. या काळात विजयनगर  राज्याला साम्राज्याचे स्वरूप आले. विजयनगर  साम्राज्याच्या इतिहासातले हे एक सुवर्णयुग होते.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

मनमोराचा पिसारा.. विचारणा आणि आस्थेवाईक विचारपूस
मानस, तुझा ना कधी कधी भलताच राग येतो. लोकांशी बोलता बोलता ते तुला त्यांच्या मनातली गुपितं अशी कशी सांगून टाकतात? तू खेळ करतोस? असं कसं करतोस? मानसवर प्रश्नांची सरबत्ती करीत विचारलं. मानस त्यावर मंद हसला. त्यामुळे आणखी रागावून म्हटलं, ‘हे बरय तुझं! मुद्दामहून सांगत नाहीयेस. ट्रेड सिक्रेट ठेवतो आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी दडवण्यासारखं आहे. सांगायला घाबरतो आहेस. हे कबूल कर बघू!! तरी मानस तसाच मंद हसत राहिला.
‘तुला खूप उत्सुकता वाटतेय, कुतूहल आणि कौतुक वाटतंय. आपल्याला ही मानससारखं बोलता आलं पाहिजे. चटकन संवाद साधता आला पाहिजे, असं वाटतंय. ते माझ्याकडून तुला जाणून घ्यायचंय. म्हणून तू अशी विचारणा करतोयस. इन फॅक्ट मित्रा, तु तुझ्या प्रश्नाचं उत्तर तू  ऑलरेडी दिलेलं आहेस.’
पुन्हा कोडय़ात टाकू नकोस. सांगायचं तर सांग, नाहीतर गेलात उडत.. मी रागावून म्हटलं. मानस थोडं गंभीत होत म्हणाला, ‘मित्रा, प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत उत्तर दडलेलं असतं. जशी पृच्छा, तसे उत्तर. म्हणजे प्रश्न विचारताना तुझ्या आवाजाचा टोन, बॉडी लँग्वेज यावरून तुझ्या प्रश्नांमागची तुझी अ‍ॅटिटय़ूड लक्षात येत होती. ती अ‍ॅटिटय़ूड क्रिटिकल म्हणजे टीकात्मक होती. क्रिटिकल अ‍ॅटिटय़ूट म्हणजे क्रिटिकल एनक्वायरी. मी अशी क्रिटिकल एनक्वायरी करीत नाही.’
‘नीट सांग ना’ मी म्हटलं. ‘हे बघ तुला प्रश्न विचारण्याच्या दोन मुख्य पद्धती सांगतो. तू वापरतोस ती टीका करण्याच्या उद्देशाने, दुसऱ्याच्या मनातला कुटिल अंतस्थ हेतू शोधून काढण्यासाठी वापरलेली चौकशीची पद्धत म्हणजे क्रिटिकल एनक्वायरी. अपराधी, गुन्हेगार, संशयित व्यक्ती, गुंड आणि लबाड लोकांना अशा पद्धतीने प्रश्न विचारतात. यातून समोरच्या व्यक्तीवरचा अविश्वास प्रकट होतो. जणू काही समोरची व्यक्ती खोटं सांगून फसवत्येय असं गृहित धरून प्रश्न विचारले की त्याला क्रिटिकल चौकशी म्हणतात. सीबीआय, सीआयडी पोलिसी यंत्रणामधले लोक अशा पद्धतीचा वापर करताना आपण टीव्ही मालिकात पाहातो. मित्रा, दुर्दैवानं पालक आपल्या मुलांची अशीच उलट तपासणी घेतात. यातून सत्याचा उलगडा होत नाही. फारतर कबुली जबाब मिळतो. मुलांच्या वागणुकीत होकारात्मक बदल तर होत नाहीत उलट पालकांविषयी दुरावा निर्माण होतो.’
 ‘मग दुसरी पद्धत कोणती?’
‘दुसरी पद्धत विचारपूस करणे म्हणजे अ‍ॅप्रिशिएटिव्ह एनक्वायरी. इथे आरोप सिद्ध करणे, चुकांची कबुली मागणे, कचाटय़ात पकडणे असा हेतू नसतो.  उलट, त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा शोध घेतलेला असतो. अमृक कृत्य करण्यामागे कोणती मानसिक कारणं होती? एखादी चूक वारंवार घडण्यामागची मानसिकता शोधण्याचा प्रयत्न असतो. त्या व्यक्तीवर विश्वास टाकून मन मोकळे करण्याचं आवाहन करता येतं. त्यातून सत्यपरिस्थितीचा हळू हळू उलगडा होतो. समोरची व्यक्ती खोटं बोलू लागली तर तिच्यावर अ‍ॅटक न करता, ती काय प्रकारचं खोटं बोलली, कोणती लबाडी केली यांची शांतपणे, न रागावता, आरोपाती सरबत्ती न करता, प्रश्न विचारता येतात. या प्रक्रियेला वेळ लागतो, पण दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपल्या मनातलं सत्य सांगण्याचा अवकाश आणि संधी मिळते. मी तशी संधी देतो म्हणून संवाद घडतो. आता कळलं? ’ मानसनं विचारलं.
तू अ‍ॅप्रिशिएटिव्ह एनक्वायरी केलीस ना! मी हसत म्हटलं.
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

bjp rajput voters in up
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज
Geographical mind Geographical knowledge about the battlefield
भूगोलाचा इतिहास: भौगोलिक बुद्धिबळ
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

कुतूहल : गाडीचा विंडस्क्रीन
गाडी वेगात जात असल्याने तिचे वाऱ्यापासून आणि पावसापासून संरक्षण करणे फार महत्त्वाचे आहे. शिवाय हे संरक्षण ज्या पडद्यांमुळे करायचे ते पारदर्शक हवेत, कारण विंडशील्ड अथवा विंडस्क्रीन काय, की मागची काच असो, की बाजूच्या खिडक्या असोत, त्या पारदर्शक हव्यात, त्यातून दिसायला हवे, तरच गाडी सुरक्षितपणे चालवता येते; पण गाडीला जेव्हा अपघात होतो तेव्हा पुढची-मागची काच खळकन फुटते. मुंबईत पडणाऱ्या धुवाधार पावसाने काचेवर पाणी जमते, काश्मीरसारख्या ठिकाणी काचेवर बर्फ जमा होते. या अडचणींवर मात केली नाही तर परत प्रवास असुरक्षित असतो. यासाठी विंडस्क्रीनला असा आकार दिलेला असतो की काचेवरून पावसाचे पाणी आपोआप ओघळून जाईल, पण तरीही काचेवर शिल्लक राहणारा पाण्याचा थर पारदर्शकता बिघडवतो. म्हणून काचेवर वायपर्स आले. त्यांच्या टोकांना बसवलेले रबराचे तुकडे पाणी नीटपणे निपटून काढतात. तसेच हवेतील दमटपणामुळे किंवा बर्फामुळे जाणाऱ्या पारदर्शकतेला उत्तर आले डिफॉगरमुळे. वातावरणातील या शत्रूंना काबूत आणले तरी अपघातात फुटणाऱ्या काचांचे व त्यामुळे ड्रायव्हर आणि आतील प्रवाशांना होणाऱ्या इजेचे काय? त्यासाठी काचा फुटून त्याचे टोकदार छर्रे उडण्याऐवजी अन्य काही उत्तर शोधता आले तर ते हवे होते. मग जर हे तुकडे बिनटोकाचे करता येतील का? ते इजा करणार नाहीत असे त्याचे तुकडे पडतील का? यावर संशोधन झाले व मग त्यातून आली षटकोनी आकारात फुटणारी टेम्पर्ड काच. ही काच फुटताना तिचे टोकदार तुकडे पडत नाहीत. लॅमिनेटेड काचेत दोन थर असतात व ते एकमेकाला चिकटवलेले असतात. ही काच फुटली तरी ती खाली न पडता जागेवरच राहते आणि गाडी गॅरेजला नेईपर्यंत ड्रायव्हरला अडचण पडत नाही. खिडक्यांच्या काचातून ऊन येऊ नये म्हणून त्याला सनफिल्म लावतात. यामुळे आतून बाहेरचे दिसते, पण बाहेरून आतले दिसत नाही, पण अशा फिल्मला पोलिसांची हरकत असते, कारण त्यांना आतून कोण जाते हे समजणे महत्त्वाचे असते.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

इतिहासात आज दिनांक.. १० नोव्हेंबर
१४८९ अकबर बादशाहचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख दिवाण राजा तोडरमल यांचे निधन. त्यांच्या पद्धतीचे अनुकरण पुढील सत्तांनी केले.
१६५९ शिवरायांनी अफझलखानाचे पारिपत्य केले.
१९८२ रशियन अध्यक्ष लिओनीद इलिय्च ब्रेझनेव्ह यांचे निधन. युक्रेन प्रांतात (आता स्वतंत्र देश) १९०६ साली त्यांचा जन्म झाला. क्रांतीनंतर १९२३ मध्ये कम्युनिस्ट यूथ लीगचे ते सदस्य झाले. शेतीशी निगडित अशा प्रश्नांवर ते काम करू लागले. बेलारूस, उरल या भागात त्यांनी कृषीविषयक कामे केली. १९३१ मध्ये ते कम्युनिस्ट पार्टीचे क्रियाशील अधिकृत सदस्य झाले. याच काळात त्यांनी धातुशास्त्रातील आपला अभ्यास पूर्ण केला. १९३८ मध्ये पार्टीच्या प्रचार विभागाचे प्रांतप्रमुख झाले. विभागीय पातळीवर काम करीत असताना कम्युनिस्ट पार्टीचे युक्रेन विभागाचे प्रमुख निकिता क्रुश्चेव्ह यांच्या संपर्कात आले आणि त्यांची मर्जी ब्रेझनेव्ह यांच्यावर बसली. १९४१ ते ४५ या दरम्यान ब्रेझनेव्ह दक्षिणेकडील लष्कराचे राजकीय कोमिसार बनले. युद्ध समाप्तीनंतर त्यात मोल्दाव्हिया येथे पक्षप्रमुख म्हणून पाठविण्यात आले. या भागाच्या सोव्हिएतीकरणाची जबाबदारी  त्यांच्यावर होती. स्टॅलिन यांच्यामुळे ब्रेझनेव्ह पॉलिट ब्युरोचे सदस्य झाले.१९६४ मध्ये ते कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी झाले. क्रुश्चेव्ह यांच्यानंतर त्यांच्याकडे सत्ता चालून आली. १९७० पासून त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांच्याच काळात रशियाने आफ्रिका व आशियात स्वत:चा प्रभाव वाढवला.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in