कुतूहल : कार्यालयाची रचना
कार्यालयात कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी विविध प्रकारच्या रचना केलेल्या असतात. साहेब लोक केबिनमध्ये बसतात. त्यांच्या खोलीत मोठे टेबल असते, टेबलामागे फिरती खुर्ची असते, समोर भेटायला येणाऱ्यांसाठी ३-४ खुर्च्या असतात. पण जर ते कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांचे असेल तर त्यांना भेटायला येणारी शिष्टमंडळे आकाराने मोठी असतात. त्यामुळे त्यांच्या टेबलासमोर चोवीसएक खुच्र्या ठेवलेल्या असतात. शिवाय टेबलावर दोन-तीन प्रकारचे टेलिफोन असतात, संगणक असतो, कदाचित फॅक्स यंत्रही असते आणि या सगळ्यांच्या वायरी इतस्तत: लोंबकळत असतात. यामुळे समजा उद्याला साहेबांना धावत पळत खोलीबाहेर पडायचे असेल तर कोण अडचणी येतात. या लोंबकळणाऱ्या वायरींना चुकवत चुकवत साहेबांना टेबलाबाहेर येऊन समोरच्या खुच्र्याना वळसा घालत घालत बाहेर पडावे लागते. शिवाय जर खोलीत जाजम असेल आणि ते कोठेतरी वळलेले असेल तर हमखास त्याला अडखळून पडायला होते. हल्ली बऱ्याच कार्यालयांत जपानी पद्धतीच्या क्युबिकल्स बांधलेल्या असतात. म्हणजे त्यात एकच माणूस जेमतेम बसू शकतो. त्यांच्यासमोर एकही खुर्ची नसते. त्याला भेटायला येणाऱ्यांनी अभ्यागत कक्षात बसायचे व कर्मचाऱ्याने तेथे जाऊन पाहुण्यांना भेटायचे, पण या छोटय़ाशा क्युबिकलमधून बाहेर अलगद पडणे फारच कौशल्याचे काम असते. न धडपडता त्यातून बाहेर येण्यासाठी सरावच करायला पाहिजे. अशी ही साहेब लोकांची बसायची केबिन आणि क्युबिकल्सची सोय झाल्यावर आम कर्मचारी लोक एका सभागृहात बसतात. तेथे १०-२० माणसे एकत्र बसतात. ही कार्यालये विभागवार असतात. अकौंट्सचे कार्यालय, पर्चेसचे कार्यालय, मार्केटिंगचे कार्यालय अशी ती विभागवार असते. त्यात दोन-तीन सुपरवायजर बसतात व त्या प्रत्येकाच्या हाताखालचे कर्मचारी एकेका ओळीत स्वतंत्रपणे बसलेले असतात. परत या प्रत्येकाच्या टेबलावर हल्ली एकेक संगणक असतो, शिवाय काहीजणांना टेलिफोन दिलेला असतो. त्यामुळे अशा रचनेतून आपत्काली बाहेर सुखरूपपणे पडणे हे कौशल्याचे काम असते आणि परत त्यासाठी सराव करणे गरजेचे असते.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

इतिहासात आज दिनांक.. १६ ऑक्टोबर
१८९६ हिंदी साहित्यिक व संसदपटू सेठ गोविंददास यांचा जबलपूर येथे जन्म. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरघोस कामगिरी करून साहित्याच्या क्षेत्रातही भरीव कामगिरी केली.
१९७०इजिप्तच्या अध्यक्षपदी अन्वर सादत यांची निवड. सैनिक, राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते म्हणून त्यांची ओळख जगाला आहे. इजिप्तमधील ताला जिल्हय़ात १९१८ मध्ये त्यांचा जन्म झाला. १९३८ मध्ये त्यांनी लष्करी कारकीर्दीस सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धकाळात जर्मनीशी संबंध ठेवल्यावरून त्यांना तुरुंगवास घडला. ब्रिटिशांचे वर्चस्व धुडकावून लावणे या ध्येयाने त्यांनी समविचारी लोक एकत्र केले. राजे फारुख प्रथम यांची सत्ता उलथवून टाकली. गमाल अब्दुल नासर यांच्या कारकीर्दीत ते उपराष्ट्राध्यक्ष झाले. १९५५-५६ मध्ये ते अल् जम्हूरिया आणि अल तहरीरचे संपादक होते. कम्युनिस्टविरोधी विचारसरणीचे ते प्रमुख होते. नासर यांच्या मृत्यूनंतर १९७० मध्ये ते राष्ट्राध्यक्ष झाले. इस्त्रायलशी संघर्ष चालू असतानाच १९७३ मध्ये त्यांनी स्वत:ला गव्हर्नर जनरल म्हणून घोषित करून लष्कराचे सर्वेसर्वा झाले. पुढे त्यांनी शांततेसाठी प्रयत्न केले. इस्त्रायलचे पंतप्रधान मेनाकीम बिगीन यांच्या बरोबरीने त्यांना १९७८ मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. इस्त्रायलशी करार करणारे ते पहिले अरब नेते होत. १९८१ मध्ये त्यांची हत्या झाली.
२००२ ऐतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचे निधन. झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ, शहेनशहा, शिकस्त, राजेश्री या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या.
प्रा. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

सफर काल-पर्वाची : ज्यूंचा शब्बाथ
सर्व ज्यूंना शब्बाथचे कठोर पालन करावे लागते. शनिवारी घरात स्वयंपाकाला बंदी असल्यामुळे शुक्रवारीच शनिवारचा स्वयंपाक करून ठेवला जातो. शब्बाथची सुरुवात ‘छल्लाह’ म्हणजे पवित्र पावाचे दोन लोव्हज् कापडात गुंडाळून टेबलावर ठेवतात. किदूश म्हणजे एका ग्लासमध्ये वाइन व मोत्झी म्हणजे पाव हे घेऊन शब्बाथ सुरू होतो. शब्बाथ काळात पूर्णवेळ घरात बसून राहिल्यावर शनिवारी शब्बाथ संपल्यावर सर्व पुरुष काळा कोट, पँट, हॅट घालून तर स्त्रिया पूर्ण काळा स्कर्ट व डोक्यावर काळा रुमाल (किप्पा) बांधलेला असे फिरायला बाहेर पडतात. सर्व रेस्टॉरंट्स भरलेली असतात. शब्बाथचे इतके महत्त्व असते की, १९४८ साली स्वतंत्र इस्रायल या देशाची स्थापना झाल्याची घोषणा करण्याचा त्यांनी जो दिवस व वेळ ठरविली होती ती शब्बाथमध्ये येत होती. त्यामुळे त्यांनी ती वेळ बदलून घोषणा केली.
ज्यूंमध्येही काही पंथ आहेत. ‘हिसाडिक’ ज्यू फार कर्मठ असतात. ‘दाती’ या ज्यूंच्या वस्तीतून शब्बाथच्या दिवशी वाहने नेण्यास बंदी असते. वाहनांवर ते दगडफेकही करतात. शब्बाथची कल्पना बायबलच्या जुन्या करारातून आली आहे. युगपुरुष मोझेस याने इस्रायली लोकांना परमेश्वराची आचारसंहिता दिली. तिला दहा आज्ञा (टेन कमांडमेंट्स) म्हणतात. त्यातील तिसऱ्या आज्ञेत म्हटले आहे, सहा दिवसांत परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व सर्व चराचर निर्माण केले व सातव्या दिवशी विसावा घेतला, म्हणून परमेश्वराने शब्बाथ दिवस पवित्र केला आहे. त्या दिवशी तू कोणतेही काम करू नकोस. त्या काळापासून शब्बाथचे पालन काटेकोरपणे केले जाते.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

मनमोराचा पिसारा.. खार प्रतिभा आणि मोर
‘सर सर झाडावर, झाडावरून खाली..’ ही कविता कोणाला उद्देशून लिहिली यावर मन क्षणभर संभ्रमित झालं तेवढय़ात समोरच्या झाडांच्या फांद्यांवरून तुरुतुरु पळणारी खारीची जोडी डोळ्यांसमोर आली. मध्येच थांबून  दोन्ही हात किंवा पुढचे पाय वर करून तोंडात पानांचे कोवळे कोंब कोंबीत, शेपूट उंचावून कर्कश आवाज करीत खारी धावत होत्या. एकमेकींशी (दोन्ही नर, की मादी किंवा नरमादी) काहीतरी बोलायच्या, पुन्हा वेगाने पळापळ सुरू. मग कधी इमारतीच्या पॅरापेटवर बसून त्यातली एक खार स्वत:चा एकटेपणा आरडोओरडा करून इतरांना बोलवायची. त्यांचा हा रस्ता तसा नेहमीचा होता. सकाळी ११च्या सुमाराला चहा पिता पिता (म्हणजे मी, त्या नाही!) आमची ओझरती भेट व्हायची. प्रभू रामचंद्रानी तिच्या पाठीवरून हात फिरवून उमटवलेल्या बोटांची गोष्ट आठवायची. ‘खारीचा वाटा’ हा शब्दप्रयोग आठवायचा. खारीचे लुकलुकते डोळे, त्रिकोणी कान, सदैव टिवटिव करण्याची खोडी आवडायला लागली. पण या खारीचं करू काय? माझ्या भावविश्वात ती कुठे सामावलेलीय? याचं कोडं वाटायचं. त्या खारींचा चंचलपणा, वात्रटपणा साकारणाऱ्या वॉल्ट डिस्नेच्या ‘चिप आणि डेल’ जोडीबद्दल मिश्र भावना वाटायच्या. त्यांचा खेळकरपणा, निरुपद्रवी नसून, उपद्व्यापी वाटायचा. त्यांची ऊर्जा मात्र मनाला नकळत भावत होती. अचानक मंगेश पाडगावकरांची ‘खार’ कविता आठवली..
हवे-नकोच्या पल्याड अगदी
जिथे चालणे मावळते, अन् वाट संपते,
पुन्हा सुरू नच होण्यासाठी.
तिथेच बसते, चपळ खार ती
दोन चांदण्या भिरभिर डोळ्यांमधल्या
मिचकावित, अन् फळावरी पिकलेल्या कोरित
लवचिक गाणे, करीत टुकटुक काळालाही
आणि वाटते, मातीच्या कलशापरि कक्षा
फोडावी: उधळाव्या ठिकऱ्या,
वाटेची तोडून साखळी मुक्त करावे पायगतीचे
हवे- नकोच्या सीमेवरती वाट सरावी:
पुन्हा सुरू नच होण्यासाठी!
आणि फिरावा
खारीच्या शेपटिचा झुबका
आत्म्यावरुनी
(२० मार्च १९५५ कवितासंग्रह ‘छोरी’, मौज प्रकाशन)
पाडगावकरांच्या कवितेची मोहिनी पडली नाही तर नवल. चपखल शब्दरचना, अचूक मांडणी आणि मनाला स्पर्शणारा भावार्थ. कविता वाचली आणि खारीचं कोडं सुटू लागलं. खारीची चपलता, चंचल विभ्रम आणि डोळ्यांतील लकाकी आपल्याला प्रतीत होते. कारण आपल्याच कुडीत संचार करणारी ऊर्जा, प्रत्यक्ष खारीच्या रूपातही दिसते. आपली दृष्टी मानवी जगण्या-मरण्यापल्याडच्या सृष्टीपर्यंत पोहोचते. निराकार, निर्गुणात आकार शोधते आणि त्याचीच कविता होते. ती प्रतिभा आणि स्फूर्ती इतकी आदिम की काळाला टुकटुक करून चिडवण्याची शक्ती तिच्यात असते. ती प्रतिभा पुन्हा पुन्हा अनुभवावी, मातीच्या देहाचा कलश (मडकं) फुटावं, जन्म- मरणाचा फेरा संपावा आणि मुक्त होऊन पोहोचावं त्या प्रतिभेपर्यंत. ती प्रतिभा, ती ऊर्जा खारीच्या रूपात लक्कन् दिसली ती जाणीव मनस्वी. खारीच्या तुर्रेबाज शेपटीचा स्पर्श म्हणजे प्रतिभेचा स्पर्श. मंगेशकाका, तुमची खार आणि माझा मोर.. मनमोर.. मनमोराचा पिसारा एकच. होय ना?
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com