मित्रा, जरा डोळे मिटून, कान एकवटून हृदयनाथांचं गीत आठव. ते सूर मनात घुमले की ज्या फुलांची आठवण येईल, ते लक्षात ठेव. मग अजिबात खोटं न बोलता, खरं खरं सांग. ओळखलंस गाणं? अरे, ‘त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का?’ बस् एवढा मुखडाच.
आता सांग, कोणती फुलं डोळ्यासमोर आली? गुलाब लाल रंगाचा? कमळ? सोनचाफा! कवठी चाफा? जाई, जुई, चमेली? मोगरा. पैकी एक दोन किंवा लागोपाठ सगळी. माझी खात्री आहे, एक फूल आहे जे आपल्या कोणत्याही मित्राच्या मन:पटलावर उमटलेले नसेल!
घाणेरीचं फूल! आठवून पाहा, येताहेत डोळ्यासमोर? कठीण आहे. अरे, इतक्यांदा ही सुंदर फुलं पाहिली आहेस तरी आठवली नाहीत ना?
 ‘झाड फुलानी आले बहरून, तू न पाहिले डोळे उघडून!’ ही ओळ, या फुलांच्या बाबतीत १०० टक्के खरीय. अशा विस्मरणाबद्दल घाणेरीच्या फुलांची मी समस्तांतर्फे इथे माफी मागतोय. आधी इतक्या नाजूक फुलांना घाणेरी असं घाणेरडं नाव ठेवलंय. कुंपणाला किंवा वईला लावून (की उपटून न टाकल्यामुळे जगणाऱ्या) त्यांना वाळीत टाकलंय. फुलांवर, निसर्गावर मनापासून प्रेम करणारे या फुलांना अनुल्लेखाने मारत आहेत.
१२ महिने हिरवीगार पानं, ठेंगणा पण भरगच्च बांधा असलेलं झाड सर्वत्र दिसतं. फूल एकटं दुकटं कधीच नाही. १५-१६ फुलांचं एक वर्तुळ, मग त्याच्या आत आणखी लहान, मग अगदी जेमतेम दिसणाऱ्या पाचसहा मुकुलिका. गुलाबी, पिवळट असे मोहक पेस्टल कलर. बहुधा पण संपूर्ण नारिंगी छटा असलेला फुलोरादेखील दिसतात. देठ नाजूक पण दमदार. फुलोरा हलके हातानं काढला तरी एखाद दुसरं चिमुकलं फूल हमखास गळतं. फुलांच्या आसपास हिरव्या मण्यांसारख्या फळांचा तसाच फुलोरा आढळतो. ही फळं काळपटतात आणि मग चक्क गोडसर लागतात.
जोरात हुंगलं तर किंचित उग्र वास येतो. (पण घाणेरडा वास नक्की नाही). कदाचित सांडपाण्यावर जगणारं, वाढणारं झाड म्हणून त्याला घाणेरी म्हणतात की काय कोण जाणे?
त्या फुलांचे इटुकले पिटुकले फुलोरे पाहिले की मन नकळत बाळपणात धाव घेतं. तेव्हा ही फुलं खूप जवळची वाटायची, सोबत करायची. कारण ही फुलं कितीही तोडली तरी कोणीही ओरडत नसे.  विचारतो कोण त्या फुलांना? त्याचा ना हार, गजरा करता येत, ना देवाला वाहाता येत. त्यामुळे बिनधास्त फुलं गोळा करा, अधूनमधून त्या काळ्या गोडसर फळांना जिभेवर ठेवा. मस्त वाटायचं. मग त्या फुलांच्या इवल्या इवल्या रांगोळ्या करायच्या आणि खेळता खेळता विसरून जायचं. खूप वषर्ं विसर पडला.
मित्रा, निसर्ग असतो, फक्त चिरंतन आपण त्याचं वर्गीकरण करतो- नाजूक, देखणा, भव्य, भयावह, रौद्र, भीषण. आपल्या अनुभवाप्रमाणे. निसर्गाला त्याचं देणंघेणं नसतं. हे सनातन सत्य निसर्ग वारंवार सांगतो. अगदी घाणेरीच्या फुलांतूनही तेच सुचवतो. आता कधी दिसली ना ती फुलं, तर थबकून पाहशील ना रे?
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

इतिहासात आज दिनांक.. १५ ऑक्टोबर
१८८८ गोपाळ गणेश आगरकरांनी ‘सुधारक’ पत्राचा पहिला अंक या दिवशी प्रसिद्ध केला. पत्र इंग्रजी व मराठी अशा द्वैभाषिक रूपात काढण्याचे आगरकारांनी ठरविले होते. इंग्रजीची जबाबदारी गोपाळ कृष्ण गोखले आणि मराठीची जबाबदारी स्वत: आगरकरांनी घेतली. पुढे सीताराम गणेश देवधर आगरकरांच्या मदतीस धावले. तिसऱ्या वर्षी या पत्राचा खप २९५३ एवढा होता. त्यांच्यापुढे जगद्वितेच्छु व केसरी हीच दोन पत्रे होती. त्यांचा खप चार हजारच्या घरात होता. या पत्रातून त्यांनी विधायक विचार मांडले. विचारकलह केला. ‘महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र’ या लेखात आगरकर लिहितात. ‘‘दुष्ट आचारांचे निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्यशोधन व भूतदयेचा विचार इत्यादी मनुष्यांच्या सुखाची वृद्धी करणाऱ्या गोष्टी  विचारकलहाखेरीज होत नाहीत. आजपर्यंत या देशात हा कलह माजावा तितका कधीच न माजल्यामुळे व बहुधा आमचे लोक गतानुगतिक असल्यामुळे, हे भरतखंड अनेक प्रकारच्या विपत्तीत खितपत पडले आहे. ‘बांधव हो, विचारकलहाला तुम्ही इतके कशासाठी भिता?’’ असा प्रश्न आगरकरांनी केला होता. सुधारकचा जन्मच मुळी समाजातील दोषस्थळे दाखविण्यासाठी झाला होता. दोषस्थळे दाखविल्यावर त्यावरील उपाययोजना सुधारकमध्ये सुचविण्यात आलेल्या होत्या. ३ जुलै १९१६ रोजी ‘सुधारक’ पत्र अंतर्धान पावले.
१९०८ अमेरिकेतील राजकारणी, निष्णात अर्थशास्त्रज्ञ, उत्तम लेखक जॉन केनेथ गालब्रेथ यांचा कॅनडातील आँटॅरिओ येथे जन्म झाला. १९६१ ते ६३ या काळात त्यांनी भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून यशस्वी कारकीर्द केली. या अनुभवांवर पुढे यांनी लेखन केले.
१९८३ पंजाबमध्ये सरकारने खास वटहुकूम काढून सैन्याला खास अधिकार दिले.
प्रा. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
navya naveli nanda pasta
नातीच्या हातचा पास्ता खाऊन जया बच्चन यांच्या डोळ्यात आलेलं पाणी; नव्या नंदा म्हणाली, “मी खूप जास्त मसाला…”
rupali chakankar jitendra awhad
“रुपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते”, सुप्रिया सुळेंवरील ‘त्या’ टीकेला आव्हाडांचं उत्तर; म्हणाले, “बुरसटलेले विचार…”

सफर काल-पर्वाची : ज्युडाइझम
ज्यू  हा लोकवाचक शब्द आहे म्हणजे त्या लोकांना ज्यू म्हणतात. ज्युडाइझम हा त्यांचा धर्म तर हिब्रू ही त्यांची भाषा व लिपी. प्राचीन काळी या टोळ्या करून राहणाऱ्या लोकांनाच हिब्रू म्हणत. त्यांची भाषा व धर्मसुद्धा हिब्रू होता. पुढे त्यांच्या राज्याचे दोन भाग झाले. त्यातील दक्षिणेकडील ज्युडाह या राज्यातील हिब्रू लोक अधिक प्रबळ होते व त्यांना ज्यू असे नाव पडले व त्यांचा धर्मही ज्युडाइझम झाला व तेच पूर्ण इस्रायलचे अधिपती झाले. बहुसंख्य ज्यू अतिकर्मठ असतात. त्यांच्या धर्मोपदेशकांना राबाय म्हणतात. धर्मसंस्थेला रॅबिनेट म्हणतात. हे राबाय नेहमी काळा सूट-पँट व हॅटमध्ये असतात. राबाय दोन्ही कानांवरून लांब शेंडीसारखे कल्ले सोडतात व कायम काही तरी विचारात गढलेले असतात.
रॅबिनेटचे खाण्या-पिण्याबाबतही नियम कडक असतात. या नियमांना कोशर म्हणतात. या नियमांचे पालन करून ज्या हॉटेलमध्ये अन्न शिजविले जाते तेथे काऊंटरवर ‘कोशर अ‍ॅज पर रॅबिनेट सुपरव्हिजन’ असे बोर्ड लावलेले असतात. तिथले दरही इतरांपेक्षा दहा ते पंधरा टक्के अधिक असतात. त्यांच्या धर्मग्रंथाला तोराह तर प्रार्थनास्थळाला सिनेगॉग म्हणतात. ते एकेश्वरवादी आहेत. मूर्तिपूजक नाहीत. प्रार्थनेत ते देवाला अडोनाय (माय लॉर्ड) असे संबोधतात किंवा ऌहऌ अशी अक्षरे सिनेगॉगमध्ये लिहिलेली असतात.
शुक्रवारी देवाने जगाची निर्मिती केली म्हणून शनिवारचा दिवस शब्बाथ म्हणजे विश्रांतीचा दिवस पाळतात. त्या दिवशी इस्रायलमध्ये आठवडय़ाची सुट्टी असते. बहुतेक ज्यू लोकांमध्ये शब्बाथचा दिवस पाळला जाऊन ते शनिवारी घराबाहेरही पडत नाहीत.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल : आगीत फर्निचर चटकन जळते
एखाद्या आगीच्या जागी जेव्हा अग्निशमन दलाची माणसे येऊन पोहोचतात, तेव्हा आगीवर पाणी मारायला लागण्यापूर्वी धूर आणि त्यामुळे निर्माण झालेले वायू निघून जाण्याची सोय त्यांना प्रथम करावी लागते. त्यासाठी दारे, खिडक्या उघडणे आणि वेळप्रसंगी भिंतींना, छताला भोके पाडणे या गोष्टीही त्यांना कराव्या लागतात. न्यूयॉर्क महानगरपालिकेचे अग्निशमन दल हे अमेरिकेतील सर्वात मोठे दल असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा इतरांना मिळतो. घरातील गाद्यात आणि सोफा सेट्समध्ये पॉलियुरेथिन या प्लास्टिकची कतरण वापरतात. ती कापसापेक्षा जलद गतीने आगीच्या भक्ष्यस्थानी पडते. घरातील प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे. आगीमध्ये या वस्तू पेट घेऊन बंद खोलीच्या हवेतील ऑक्सिजन संपवून टाकतात. त्यामुळे एक फायदा होतो की, सगळ्याच ज्वलनशील वस्तू ऑक्सिजनच्या अभावी जळू शकत नाहीत, त्यामुळे अशा आगी लवकर विझू शकतात, पण जर अग्निशमन दलाचे लोक आल्या आल्या दारे खिडक्या उघडून मोकळ्या हवेला आगीच्या स्थळी प्रवेश मिळवून देणार असतील तर आग परत भडका घेऊ शकते. म्हणून न्यूयॉर्क महानगरपालिकेचे लोक एका मोकळ्या जागी रिकाम्या २० घरात आधुनिक फर्निचर ठेवून त्या घरांना मुद्दाम आग लावून ही आग विझवायला कोणते तंत्र अधिक उपयोगाचे पडते ते पाहणार आहेत. अग्निशमन दल वर्षोनुवर्षे आगी विझविण्याचे काम करीत असल्याने त्यांचा अशा कामातील अनुभव जरी समृद्ध असला तरी घराघरातील वस्तू बनविण्यासाठीचे पदार्थ (मटेरिअल) सातत्याने बदलत आहे. त्यामुळे जुनी तंत्रे वेगाने कालबाह्य़ होत आहेत. ही गोष्ट फक्त अग्निशमन तंत्रात नाही तर वैद्यकीय, अभियांत्रिकी धरून सगळीकडे होत आहे आणि जसजसे पदार्थ बदलत आहेत तशी तंत्रेही बदलावी लागणार आहेत. आगीच्या जागी अधिक हवा सोडल्याने आग थंड होईल, असे सामान्यपणे सगळ्यांना वाटते, पण प्रयोग असे सिद्ध करतात की वातावरण अधिक गरम होते. त्यामुळे आग विझवितानाही प्रयोगांती काय सिद्ध होते हे जाणून घेऊन त्याप्रमाणे अग्निशमनाच्या तंत्रात बदल करणे महत्त्वाचे आहे.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई २२  
office@mavipamumbai.org