सर्व सारख्याच प्रकारचे अणू एकत्र येऊन ‘मूलद्रव्य’ तयार होतं. अणूमध्ये न्यूट्रॉन्स, प्रोटोन्स आणि इलेक्ट्रॉन्स असतात. प्रत्येक मूलद्रव्यात न्यूट्रॉन्सची संख्या वेगवेगळी असू शकते, पण प्रोटोन्सची संख्या मात्र नेमकी असते. एखाद्या मूलद्रव्यात जितके प्रोटोन्स असतील त्यानुसार त्यांना अणुक्रमांक दिला जातो. उदाहरणार्थ, हायड्रोजन या मूलद्रव्याच्या अणूमध्ये एक प्रोटोन असतो म्हणून त्याचा अणुक्रमांक एक आहे; कार्बनच्या अणूमध्ये सहा प्रोटोन्स असतात म्हणून त्याचा अणुक्रमांक सहा असतो. तर लोखंड या सर्वपरिचित मूलद्रव्याचा अणुक्रमांक आहे २६ कारण त्याच्या अणूमध्ये २६ प्रोटोन्स असतात. दिमित्री मेंडेलीवने, एका तक्त्यामध्ये चढत्या अणुक्रमांकाने मूलद्रव्यांची मांडणी केली. अशी मांडणी करताना काही ठरावीक क्रमांकांनंतर येणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये त्याला साम्य आढळलं. म्हणून संपूर्ण तक्त्याची रचना अशी केली कीसाम्य असणारी सर्व मूलद्रव्ये एका गटात येतील. त्यामुळे गटांनुसार मूलद्रव्यांचा अभ्यास करणं आणि त्यांचा व्यवहारात उपयोग करणं खूप सहज शक्य झालं. दिमित्री मेंडेलीव याने तयार केलेल्या ‘आवर्तसारणी’त आजपर्यंत माहीत झालेली ११८ मूलद्रव्यं अगदी चपखलपणे बसली आहेत. हे झालं ११८ मूलद्रव्यांच्या मांडणीबद्दल! पण आपल्या सगळ्यांच्या मनात मूलद्रव्यांबद्दल अनेक प्रश्न येतात. ही ११८ मूलद्रव्यं आहेत तरी कोणती? त्यांची नावं काय? त्या प्रत्येकाचे खास असे गुणधर्म कोणते? त्यांचा आपल्या आयुष्याशी काही संबंध आहे का? त्यांचा आपल्याला काही उपयोग आहे का? आणि तो कसा? यापेक्षाही आणखी मनोरंजक माहिती म्हणजे ही मूलद्रव्यं मुळात निर्माणच कशी झाली? आणि जर कुठे न कुठे नैसर्गिकरीत्या तयार झाली असतील तर ती माणसाच्या लक्षात कधी आणि कशी आली? थोडक्यात या मूलद्रव्यांचा शोध कसा लागला? आणि त्यांना नावं कशी दिली जातात? मूलद्रव्य जिथे आढळतात. त्या भूभागावरून, की त्यांच्या रंगावरून की त्यांना शोधणाऱ्या संशोधकाच्या नावावरून की त्यांच्या गुणधर्मावरून? चला तर निघू या अणुक्रमांकांच्या चढत्या क्रमानुसार, मूलद्रव्यांच्या सफरीला!! - डॉ. मानसी राजाध्यक्ष मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org जे आले ते रमले.. : इंडो-ग्रीक राज्ये इसवी सनपूर्व काळात भारतीय प्रदेशावर आक्रमण करणारा ग्रीक राजा अलेक्झांडर ऊर्फ सिकंदर हा पहिला परकीय समजला जातो. त्याचे भारतीय प्रदेशातले वास्तव्य नगण्यच होते. पण या ग्रीक आक्रमणाचा परिणाम म्हणून वायव्य प्रांतात अनेक छोटी छोटी ग्रीक राज्ये उदयाला आली. यांना इंडो-ग्रीक राज्ये अशी संज्ञा दिली जाते. यांपैकी काही राजांनी भारतीय संस्कृतीत समरस होऊन भारतीय संस्कृतीत मोलाची भर घातली आहे. उदाहरणार्थ, इण्डो-ग्रीक राजा मिनँडर याने बौद्ध धर्माच्या इतिहासात आपलं नाव अजरामर करून ठेवलंय. इ. स.पूर्व १८० मध्ये बॅक्ट्रिया (सध्याचे अफगाणिस्तान) या राज्याचा ग्रीक राजा दिमित्रीयस याने िहदूकुश पर्वतशृंखला पार करून वायव्य भारतीय क्षेत्रावर आक्रमण केले. तिथल्या स्थानिक राजाचा पराभव करून दिमित्रीयसने राज्य स्थापन केले. त्याच्या पुढच्या पिढीतील राजांनी त्या प्रदेशात स्थायिक होऊन आपापल्या वसाहती स्थापन केल्या, त्यांना ‘िहदी-यवन राज्ये’ किंवा ‘इंडो-ग्रीक किंगडम’ असे नाव आहे. या राजांची सत्ता २०० वर्षे टिकली. हे ग्रीक राजे भारतीय िहदू स्त्रियांशी विवाह करून भारतीय भाषा, वेशभूषा, जीवनशैली आणि शासनपद्धती स्वीकारून पूर्णपणे भारतीय संस्कृतीत रमले. बहुतेक इंडो-ग्रीक राजांनी िहदू किंवा बौद्ध धर्म स्वीकारला. इंडो-ग्रीक राज्यांच्या दोन शतकांच्या काळात तीस राजांनी राज्यकारभार केला. या काळात ग्रीकांची मूळची हेलेनेस्टिक संस्कृती आणि बौद्ध संस्कृती यांच्या संयोगाने ‘ग्रीको-बुद्धीझम’ ही एक नवीनच संस्कृती उदयाला आली. सध्याच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पसरलेल्या या इंडो-ग्रीक राज्यांमध्ये तक्षिला ऊर्फ तक्षशिला, पुष्कलावती आणि सागाल ऊर्फ सियालकोट ही प्रसिद्ध शहरे होती. साधारणत इ. स. १२च्या सुमारास शक राजा मौस याने तत्कालीन इंण्डो-ग्रीक राजधानीचे शहर तक्षिलावर हल्ला करून अर्ध्याअधिक इंडो-ग्रीक राज्यक्षेत्राचा ताबा घेतला. त्यानंतर पुढच्या काळात हा हिंद-यवन समाज पूर्णपणे भारतीय संस्कृतीत विलीन होऊन भारतीय झाला. सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com