रुथेनिअम, ऱ्होडिअम, पॅलॅडिअम, चांदी, ऑस्मिअम, इरिडिअम, प्लॅटिनम आणि सोनं या आठ धातूंना ‘मौल्यवान धातू’ म्हटलं जातं; पण मुळात ‘मौल्यवान धातू’ असं नामकरण या धातूंना करण्यामागचं कारण काय बरं असू शकेल? कोणी म्हणेल याचं कारण अगदी सोप्पं आहे. पृथ्वीवर ज्यांचा साठा कमी असतो, असे धातू साहजिकच दुर्मीळ आणि म्हणूनच ते मौल्यवान ठरतात. दुसरं कोणी म्हणेल कदाचित या धातूंची खनिजं दुर्मीळ असतील; शिवाय खनिजांपासून शुद्ध धातू मिळवण्याची प्रक्रियाही खर्चीक असेल आणि त्यामुळे वाढणारी त्यांची किंमत त्यांना मौल्यवान ठरवत असेल.. पण तसं असेल तर असे अनेक दुर्मीळ धातू जगात आहेत, त्यांनीही मौल्यवान धातूंच्या पंगतीत असायला हवं, पण सर्वानाच तो मान नाही. बरं, शुद्ध धातू मिळवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि खर्च वाढवणारी म्हणावी तर आता तंत्रज्ञान एवढं विकसित झालंय की, खनिजापासून शुद्ध धातू मिळवण्यासाठी पूर्वीइतका वेळ आणि पैसा लागत नाही. तरीही या मौल्यवान धातूंची किंमत वाढतेच आहे आणि त्यांचं ‘मौल्यवान’ हे पद सार्थ ठरत आहे. तेव्हा प्रश्न असा आहे की, दुर्मीळ खनिज असलेले अनेक धातू जगात आहेत; पण त्यांना मौल्यवान म्हटलं जात नाही, हे जर खरं असेल तर मग रुथेनिअम, ऱ्होडिअम, पॅलॅडिअम, चांदी, ऑस्मिअम, इरिडिअम, प्लॅटिनम आणि सोनं या आठ धातूंना ‘मौल्यवान धातू’ का म्हटलं जातं? रसायनशास्त्राच्या दृष्टीने ‘मौल्यवान’ हा सन्मान प्राप्त होण्यासाठी धातूंमध्ये काही खास गुणधर्म असावे लागतात. धातू दिसायला चकचकीत, देखणे असावेत हा गुणधर्म तर हवाच, त्याशिवाय धातू लवचीक हवा. एखाद्या धातूची जेवढी बारीक तार काढता येईल तेवढा तो महत्त्वाचा ठरतो. शिवाय इतर धातूंपेक्षा, मौल्यवान धातू खूप जास्त तापमानाला उकळतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मौल्यवान धातू इतर धातूंच्या तुलनेत कमी क्रियाशील असतात. दमट हवेशी जरासा संपर्क आला की लोखंड गंजून जातं, म्हणजेच त्याचं ऑक्साइड तयार होतं. ही रासायनिक अभिक्रिया जलद आणि सहजपणे होते; पण मौल्यवान धातू इतक्या सहजपणे रासायनिक अभिक्रिया करीत नाहीत. या आणि अशा अनेक इतर गुणधर्मामुळे या आठ धातूंचा अनेक जीवनोपयोगी गोष्टींमध्ये मोठय़ा प्रमाणात वापर करता येतो. म्हणून या आठ धातूंच्या गटाला ‘मौल्यवान धातू’ असं म्हणतात. - डॉ. मानसी राजाध्यक्ष मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org