मेघदूत प्रकल्पांतर्गत बारामती तालुक्यातील तरडोली, लोणीभापकर, सिद्धेश्वर निंबोडी, शिर्सुफळ, मोराळवाडी मुर्टी, मोरगाव, सुपे, वाकी, ढाकळे येथील तळ्यांमधील जलपर्णी काढणे व तलावांची खोली वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र गेल्या अनेक दशकांमध्ये साठलेला गाळ काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणात काम करावे लागेल, हे लक्षात आले. जेसीबीच्या साहाय्याने तलावाच्या पाणी साठवण क्षेत्रामध्ये वाढलेल्या गारवेलसारख्या वनस्पतीचे मुळासहित निर्मूलन करण्यात आले. पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी जेसीबी व ट्रॉलीच्या साहाय्याने तलावातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले.
या गाळामध्ये सेंद्रिय घटकांचे प्रमाण भरपूर असल्याने शेतीसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून शेती उत्पादन वाढते. गाळ उपसल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढते. परिणामी, आसपासच्या परिसरातील विहिरींची पाझर क्षमता व पाण्याची पातळी वाढते. वर्षांतून दोन वेळा पीक उत्पादन घेता येते. शेती, मत्स्यशेती यांसाठी तसेच पशूंना पिण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होते. जमिनीची धूप कमी होते. गारवेल वनस्पतीच्या निर्मूलनामुळे तलावाच्या पाण्यात गारवेलीपासून पसरणाऱ्या विषारी द्रव्यांवर नियंत्रण राहते. पाण्याचे प्रदूषण होत नाही. त्यामुळे स्थलांतरित पशुपक्षी, वन्यप्राणी यांचे प्रमाणही वाढते.
फोरमने तलाव संवर्धनाबाबत इतरांनाही मार्गदर्शक ठरतील अशा सूचना केल्या आहेत. गावामधील गाळ वाहून आणणाऱ्या ओढय़ावरील बांधाची उंची पाच फुटांपर्यंत वाढविल्यास तलावामध्ये साचणाऱ्या गाळाचे प्रमाण कमी होते. डोंगररांगा व माळरानातून येणारे पावसाचे स्रोत नाला बंडिंगसारख्या उपाययोजना करून अडविल्यास जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. फोडण्यात आलेल्या तलावांच्या संरक्षक भिंती व सांडव्यांची उंची वाढविल्यास तलावांची पाणी साठवण क्षमता वाढते.
फोरमने प्रकल्प मेघदूतसाठी केलेल्या कामाचा आणि खर्चाचा ताळेबंदही मांडला आहे. यानुसार एक घनमीटर माती तलावामधून काढली तर १००० लिटर पाणीसाठा वाढतो. एक ट्रेलर माती तलावामधून काढली तर सुमारे ८१०० लिटर पाणीसाठा वाढतो. एक एकर जमिनीमध्ये तलावातील पाच गुंठे जागेतील माती भरल्यास अंदाजे ४०,००० रुपये खर्च येतो. अशाच प्रकारचे काम करण्यासाठी हा ताळेबंद इतरांना निश्चितपणे दिशादर्शक ठरू शकतो.

जे देखे रवी..  –  लढा-१
हा लढा निदान तीस-पस्तीस वर्षे चालला आणि अजून चालू आहे. थोडा भूगोल सांगितलेला बरा. मी राहतो त्याच्या शेजारी त्या काळात एक मोकळा भूखंड होता आणि त्या भूखंडाच्या शेजारी त्या काळात नॅशनल हॉस्पिटलची टुमदार दोनमजली इमारत होती. भूखंडाच्या समोर बॉम्बे स्कॉटिश नावाची शाळा आहे. हल्ली इतर देशांत राहणाऱ्या भारतीयांना NRI  म्हणतात, म्हणजे अनिवासी भारतीय. बॉम्बे स्कॉटिशसारख्या शाळा R.N.I. तयार करतात, म्हणजे  Resident Non Indian  – निवासी अभारतीय. रस्त्याचे नाव आहे वीर सावरकर मार्ग. पूर्वीचा कॅडेल रोड. पण पूर्वीचे नाव भारतीयांच्या डोक्यातून आणि तोंडातून गेलेले नाही. हा कॅडेल कोण याचा कोणालाच पत्ता नाही.
तसे बघायला गेले तर भारतात सोडा, महाराष्ट्रात नव्वद टक्के लोक सावरकरांवर दोन ओळी लिहू शकतील की नाही याबद्दल मला शंकाच आहे. मामला अगदी साधा होता. हे नॅशनल हॉस्पिटल हिंदुजा कुटुंबाच्या संस्थेच्या मालकीचे होते. हे तेव्हाही आणि आजही एक आंतरराष्ट्रीय उद्योगपती होते आणि आहेत. त्यांच्या मनात एक महाकाय रुग्णालय बांधण्याचे स्वप्न होते तोवर ठीक होते, पण त्या प्रयत्नात हा शेजारचा भूखंड लाटण्याचा मनसुबा किंवा घाट होता. मागे माहीमचा दुर्लक्षित समुद्रकिनारा होता. समुद्र थोडा हटवून (शाब्बास) हा भूखंड मोठा करून आपली जुनी नॅशनल हॉस्पिटलची जमीन आणि हा विस्तारलेला भूखंड मिळून त्या दोन्ही जमिनी हडप करण्याच्या डावात भूखंड आणि जुन्या हॉस्पिटलमधला एक शहराच्या नकाशात असलेला अधिकृत रस्ताही त्यात गिळंकृत करण्याचा उद्देशही स्पष्ट दिसत होता. आणि या विषारी विस्ताराला त्या काळात महानगरपालिकेने परवानगी द्यावी म्हणून प्रयत्न चालले होते. त्यासाठी एकूण एक पक्ष आपापल्या तऱ्हेने झटत होते. त्यात समाजवादीही होते. त्या काळचे समाजवादी निराळे होते. हल्लीहल्लीसारखे माजवादी झाले नव्हते. मला आठवते, या बाबतीत मी प्रमिला दंडवतेंना भेटलो होतो, पण काहीतरी राष्ट्रीय घटना घटली होती (आणीबाणीचा काळ असावा), त्यामुळे त्या त्रस्त होत्या, त्यांनी दुर्लक्ष केले. कारण हा आमचा मामला अगदीच किरकोळ होता. अशा लहान गोष्टीकडे लक्ष पुरवले असते तर आज जी भयानक स्थिती आहे ती परिस्थितीच उद्भवली नसती. दोन माणसांनी मात्र मला पोच दिली. एक होते शिवसेनेचे सुधीर जोशी आणि दुसरे त्या काळचे महानगरपालिका आयुक्त भालचंद्र देशमुख. शिवसेना सत्तेत आली तेव्हा दोघांचीही नावे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होती, पण ते व्हायचे नव्हते. तसे झाले असते तर महाराष्ट्राचा इतिहास पार बदलला असता, असे मला नेहमीच वाटत आले आहे. हा मामला कसा घडत गेला त्याबद्दल पुढच्या लेखांमधून.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस -हाडांचे विकार : भाग १
शरीराचे धारण करणाऱ्या सात धातूंतील हाडांचे विकार जरा वेगळय़ा गटांत बसतात. रस, मांस, मेद मज्जा व शुक्र यांचा आधार कफदोष हा आहे. अस्थींचा आधार वायू असे शास्त्र सांगते. पण वायू वाढला तर अस्थी घटतात, बिघडतात. नुसता कॅल्शियम किंवा चुना, असा अस्थिविकाराचा विचार करता येत नाही. अस्थींचे पूरण करणारी मज्जा अस्थिविकारात फार मोठा भाग घेते.
कंबरदुखी, गुडघेदुखी, कानाचे विकार, केसांचे विकार, कॅन्सर, खांद्याचे विकार, छातीत दुखणे, जखमा, दात, फुफ्फुसाचे विकार, भगंदर, महारोग, वातविकार, हृद्रोग व क्षय या विकारांच्या लेखात हाडांचा काहीअंशी विचार आपण केलेला आहेच. वैद्यक व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात नात्यातील एक मुलगी आपल्या लहान बालकाच्या तक्रारीकरिता आली. हातापायांच्या काडय़ा, पोटाचा नगारा, मुडदूस विकार, मांस व अस्थीच्या क्षयाचा रोग, त्या बालकाच्या विकाराकरिता चिंतन, मनन, वाचन केले. शृंगभस्म, त्रिकटू यांना नागवेलीच्या पानाच्या रसाची भावना असा पाठ ठरविला. असो! औषध तयार केले, पण रुग्णच आला नाही.
पुढे सर्दी, पडसे, दमा, ताप, मुडदूस, क्षय, कमी वाढ अशा नाना तक्रारींचे शेकडो रुग्णांना हे औषध, ‘ज्वरांकुश’ देत आलो आहे. अ‍ॅलोपॅथी कंपन्यांच्या ‘कॅल्शियम’पेक्षा हे सुधाद्रव्य अनेकपट चांगले आहे. शरीरात चटकन एकरूप होते. हरणाच्या खूर व शिंगासारखे छातीच्या हाडांना बल देते. अलीकडे वैद्यकीय व्यावसायिक अनेकानेक रुग्णांना ‘कॅल्शियमच्या गोळय़ा घेण्याचा सल्ला देत असतात.’ त्यांची क्षमा मागून मी असे सुचवेन, की आपल्या दैनंदिन आहारात काही विशिष्ट पदार्थ रुग्णांना सुचवावे. पालेभाज्या, दूध, फळे, कडधान्यांवरील टरफले यात नैसर्गिक चुनाद्रव्य पुरेसे असते. ते शरीरात चटकन सात्म्यही होऊ शकते. रुग्णाला आपण खूप औषधे घेत नाही असेही समाधान या आहारद्रव्यांमुळे मिळते. भरभरून ‘कॅल्शियम’ देणाऱ्या निसर्गदेवतेला प्रणाम!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २ जुलै
१८६५ > नाटककार, निबंधकार, कवी कृष्णाजी लक्ष्मण सोमण यांचा जन्म. टिळक प्रेमापोटी  ‘हिंदोल टिळक गीत’ ही काव्यरचना. ‘पानिपतचा दुर्दैवी मोहरा, विजयनगरचा डळमळता राजमुकुट, ‘माझी बहीण’ मिळून २५ ऐतिहासिक, पौराणिक नाटके लिहिली. ‘किरात कालदंड, मधुकर, सारथी या टोपण नावांनी त्यांनी लिखाण केले.
१९१६ >  वैद्यकीय ग्रंथांचे भाषांतरकार, लेखक, कवी गणेश कृष्ण गर्दे यांचे निधन. ‘सार्थ वाग्भट’ आणि ‘सार्थ माधवदिन’ या वैद्यकावरील संस्कृत ग्रंथाचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. याशिवाय ‘सटीप ईशगुणदर्शन’, ‘सार्थ व रामश्लोकी शिवमहिम्न’ आणि ‘उपमन्युकृत शिवस्तोत्र’ ही त्यांनी संस्कृतमधून भाषांतरित केलेली काव्यरचना आहे.
१९२६ >   विनोदी लेखक विनायक आदिनाथबुवा यांचा जन्म. ५० वर्षे सातत्याने लेखन करून १५० च्या आसपास पुस्तके प्रकाशित. ‘अकलेचे तारे’, ‘एक ना धड’, ‘चौदावे रत्न’, ‘शंभराव पुस्तक’ आदी कथासंग्रह प्रसिद्ध.
१९२९ >  इतिहासाभ्यासक पुरुषोत्तम विश्राम भावजी यांचे निधन. द. ब. पारसनीसांच्या सहकार्याने पेशवे दफ्तराच्या १०, ११, १२ व १३ या खंडाचे संपादन त्यांनी केले.
– संजय वझरेकर