महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे कार्य याची माहिती झाल्यावर प्रभावित झालेल्या कॅथरिन या ब्रिटिश महिला १९३२ साली भारतात आल्या. वर्षभर उदयपूरच्या शाळेत शिक्षिकेचे काम केल्यावर त्या महात्मा गांधींना भेटायला वध्र्याच्या सेवाग्राम आश्रमात गेल्या. कॅथरिनची सेवाभावी वृत्ती, काही तरी सामाजिक कार्य करण्याची प्रबळ इच्छा पाहून महात्माजींनी सेवाग्राम आश्रमात त्यांना स्वयंसेवक म्हणून राहण्यास परवानगी दिली.

कॅथरिन एकूण आठ वष्रे सेवाग्राम आश्रमात राहिल्या. गांधीजींची मूलभूत शिक्षण संकल्पना, ‘नयी तालीम’ने त्यांना प्रेरणा मिळून त्यांनी आश्रमात महिला सशक्तीकरण आणि शिक्षण या क्षेत्रांत काम केले तसेच निसर्ग संवर्धनाचा प्रयत्न केला. या काळातच गांधीजींनी त्यांचे नामकरण ‘सरला बहन’ केले. परंतु या आठ वर्षांच्या काळात विदर्भातल्या उष्ण हवामानामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच मलेरियाने आणखी भर टाकली. यावर तोडगा म्हणून गांधीजींनी सुचवल्याप्रमाणे १९४० साली तत्कालीन युनायटेड प्रोव्हिन्स म्हणजे सध्याच्या उत्तराखंडातील अलमोडा जिल्ह्य़ात कौसानी येथे त्या राहायला गेल्या. कौसानीत त्यांनी लक्ष्मी आश्रम स्थापन करून महिला उत्कर्षांसाठी कार्य सुरू केले. ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकलेल्या राजनतिक कैद्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी त्यांनी धान्य आणि कपडय़ांच्या स्वरूपात निधी गोळा करूनही मदत केली.

१९४२ मध्ये गांधीजींनी ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू केले. सरला बहन यांनी त्याला प्रतिसाद देऊन कुमाऊं प्रदेशातील लोकांमध्ये या आंदोलनाचे संघटन केले. यासाठी कुमाऊंसारख्या पर्वतीय प्रदेशात त्यांनी पायी खडतर प्रवास करून हे आंदोलन प्रभावी केले आणि त्यामुळे त्यांना दोन वष्रे अल्मोडा आणि लखनौत तुरुंगवासही सहन करावा लागला. एक ब्रिटिश महिला असूनही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ब्रिटिश सत्ताधाऱ्यांविरुद्ध चाललेल्या आंदोलनात त्या मदत करीत होत्या आणि कुमाऊं पहाडी प्रदेशात नेतृत्वही करीत होत्या याचा आकस ब्रिटिशांना अधिक होता. कॅथरिन ऊर्फ सरला बहनना भारतात येऊन आता एक दशक लोटले होते. हिंदी आणि गढवाली भाषा त्यांनी अवगत केल्या होत्या. कुमाऊंच्या लोकांमध्ये त्या समरस झाल्या होत्या.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com