अगदी सूक्ष्म असो वा अतिविशाल; प्रत्येक वस्तू काहीतरी जागा व्यापतेच. प्रत्येक वस्तूला लांबी-रुंदी-उंची (खोली) अशा तीन मिती असतात. घन, गोलाकार, इष्टिकाचिती यांसारख्या नियमित भौमितिक वस्तूंचे आकारमान गणिती सूत्र वापरून काढता येते. दगडासारख्या अनियमित आकाराच्या वस्तूचे आकारमान काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. वस्तूचे आकारमान काढण्यासाठी बहुतेकदा वापरली जाणारी पद्धत म्हणजे विस्थापन पद्धती. एखादी वस्तू द्रवात बुडवली असता, ती स्वत:च्या आकारमानाइतका द्रव बाजूला सारते. आíकमिडीजच्या या सिद्धान्ताचा उपयोग करून ज्या वस्तूचे आकारमान काढायचे आहे, अशी वस्तू द्रवाने भरलेल्या भांडय़ात पूर्ण बुडवतात. त्या वस्तूने विस्थापित केलेल्या द्रवाचे आकारमान मोजतात. मात्र द्रवापेक्षा कमी घनता असलेल्या व घेतलेल्या द्रवात विरघळणाऱ्या पदार्थाचे आकारमान या पद्धतीने काढता येत नाही. विस्थापन पद्धतीने आकारमान मोजण्यासाठी उत्सारण पात्र किंवा मोजपात्र वापरतात. द्रव म्हणून बहुधा पाण्याचा उपयोग करतात. कारण पाणी सहज मिळते. आकारमानाचे MKS एकक घनमीटर (मीटर३ किंवा M3 ) आहे. तर CGS एकक घनसेंटीमीटर (सेंटीमीटर३ किंवा CM3) आहे. घनसेंटिमीटर म्हणजे इंग्रजीत cubic centimetre, त्याचे संक्षिप्त रूप cc हे आहे. १ मीटर ३ = १०६ सेंटिमीटर ३= १०९ मिलिमीटर ३ द्रवपदार्थ भांडय़ाच्या आतील भागात ठेवले की ते भांडय़ाचा आतील आकार धारण करतात. एखाद्या पात्राचे (भांडय़ाचे) आतील आकारमान म्हणजेच त्या पात्राची धारणक्षमता. म्हणजेच त्या पात्रात जास्तीत जास्त किती द्रव ठेवता येईल, ती मात्रा. धारणक्षमतेचे MKS एकक आहे लिटर (L) आणि उॅर एकक आहे मिलिलिटर (mL). याशिवाय बॅरेल (bbl), गॅलन (Ga) ही एककेही आंतरराष्ट्रीय बाजारात तेलासंबंधीच्या वा इतर व्यवहारात वापरली जातात. द्रवपदार्थाचे आकारमान मोजण्यासाठी मोजपात्राचा उपयोग करतात. शीतपेये २०० मिलिलिटर ते दीड लीटरच्या बाटल्यांमध्ये मिळतात. पाण्याची बाटली २०० मिलिलिटरपासून पाच लिटर, २० लिटपर्यंत उपलब्ध असते. यात ठेवलेला द्रवपदार्थ किती आहे, ते दर्शवलेले असते. अर्थात तो ठेवलेल्या बाटलीची धारणक्षमता त्यापेक्षा जरा जास्तच असते. १ लिटर =१००० मिलिलिटर =१००० सेंटिमीटर ३ म्हणजेच एक घनसेंटिमीटर आकारमान एक घनमिलिलिटरइतके असते. - डॉ. हिरण्मयी क्षेमकल्याणी मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org डॉ. बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांची ‘मृत्युंजय’ कादंबरी १९७९ चा ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ‘मृत्युंजय’ ही आसामी भाषेतील कादंबरी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात आसाममध्ये घडलेल्या घटनांवर आधारित आहे. या कादंबरीत सगळ्या देशातील तत्कालीन परिस्थितीचे प्रतिबिंब पडलेले आहे. त्यात जनमानसाच्या आंदोलनातील समूहाचे, त्यांच्या दु:खाचे, आशा-आकांक्षांचे आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचे अत्यंत भावपूर्ण आणि मार्मिक, वास्तवदर्शी चित्रण केले आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आसामच्या काही डोंगराळ भागात ही कथा आकार घेताना दिसते. या कादंबरीची सुरुवात होते ती ब्रिटिश सत्तेचे जोखड फेकून देण्यासाठी आंदोलनाने. रेल्वे उलटवणे, विजेच्या तारा तोडणे, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस जाळणे, सरकारी इमारतींवर तिरंगा ध्वज फडकावणे असे हे जहाल आंदोलन. आसाममध्ये या साऱ्या वातावरणाचे प्रतिबिंब उमटलेले होते. योगेश्वरी फुलन ही ६० वर्षांची वृद्धा तिरंगा घेऊन अहिंसक स्वयंसेवकांच्या मोर्चापुढे उभी असता बंदुकीच्या गोळीने तिचा मृत्यू होतो. बिगुल फुंकून स्वयंसेवकांना सावध करणाऱ्या तिलक डेंकालाही गोळी लागते. अशा अन्याय्य परिस्थितीत लोक किती काळ शांत बसणार? मग याची हिंसक प्रतिक्रिया म्हणून मालगाडी उलटवली गेली. जनतेचा उठाव दडपण्यासाठी स्वयंसेवकांवर, निरपराध जनता आणि स्त्रिया- मुले यांच्यावर अत्यंत अनन्वित अत्याचार होऊ लागले. ‘सुभद्रा’ही सुंदर पोर ३०-३० सैनिकांच्या लैंगिक अत्याचाराची शिकार ठरली. धनपूर हा या कादंबरीचा नायक. कार्यकर्ता, लढाऊ नेताच. ‘ईश्वर असता तर इतके अत्याचार होत असता पाहत राहिला असता का?’ हिंसा- अहिंसा यांच्याबरोबरच धर्मचर्चाही कथानकाच्या ओघात आढळते. भाबडय़ा भक्तीच्या, मंत्र-तंत्राच्या शक्तीच्या, अंधश्रद्धांच्या कल्पनेच्या पुढे धनपूर, गोसावी यांची देवधर्मविषयक स्पष्ट विचारसरणी विरोधाभासाने मनावर ठसते. कादंबरीचा शेवट होतो तोही असा चर्चा पूर्ण संवादानेच.. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तरी ही दैनंदिन अस्थिरता, हा रक्तपात, संपेल का? या प्रश्नांनीच कादंबरी संपते. कादंबरीच्या शेवटी सरकारच्या आंदोलकांना चिरडून टाकण्याच्या इराद्याबद्दल बोलताना गोसावीपत्नी म्हणते, ‘आंदोलकांच्या नसानसांतून रक्तबीज वाहत आहे, ते मरूनही पुन्हा जीवित होऊन उठणारे आहेत!- ते मृत्युंजय आहेत!’ - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com