श्रुती पानसे contact@shrutipanse.com मुलांना जर कसला ताण येत असेल, तर ते स्वत:हून सांगत नाहीत. कारण आपल्याला कसला ताण येतो आहे, हे त्यांना कळलेलंच नसतं. पण त्या ताणाचा परिणाम त्यांच्या वागण्यातून, अस्वस्थ चेहरा आणि हालचालींमधून कळून येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. कधी पोट, डोकं दुखतं. ताण जास्त झाला तर तापही येतो. असं जर जास्त काळ चाललं, तर त्यांचा अभ्यास, खेळ, कला, मत्री यांवरही परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. सतत ताण मनावर घेतले, तर स्वभावात बदल होतात. स्वभाव चिडका नसला तरी अकारण चिडचिड होते. मनाविरुद्ध काही घडलं तर डोळ्यांत पाणी येतं. कोणाशी बोलावंसं वाटत नाही. भूक लागत नाही. भूक लागलेली असूनही खाण्याची इच्छा होत नाही. वजन कमी होतं. त्यामुळे जास्त काळ ताण राहणं चांगलं नाही. त्याची कारणं शोधून ती दूर केली पाहिजेत. यासाठी पालक किंवा शिक्षकांनी मुलांना अशा प्रकारे प्रश्न विचारावेत : तुला कुठे फार अस्वस्थ वाटतं- घरात, शाळेत, की आणखी कुठे? आनंदी/ छान वाटत नाही का? जवळपासच्या कोणाचा त्रास होतोय का? तू कोणाला ठरवून त्रास देत आहेस का? कोणाला टाळत आहेस का? घराबाहेर घडलेल्या सर्व गोष्टी घरातल्यांना सांगू शकतो/ शकते का? घरच्यांपासून काही लपवत आहे का? शाळेत जावंसं वाटतं की नाही? कोणते विषय आवडतात, कोणते आवडत नाहीत? कोणत्या शिक्षकांचं शिकवणं समजतं? विषय समजत नाही म्हणून ताण येतो का? अभ्यास करावासा वाटत नाही का? अभ्यासाची पद्धत चुकते आहे का? मित्रांशी/मत्रिणींशी भांडण झालं आहे का? मित्रमंडळींपैकी कोणी दबाव टाकत आहे का? कोणी हिणवतं आहे का? शाळेत जायच्या रस्त्यावर कोणी त्रास देत आहे का? अशा प्रकारचे प्रश्न न रागावता, शांतपणे विचारले तर यातून अस्वस्थतेचं, ताणाचं खरं कारण कळेल आणि तरच त्यावर मात करता येणं शक्य होईल.