डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

अपेक्षाभंग मानसिक तणावाचाच प्रकार आहे. माणसाला हवे ते झाले नाही की नाराजी, निराशा येते. ती राग आणि दु:ख स्वरूपात व्यक्त होते. मनाची ही स्थितीदेखील शरीरात युद्धस्थितीतील रसायने पाझरवते. स्वसंरक्षणासाठी पळा किंवा लढा हे बदल शरीरात होतात. माणसाने लढून संकटाला पळवून लावले आणि तो लगेच शांतता स्थितीत आला तर ते चांगलेच आहे; मग त्याचे फारसे दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत.

पण असे सहसा होत नाही. संकट अदृश्य जंतूंचे असेल किंवा भयावह आर्थिक भविष्याचे, मेंदूतील त्या विचारांची फाइल सक्रिय राहाते. आपल्याला हवे आहे ते मिळत नाही, हे विचार नैराश्य कायम ठेवतात. दडपण आणि संघर्ष याचप्रमाणे नैराश्यसुद्धा काही वेळा उपयुक्त असते. आपल्याला जे प्राप्त करायचे आहे ते या दिशेने प्रयत्न करून मिळणार नाही, याचे भान त्यामुळे येते. सिद्धार्थ गौतमाला राजवाडय़ातील उपभोग घेत असताना नैराश्य आले म्हणूनच तो बुद्ध झाला. बिल गेट्सला महाविद्यालयीन शिक्षणाचे नैराश्य आले अन् त्याने संगणकामध्ये क्रांती केली.

सध्याच्या स्थितीतील नैराश्य अनेकांना नवीन मार्ग चोखाळायला लावू शकते. मात्र सर्वाना हे नैराश्य फलदायी ठरेलच असे नाही. कारण नैराश्य आल्यानंतर दिशा बदलण्याचे धाडस आवश्यक आहे. ते अनेकांकडे नसते. मग येणारा राग स्वत:वर नाही तर भोवतीच्या माणसांवर काढला जातो. काही माणसे परिस्थितीचे गांभीर्य नाकारतात. सारे काही ठीक आहे म्हणत राहतात. पण रोग नाकारल्याने बरा होत नाही, वाढत जातो. स्वीकार म्हणजे बधिरपणा किंवा वास्तव नाकारणे नाही. स्वीकारात परिस्थितीला सामोरे जाऊन जे काही चालले आहे ते जाणणे- पण लगेच अंध प्रतिक्रिया न देणे अपेक्षित असते.

सद्य:स्थितीत भविष्याविषयी निराशा वाटणे स्वाभाविक आहे. ती मान्य करून पुढील काळात जीवनशैलीत, खरेदी करण्याच्या सवयींत, कामाच्या स्वरूपात कोणते बदल करायला हवेत, याचा विचार करून ठेवायला हवा. आहे ती नोकरी गेली, व्यवसाय बंद झाला तर भविष्यात कोणत्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात, याचा धांडोळा घ्यायला हवा. त्यासाठी कोणते कौशल्य आत्मसात करावे लागेल, हे पाहायला हवे. आत्ता मिळणारा वेळ मजा करण्याची सुट्टी नसून परीक्षेपूर्वीची तयारीची सुट्टी आहे यादृष्टीने पाहिले तर हा नैराश्याचा तणाव उपयोगी ठरू शकेल.