आठव्या शतकाच्या पूर्वार्धापासून खैबर खिंडीतून आणि बोलान खोऱ्यातून तुर्क आणि अफगाण पठाणांनी हिंदुस्थानात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर मुस्लीम सूफी संत, धर्मपंडित, फकीरही हिंदुस्थानात येत गेले. इस्लामी राजवटीत जेव्हा अशांती, समाजघातक रूढींना प्रारंभ झाला तेव्हा इस्लामी सत्तेबरोबर आध्यात्मिक शांती आणि जागृती प्रस्थापित करण्याचे कार्य ज्या संप्रदायाने चालवले त्यास सूफी म्हटले जाऊ लागले. सूफी संतांनी संसार त्यागाशिवाय हे कार्य मोठय़ा जोमाने केले. सूफी तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेल्या लोकांचा वर्ग तयार झाला. सूफी संतांचे निवासस्थान आणि शिष्यांना शिक्षण देण्याचे स्थान म्हणजे खानखाह. खानखाहचा अर्थ आहे ‘परिवार’. या सूफी आध्यात्मिक परिवारांनी पुढे संप्रदायाचे रूप धारण केले. संप्रदायाच्या प्रमुखाला पीर किंवा मुíशद म्हणत. पुढे पिराच्या नावाने संप्रदाय ओळखले जाऊ लागले. इ.स. १०३६ मध्ये हिंदुस्थानात लाहोर येथे आलेले शेख हुज्वेरी हे पहिले सूफी. त्यांच्या शिष्यांनी आपापले संप्रदाय स्थापन केले. यापकी चिस्ती, कादरी, सुहरवर्दी आणि नक्षबंदी हे चार संप्रदाय हिंदुस्थानात अधिक प्रचलित झाले. सूफींच्या संप्रदायांपकी चिस्ती संप्रदायाचा प्रसार संपूर्ण देशभरात अधिक झाला. सूफींनी तेराव्या शतकात दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी खानखाह स्थापन केल्यानंतर दौलताबाद, गुलबर्गा, बिजापूर, गोवळकोंडा, पेनुकोंडा, त्रिचनापल्ली येथे सूफींची केंद्रे प्रस्थापित झाली. सूफींचे मुख्य ध्येय सत्य, परमात्म्यात विलीन होणे हे असते त्यामुळे सूफी संत नित्य स्मरण, समाधी, ध्यानधारणेत किंवा ईश्वरी चिंतनात म्हणजे इबादत करण्यात आपला वेळ व्यतीत करतो. सूफींना परमात्म्यात विलीन व्हावेसे वाटते याला ‘फना’ म्हणतात. हे काहीसे बौद्ध धर्मीयांच्या ‘निर्वाणा’प्रमाणे आहे असे म्हणता येईल. त्यांचे ध्येय सामान्य मुसलमानाप्रमाणे स्वर्गप्राप्ती हे नसते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून इराक, इराण आणि भारतातील सूफी आणि त्यांचे वाङ्मय यावर बरेच संशोधन झाले आहे आणि त्यावर ए. आर. निकल्सन, डॉ. असद अली, सेतुमाधवराव पगडी, जे. ए. सुब्हान आदींनी ग्रंथ लिहिले आहेत. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com